गोष्ट नववी
ब्रह्मा: नारदा, रात्रभर झोप नाही रे. सतत ते सप्तद्वीप, सप्तसमुद्र, मेरुपर्वत, तारांगण आलटून पालटून मनात येत जात होते. पहाटे पहाटे प्रकाश पडायला लागला आणि वाटायला लागले की हा सगळा निव्वळ वाङमयविलास आहे. सत्य नाही. कारण कुठे दिसत नाही. असे मधाचे, उसाच्या रसाचे, दह्याचे, दुधाचे समुद्र कुठे असते तर लोक इतके त्रस्त असते का रे? अशा आमरसाच्या नद्या, हत्तीएवढी जांभळे असती तर ह्या बारक्या सीताफळाच्या झाडाचे एवढे कौतुक असते का रे? हे सारे इतके अफाट आहे, म्हणूनच असत्य आहे. आपल्या नसलेल्या स्वर्गासारखे. तुझ्यामाझ्यासारखे. अगदी काल्पनिक. गोष्टी म्हणून ऐकायला, सांगायला छान. पण तू म्हणतो तसे खरेच 'नारायण नारायण' म्हणायला लावणाऱ्या या गोष्टी. आता मला कळते तू कां सतत 'नारायण नारायण' म्हणतोस ते. मी पण आता 'रामायण रामायण' म्हणणार आहे मधून मधून अशा गोष्टी वाचतांना, सांगताना. मीही काल्पनिक. ह्या गोष्टीही काल्पनिक.
नारद:
काय सांगावे तुला परब्रह्मा
ज्यास ना मृत्यू, जो असे अजन्मा
सर्वसामान्या जो असे विधाता
तोचि सांगे तो कल्पना, न कर्ता
नारायण नारायण! ब्रह्माजी, तुम्ही ज्या निष्कर्षाप्रत पोहोचलात तेथे मी फार पूर्वीच पोहोचलो. कोणीही, जो विचार करू शकतो, त्यासही हे कळेल. हे सारे बुद्धिमान प्राणी. यांना कळत नाही असे नाही. पण एकंदरीतच लहानपणापासून तेच ते पुन्हा पुन्हा सांगून, पारायण करून इतके रुजवले जाते की ते खोटे आहे म्हणायला कोणी धजत नाही. खोटे आणि खरे समजायच्या आधीच, विचारशक्ती प्रगल्भ होण्याच्या आधीच हे सर्व रुजवले जाते. बुद्धिवृक्ष, विचारवृक्ष मोठा होण्याआधीच हे कल्पनांचे कलम त्यावर केले जाते. त्यावर मग पुन्हा पुन्हा तेच गळी उतरवणे. अठ्ठावीस नरकांची भिती दाखविणे. स्वर्गाचे आमिष दाखविणे. पुराणसप्ताह करणे. पारायण पारायण!
ब्र: नारदा, समजा लहान मूल मोठे होईपर्यंत त्याला फक्त भाषा, गणित, विज्ञान अशा उपयोगी व विवादातीत गोष्टी, ज्या कालबाह्य होत नाहीत, त्याच शिकविल्या व नंतर त्याला सारासार विचार करण्याची, दूध व पाणी वेगवेगळे करू देणारी नीरक्षीर विवेकाची, कापूस व कोंडा वेगळा करण्याची बुद्धी आल्यावरच पुराणातले 'तारांगण तारांगण' वाचू दिले तर ते अधिक योग्य नाही का रे होणार? मग त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ते मूल ठरवेल. तो त्याचा स्वत:चा निर्णय असेल. असे केले तर ते अधिक योग्य नाही का होणार?
ना: ब्रह्मदेवा, असेच ब्रह्मवाक्य अॅरिस्टाॅटल नावाचा एक महान तत्वचिंतकही वदला होता म्हणे. अडीच हजार वर्षांपूर्वी. ही पुराणे अस्तित्वात येण्याआधीच. पण अशी नवी मते समाजावरचे एका विशिष्ट वर्गाचे प्रभुत्त्व कमी करेल असे तत्कालीन सत्तेला नेहमीच वाटते. अज्ञानाच्या अंधःकारात बुडलेल्या रयतेवर राज्य करणे फार सोपे असते. प्रश्न न विचारणाऱ्या समाजाची पद्धतशीर निर्मिती करणाऱ्या स्वार्थी लोकांना असे नवे विचार पटणे शक्यच नाही. त्यामुळे अशा विचारांची कळी फूल होण्याआधीच खुडून टाकल्या जाते. अशी मते, विज्ञानसिद्ध सत्ये जोवर पुराणातून येत नाहीत तोवर त्यांना वाली नाही. मला तर वाटते, तू आणि मी मिळून एक नवे पुराण लिहावे. नाहीतरी आपल्या नावाने खपविलेले ब्रह्मपुराण, नारदपुराण आहेतच. आपण आणखी एक पुराण लिहू. ब्रह्मपुत्र पुराण!
ब्र: अरे पण ब्रह्मपुत्र म्हणजे नारदच. नारदपुराण म्हणजे ब्रह्मपुत्र पुराणच. मला जसे दुसरे मज्जीवनमणिमाला लिहिता येत नाही, तसे दुसरे नारदपुराणही आपल्याला लिहिता येणार नाही. शिवाय पुराण काव्यबद्ध हवे. श्लोक हवे. ठेका हवा. मला तर कवितेचा अ का ढ येत नाही.
ना: तसे नाही ब्रह्मा. ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्माचा पुत्र हा षष्ठीतत्पुरुष समास. तसा संधिविग्रह नाही म्हणत मी. ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्म आणि पुत्र, द्वंद्व समास म्हणतो मी. ब्रह्म आणि पुत्राने लिहिलेले पुराण. आणि कवितेचं काय! छंदबद्ध रचना करायची. जमेल तुला.
ब्र: बापरे! सगळच डोक्यावरून गेलं. समास काय, संधि काय, षष्ठी काय, द्वंद्व काय, छंद काय. हेच आधि एखाद्या पुराणातून शोधावे लागेल. पण पुराणात फक्त त्या अफाट गोष्टीच असतात. मेरू पर्वत, सूर्याचा रथ वगैरे.
ना: नाही ब्रह्मा. हे सर्व भाषाशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरण पण पुराणात व प्राचीन ग्रंथात आहे. अरे नारदपुराणातही भाषा, काव्य, गणित असे अध्याय आहेत. तुलाच ध्रुवबाळाच्या गोष्टी आवडतात त्याला कोण काय करेल?
ब्र: अरे तसे नाही. भाषा, कविता, गणित माझे आवडते. तेवढ्यासाठी तर मला मास्तरांची आठवण येते. ते सारे शिकू आपण. गोष्टीही आवडतात म्हणा! राहू-केतू, समुद्रमंथन, सुदर्शन चक्र, अजामिळ या साऱ्या गोष्टी सांगायचे तू कबूल केले आहे. पण आज नारदपुराणातले काव्यशास्त्र शिकावे म्हणतो. मग मला कविता करता आल्या तर आपण भेंड्या खेळू शकू. स्वरचित कवितांच्या. ब्रह्मपुत्रपुराण पण लिहू शकू. पण मला ब्रह्मपुत्रपुराणापेक्षा भ्रमरपुराण म्हणायला आवडेल. नावापासूनच सत्य हवे. भुंगा सत्य आहे. आपण काल्पनिक. भंुग्यासारखे भ्रमण करताना आपल्याला जे दिसते, ऐकू येते, जाणवते त्यावर आपण आपले मत, आपले विचार मांडायचे. काय?
ना: ठीक तर. पण आज तुलाही तुटक्या फुटक्या, रडक्या फडक्या, हुसक्या फुसक्या, चिटक्या मिटक्या कविता कराव्या लागतील. कोणी हासणार नाही. कोणी चिडवणार नाही. आहेच कोण येथे!
ब्र: ठीक आहे बाबा. पण मला काही येत नाही असे समजून शिकव. ते एकदम हाय लेव्हल नको. भाषा म्हणजे मला एक कुतुहलच आहे. त्यातही काव्यरूप विचार मांडणे. सध्यातरी माझी स्थिती 'उद्या लग्न आहे' मधल्या शाळकरी मुलीसारखीच आहे.
कशी अक्षरे चोख एकत्र येती
कसे शब्द होती, कसा अर्थ घेती
कशा शब्दपंक्ती कसे काव्य होती
विचारास शक्ती, कणा, धार देती
मी सध्या प्राथमिक शाळेतली ही मुलगीच आहे असे समज. तिची आई होऊन तू मला शिकव रे पोरा!
ना: ब्रह्मा, कविता हे एक गणित आहे. कविता हे एक शास्त्र आहे. कविता म्हणजे एक विज्ञान आहे. अॅरिस्टाॅटलने तर काव्याला Poetical Science चा दर्जा दिला आहे. आपल्याही पुराणात काव्यज्ञान प्रत्येक ऋषीला, मुनीला, शिक्षकाला अावश्यक आहे असे म्हटले आहे. काव्यज्ञानाशिवाय जो मंत्रांचा उच्चार, प्रचार करतो तो नरकात जातो असेही म्हटले आहे. काव्याला आपल्याही वेदपुराणात उच्च दर्जा दिला आहे. वेदशास्त्रांच्या सहा अंगांपैकी ते एक अंग आहे. नारद पुराणात तर त्यावर एक अध्याय आहे. मला, म्हणजे नारदाला सनंदन ऋषिमुखाने हे ज्ञान देण्यात आले आहे. तिथूनच आपण सुरुवात करणे इष्ट होईल असे मला वाटते देवा. आदेश असेल तर सुरू करतो.
ब्र: सांग वत्सा! रामायण रामायण!
ना: अथ सप्तपंचाशत्तमोऽध्या़यः
सनन्दन उवाच
वैदिकं लौकिकं चापि छन्दो द्विविध मुच्यते
मात्रावर्णविभेदेन तच्चापि द्विविधं पुनः
मयौ रसौ तजौ भन्नौ गुरुर्लघुरपि द्विज
कारणं छंदसि प्रोक्ताश्छंदः शास्त्रविशारदैः
ब्र: छान वाटलं ऐकून. थोड पुण्य पण मिळालं असेल संस्कृत श्लोक ऐकून. पण अर्थ काय?
ना: ब्रह्मा, आपण ज्या काव्याचा आज अभ्यास करणार आहोत ते छंदबद्ध काव्य असेल. भेंड्यांच्या सामन्यात जसे होते तसे. यात प्रत्येक कडव्यात चार ओळी असतात. फक्त आर्या सोडून. तिच्यात दोनच ओळी असतात. पण तिच्याही प्रत्येक ओळीचे दोन भाग असतातच. प्रत्येक भागाचा ठराविक साचा असतो. ठराविक चाल असते. जंतुकवी म्हणतो ते खरे आहे; 'कविता म्हणजे कदमताल, एकच ठेका एकच चाल'. प्रत्येत ओळीला चरण आणि तिच्या भागाला पाद म्हणतात.
ओळीत किती अक्षरे आहेत, त्यांचा उच्चार ठोकळमानाने किती वेळ घेतो यावर कवितेची चाल अवलंबून असते. अशा साच्यांना छंद म्हणतात. छंदशास्त्र हे कवितेचे विज्ञानच. ते जर आपण समजून घेतले तर आपण चालबद्ध कविता करू शकू. त्या कवितेला अर्थ असेल वा नसेल. ती वायफळ असेल. नुकतच बोलायला शिकणाऱ्या मुलाचे बोल असतील. योग्य शब्दयोजना करून अर्थ भरणे हेच प्रगल्भ कवीचे काम.
ब्र: ते तर आपले वाचन, विचार व ज्ञान यावर अवलंबून आहे. त्या बाबतीत काही आपण अगदीच हे नाही बरें. आपणही जग पाहिले आहे. तू तर त्रिलोक पाहिले आहे.
ना: तर ब्रह्मा, नारद पुराणाप्रमाणे छंद दोन प्रकारचे, वैदिक व लौकिक. वेदमंत्रामध्ये गायत्री मंत्र हा गायत्री छंद आहे. तसाच अनुष्टुप् छंद पण संस्कृत साहित्यात खूप वापरात आलेला आहे. त्यात सहसा आजचा मानव कविता करीत नाही. पुराणात, इतिहासात, काव्यात जे छंद वापरात येतात ते लौकिक छंद, किंवा वृत्त. भेंड्यांमधे भुजंगप्रयात, शार्दूलविक्रीडित, आर्या हे सारे लौकिक छंद. हे आपल्याला समजून घ््याला हवे. असे दहा बारा छंद आज शिकलो तर आपण ब्रह्मपुत्र पुराण लिहायला घेऊ शकू. भ्रमर पुराण म्हण वाटल्यास.
ब्रह्मा, छंदामधे पण दोन प्रकार आहेत. मात्रावृत्त व गणवृत्त. गणवृत्तात पदातील अक्षरांची संख्या ठरलेली असते. मात्रावृत्तात प्रत्येत पदातील व पादातील मात्रांची संख्या ठराविक असते. एकंदरीत काय, की कवितेत अक्षर अन् अक्षर महत्त्वाचे आहे. एक जरी इकडचे तिकडे झाले तरी चाल, लय बिघडते. अगदी स्वयंपाकासारखं आहे ब्रह्मा. कोणालाही पुरणपोळी जमेलच असे नाही. पुरणपोळी म्हणजे कविताच असते स्वयंपाकातली.
ब्र: नारदा, तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! कुठेही तुला पुरणपोळीच आठवते. मात्रा म्हणजे काय ते जरा सांग. त्या कशा मोजायच्या?
ना: ब्रह्मा, हेच कवितेचे गणित. कवितेच्या प्रत्येक ओळीतला शब्द लघु की गुरु धरायचा हे ठरवायचे. लघु म्हणजे ज्याच्या उच्चाराला थोडा कमी वेळ आपण देतो, गुरूला त्या मानाने ज्यास्त. ह्रस्वदीर्घासारखीच बऱ्याच अंशी ही कल्पना आहे. थोडक्यात सांगायचे तर अ, इ, उ लघु. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः दीर्घ. तसेच ककाकिकी, खखाखिखीचे. आता माझेच नाव बघ. नारद. ना गुरू, र लघु, द लघु. म्हणजे माझ्या नावाचा साचा गुरु-लघु-लघु. शारदा म्हणजे गुरु-लघु-गुरु. आता ब्रह्माजीचा साचा तू सांग.
ब्र: ब्र लघु, ह्मा गुरू, जी गुरु. मी लघु-गुरु-गुरु.
ना: छान. पण थोडं चूक. ब्रह्मा, ब्र नंतर जोडाक्षर असल्यामुळे ब्र उच्चारतानाच आपण पुढच्या जोडाक्षराच्या उच्चाराची तयारी करतो. पुढच्या जोडाक्षराच्या आधीच्या अक्षरावर आघात आला असे म्हणतात. म्हणून जोडाक्षराच्या आधीच्या अक्षराला लघु वाटले तरी गुरू धरतात. म्हणून तू गुरु-गुरु-गुरु. ब्रह्मा, तू ब्रह्मदेव आहेस. तुझ्यात रे कोण लघु टाकणार. ते लघु बाकीच्यांना. आता छगन बघ. लघु-लघु-लघु. अरुण बघ. लघु-लघु-लघु. सूर्याचा सारथी तो, कश्यप ऋषींचा पुत्र, सूर्यापेक्षा आकाराने मोठा. पण तरी त्रिलघु. ऋषिपुत्र, सूर्यसारथी अरुणची गोष्ट पण छान आहे बरे. पण ती पुढे कधी. आज फक्त कविता.
ब्र: पेंडिंग गोष्टींच्या यादीमधे आणखी भर पडली. चला पुढे.
ना. ब्रह्मा, मात्रा मोजताना, गुरू असेल तर दोन मात्रा, लघु असेल तर एक मात्रा धरायची असते. नारद म्हणजे दोन अधिक एक अधिक एक. म्हणजे माझ्या मात्रा चार. तसेच ब्रह्माजी म्हणजे दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे सहा मात्रा. आणखीन एक गोष्ट ब्रह्मा. अक्षरावर अनुस्वार असेल तर गुरू धरायचे. अक्षरापुढे विसर्ग असेल तरी पण गुरू. आता सांग अंधःकार म्हणजे किती मात्रा?
ब्र: दोन दोन दोन एक. म्हणजे सात मात्रा.
ना: बरोबर! आता एकच आणखी नियम. चरणाच्या, पदाच्या, पादाच्या शेवटी जर लघु असेल तर त्यालाही गुरू धरायचे. आता सांग अंध:कार शब्द चरणाच्या शेवटी आला तर किती मात्रा होतील?
ब्र: आठ. कारण शेवटचा र पण गुरु धरायचा. बाकी तीन गुरु आहेतच.
ना: व्वा! आहे की नाही गणित? तुला हे सोपे म्हणा. तुझे डोळे मोजले तरी आठ भरतात.
ब्र: नारदा, तुझ म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: तर ब्रह्मा, आपण जर आता एक आर्या म्हटली अन् तिच्या मात्रा मोजल्या तर आपल्याला आर्यावृत्ताचे गणित समजेल. आठवते का काकूंची एखादी आर्या?
ब्र:
येई जाग जगाला, पडती किरणे नभातुनी जैसी
आकाशी तो असता, झोपे जो, त्यास सद्गती कैसी
ना: छान! ब्रह्मा, तू म्हटली पण छान. त्या भेंड्यांच्या सामन्याचा तुला खूप फायदा झाला. आता तू कवी होणार असे मला वाटते.
ब्रह्मा, आर्येला दोनच चरण असतात. पण पहिला चरण म्हणताना 'येई जाग जगाला' म्हणून तू थोडा थांबला. नंतर 'पडती किरणे नभातुनी जैसी' म्हणालास. पुन्हा थांबला. मग 'आकाशी तो असता' म्हणून, थोडी उसंत घेऊन 'झोपे जो त्यास सद्गती कैसी' म्हणाला. हे जे मधले विश्रांतीचे क्षण आहेत त्यांना यति म्हणतात. कविता म्हणणारा तेथे थोडा ज्यास्त वेळ व्यतीत करतो. दोनच चरण असले तरी आर्येचे असे चार भाग असतात. ब्रह्मा, मोज प्रत्येक भागाच्या मात्रा.
ब्र: हं. पहिल्या यतिपर्यंत १२, नंतर पहिल्या चरणाच्या शेवटापर्यंत १८, मग दुसऱ्या चरणात यतिपर्यंत पुन्हा बारा, मग पुन्हा १८. बारा अठरा बारा अठरा.
ना: हं ब्रह्मा. हेच आर्येचे सूत्र. मात्रा महत्त्वाच्या. अक्षरे कमीजास्त चालतील. बघ म्हणून:
टाटट टाटट टाटा, टाटा टाटा टटा टटा टाटा
टरटट टरटट टाटा, टटटा टटटा टटा टटा टाटा
ब्र: अरे खरच! अक्षरांची संख्या आता वेगळी. पण मात्रा मात्र बारा अठरा बारा अठरा. व्वा!
ना: म्हणून तर आर्या करायला सोपी असते. आपल्या ब्रह्मपुत्र पुराणाला पण ती एकदम योग्य आहे. बाकीही वृत्त वापरू मधून मधून वाटल्यास. तू करून बघ एखादी आर्या. चल हो सुरू.
ब्र: नाही रे. असे एकदम थोडेच जमणार आहे. तू म्हण एखादी नवी कोरी स्वरचित आर्या. हे वृत्त तसे मलाही जमेल. पण पुढे कधी.
नाः ऐक तर मग.
आली वरातगंगा स्वर्गामधुनी, इथे उतरली ती
आलो मुक्कामासी, काकाकाकूघरी शिकायासी
ब्रह्मा, मात्रावृत्त बरेच असतात. पण गणवृत्तही खूप आहेत. हे मात्र फार शिस्तशीर असतात. प्रत्येक चरणात किती अक्षरे हवीत, अक्षरांचा लघु गुरु क्रम कसा असावा, यति कुठे कुठे, सारे अगदी कडक नियम.
तीन अक्षराच्या जुडीला गण म्हणतात. चरणातली अक्षरे अशी तीन तीन च्या गटात विभागायची. मग प्रत्येक गणात प्रत्येक अक्षराचे आपण आधी ठरवले तसेच लघु गुरु ठरवायचे. त्यावरून गण ठरतात. किती प्रकारचे गण असतील सांग बरे.
ब्र: तूच समजावून सांग.
ना: बरं, असं समज, एकच अक्षरी चरण आहे. ते अक्षर लघु असेल, किंवा गुरु असेल. म्हणजे एकच अक्षर असेल तर त्याचे लघु आणि गुरु असे दोन प्रकार होतील. आता समज, दोन अक्षरी चरण आहे. लघु गुरु प्रमाणे दोन अक्षरी शब्द किती प्रकारचे असू शकतात?
ब्र: चार. दोन्ही अक्षरे लघु किंवा दोन्ही गुरु; किंवा पहिला लघु, दुसरा गुरु; किंवा पहिला गुरू, दुसरा लघु. म्हणजे लघु-लघु, गुरु-गुरु, लघु-गुरु, गुरु-लघु असे चार प्रकार.
ना: बरोबर. मग आता तीन अक्षरी गणाचे किती प्रकार होतील करून पहा. आता आपण गुरूला ग, लघुला ल म्हणत जाऊ. या 'गल'च्या भाषेत तीन अक्षरी गणांचे काय काय प्रकार होतील ते सांग.
ब्र: गगग, लगग, गलग, गगल, ललल, गलल, लगल, ललग. एकूण आठ.
ना: पुन्हा बरोबर. ब्रह्मा, तीन अक्षरांचा समुह जर गगग, म्हणजे सर्वगुरु असेल तर त्याला 'म'गण म्हणतात. म्हणजे ब्रह्माजी म गण आहे. तीन गुरूपैकी पहिला लघुने बदलला तर 'य'गण. लगग म्हणजे य गण. जसे उन्हाळा, हिवाळा. पहिल्याऐवजी दुसरा लघु केला तर 'र'गण. गलग म्हणजे र गण. दे एक दोन उदाहरण र गणाचे.
ब्र: शारदा, अप्सरा
ना: बरोबर. पण वरातगंगा पृथ्वीवर आली तरी ब्रह्माचे मन मात्र स्वर्गातच घुटमळताना दिसते. अप्सरा काही मनातून जात नाही. असो.
आधीचे दोन गुरु व शेवटी लघु असेल, म्हणजे गगल असेल तर 'त'गण. दे उदाहरण.
ब्र: गंधर्व
ना: नारायण नारायण!
ब्रह्मा, असेच सर्वलघु म्हणजे ललल म्हणजे 'न'गण, गलल म्हणजे 'भ'गण, लगल म्हणजे 'ज'गण, ललग म्हणजे 'स'गण. असे हे यरतनभजसम आठ गण.
पण आता समजा चरणात दहा अक्षरे असतील व तीन तीन मोजले तर नऊ अक्षरांचे तीन गट होतील. एक अक्षर उरेल. मग त्याचा गण काय? तो लघु असेल तर 'ल'गण, गुरु असेल तर 'ग'गण. समजा अकरा अक्षरी चरण असेल तर तीन त्रिक नऊ अक्षरांचे तीन गण पडतील. उरलेले दोन सुट्टे जे राहतील त्यांना प्रत्येकी ल किंवा ग गण देता येईल. म्हणजे एकंदरीत य र त न भ ज स म आणि ल ग असे दहा गण असतात. चरणात किती अक्षरे आहेत व त्याची गणविभागणी कशी आहे यावरच वृत्त कोणते ते ठरते व चालही. त्याचे ज्ञान कवीला हवे असे काव्यशास्त्र सांगते.
आता तू मला य र त न भ ज स म गणांंची उदाहरणे दे पाहू. मग वृत्तज्ञान सुरू करू.
ब्र: य म्हणजे लगग म्हणजे उन्हाळा, हिवाळा. र म्हणजे गलग म्हणजे उर्वशी, अप्सरा. त म्हणजे गगल म्हणजे कैलास, वैकुंठ. न म्हणजे ललल म्हणजे नरक, कमळ.
ना: न म्हणजे पुरण पण ब्रह्मा.
ब्र: रामायण, रामायण! तुझ्या डोक्यात पुरण सोडून दुसरा काहीही विचार नसतो नारदा.
भ म्हणजे गलल म्हणजे नारद, अमृत. ज म्हणजे लगल म्हणजे हिरण्य, स म्हणजे ललग म्हणजे गुरुजी, अक्षदा. म म्हणजे गगग म्हणजे ब्रह्माजी.
ना: बस. कवितेचे गणित तुला आले. आता फक्त वेगवेगळ्या वृत्तांचे गण काय असतात एवढे समजले की झाले. पण आता मात्र कविता करावी लागेल ब्रह्माजी. शब्द नाही सुचले तरी गण जुळतील असे वायफळ बोल टाकायचे. आपण टटाटी भरून आर्या केली तसे. कवितेची चाल बसवायला तेवढेही पुरे.
ब्र: नारदा, त्या नारदपुराणातल्या श्लोकांचा अर्थ नाही सांगितला रे.
ना: अरे तेच तर आतापर्यंत सांगत होतो. खरे म्हणजे त्याच्याही पुढच्या श्लोकांचा अर्थ सांगून झाला. ऐक पुन्हा म्हणतो.
वैदिकं लौकिकं चापि छन्दो द्विविध मुच्यते
मात्रावर्णविभेदेन तच्चापि द्विविधं पुनः
मयौ रसौ तजौ भन्नौ गुरुर्लघुरपि द्विज
कारणं छंदसि प्रोक्ताश्छंदः शास्त्रविशारदैः
सर्वगो मगणः प्रोक्तो मुखलो यगणः स्मृतः
मध्यलो रगणश्चैव प्रात्यंगः सगणो मतः
तगणोऽन्तलघुः ख्यातो मध्यगो जो भणादिगः
त्रिलघुर्नगणः प्रोक्तस्त्रिका वर्णगणा मुने
ब्रह्मा, सनंदन ऋषि मला सांगतात की छंदांचे वैदिक आणि लौकिक असे दोन भाग आहेत. त्या दोघातही मात्रा आणि वर्णानुसार पुन्हा दोन प्रकार असतात. म्हणजेच मात्रावृत्त आणि गणवृत्त.
म य र स त ज भ न तसेच गुरु आणि लघु हे दोन असे हे दहा गणच वेगवेगळ्या छंदांना कारणीभूत आहेत असे काव्यशास्त्राचे ज्ञानी सांगतात.
ब्रह्मा, नंतरचे दोन श्लोक गणांची व्याख्या सांगतात. 'सर्वगो मगणः प्रोक्तो' म्हणजेच गणातील तीनही अक्षरे जर गुरु असतील तर त्याला 'म' गण म्हणतात. 'मुखलो यगणः स्मृतः' अर्थात् गणाच्या मुखाशी म्हणजेच पहिले अक्षर जर लघु असेल व बाकीचे दोन्ही गुरु असतील तर 'य' गण आहे असे समजावे. दोन बाजूला गुरु आणि मध्ये जर लघु असेल तर र. पहिले व दुसरे अशी दोन्ही अक्षरे ल असतील तर स गण. गणाच्या शेवटी ल, आधी दोन ग असतील तर त गण. फक्त मधलेच अक्षर ग असेल तर ज गण, सुरुवातीचे ग असेल तर भ गण. तिन्ही ल असतील तर न गण. असे वर्णगण आहेत असे सनंदन ऋषी मुनीला, म्हणजे मला सांगतात.
ब्रह्मा, सगळ्या गणांची व्याख्या दोन श्लोकात आली आहे बघ.
ब्रः आत्ता मला त्या 'मयौ रसौ तजौ भन्नौ' चा अर्थ कळला. मला वाटले की कवितेचा अर्थ दिसतो तसा नसतो आणि ती मयसभेसारखी मायावी असते म्हणून मयौ, कवितेत रस असतो म्हणून रसौ, कवितेत शब्दांचे तेज तळपते म्हणून तजौ, आणि कविता भन्नाट असते म्हणून भन्नौ असे असावे. पण ती नुसती म य र स त ज भ न, म्हणजेच य र त न भ ज स म अशा आठ गणांची यादी आहे. ते नारदपुराण पण तुझ्यासारखचं बंड दिसतं हं! भाषा येत नसली की काय काय अर्थ कळतात!
ना: ब्रह्मा, ही देवभाषा म्हणतात पण देवांनाच येत नाही. असो. तर ब्रह्मा, आता मात्र वृत्त शिकायची वेळ आली हं. मला सांग, सगळीच शिकायची की काही निवडकच?
ब्र: अरे सगळी. आपल्यापाशी खूप वेळ आहे. काही म्हणजे काही सोडायचे नाही. असून असून असणार किती? ७-८ तर भेंड्यांच्या मॅचमधेच होती. आणखी दहा-बारा असतील. त्यात काय धरायचे अन् काय सोडायचे!
ना: बरे बाबा. तर नारद पुराणात पुढे छंदांविषयी जे सांगितले आहे ते ऐक.
एकाक्षरात् समारभ्य वर्णौकैकस्य वृद्धितः
षड् विंशत्यक्षरं यावत्, पादस्तावत् पृथक् पृथक्
तत्परं चण्डवृष्ट्यादि दण्डकः परिकल्पिताः
त्रिभिः षड् भिः पदैर्गाथाः श्रुणु संज्ञा यथोच्तरम्
उत्यात्युत्त्का तथा मध्या प्रतिष्ठान्या सुपूर्विका
गायत्र्युष्णिगनुष्टुप् च बृहती पंत्त्किरेव च
त्रिष्टप् च जगती चैव तथातिजगती मता
शक्वरी सातिपूर्वा च अष्ट्यत्यष्टी ततः स्मृते
धृतिश्च विधृतिश्चैव कृतिः प्रकृतिराकृतिः
इत्येताश्छंदसां संज्ञाः प्रस्ताराद् भेदभागिकाः
ब्र: रामायण रामायण! नारदा, आता मला कळलं काकू भागवतपुराण ऐकताना वाती का वळतात ते. अरे एक अक्षर कळेल तर शपथ. पण पुण्य येत आहे, येत आहे, असं मात्र वाटत होतं. अगदी पवित्र पवित्र वाटत होतं. जरा अर्थ सांगा मुनिवर.
ना: ब्रह्मा, अर्थ तसा सोपा आह. सनंदन मुनी मला सागतात की छंद अनेक प्रकारचे असतात. एका पदात एक अक्षर असलेलेही असतात. दोन अक्षरे, तीन, चार असे सव्वीस अक्षरे पदात असलेलेही छंद असतात. त्याहीपेक्षा ज्यास्त अक्षरे असतील तर मग ते चंडवृष्टिप्रयात नावाच्या प्रकारात मोडतात. नंतर ऋषी अशा सव्वीस छंदांची नावे पण देतात. तसेच ह्या सर्व छंदात चार चरण असतात. कडव्यात तीन किंवा पाच चरण असले तर त्याला छंद न म्हणता गाथा म्हणतात. एक ते सव्वीस अक्षरांच्या छंदांची नावे अशी: उक्ता, अत्युक्ता, मध्या, प्रतिष्ठा, सुप्रतिष्ठा, गायत्री, उष्णिक, अनुष्टुप्, बृहति, पंत्त्कि, त्रिष्टुप्, जगती, अतिजगती, शक्वरी, अतिशक्वरी, अष्टि, अत्यष्टि, धृति, विधृति, कृति, प्रकृति, आकृति, विकृति, संकृति, अतिकृति, उत्कृति. ब्रह्मा, यातली शेवटची काही नावे श्लोकात नव्हती. ती मी इतर ग्रंथातून घेतली.
ब्र: पण नारदा, यात तू म्हणाला ते भुजंगप्रयात वगैरे कुठेच नाही. त्यात प्रत्येक चरणात बारा अक्षरे होती. पण इथे तर त्याला जगती म्हटले आहे. ते शार्दूलविक्रीडित पण कुठे दिसत नाही. इथेही पुन्हा सप्तद्वीप सप्तसमुद्रासारखाच प्रकार आहे काय? मला वाटलं आज कापूसकोंड्याची गोष्ट नव्हता सांगत तू.
ना: ब्रह्मा, जगतीमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक भुजंगप्रयात. पण बारा अक्षरी वृत्त अनेक आहेत. त्या पूर्ण कुळाचं नाव जगती. तसेच १९ अक्षरांचे चरण असलेली अनेक वृत्ते आहेत. त्या कुटुंबाचे नाव विधृति. त्यातलाच एक सदस्य शार्दूलविक्रीडित.
आता तू सांग, एक दोन तीन चार अक्षरे चरणात असतील, तर किती प्रकार प्रत्येकात होऊ शकतील. आपण आधी हा विचार केला आहे.
ब्र: नारदा, एकाक्षरी चरण असेल तर दोन प्रकार. कारण ते एक अक्षर लघु किंवा गुरु असू शकेल. दोन अक्षरे असतील तर चार प्रकार, कारण प्रत्येक अक्षर लघु किंवा गुरु असू शकते. तीन अक्षरे असतील तर आठ प्रकार. चार असतील तर सोळा. पाच अक्षरे असतील तर त्या वृत्तकुटुंबात बत्तीस प्रकार. सहा असतील तर चौसष्ट. सात असतील तर १२८. आठ असतील तर २५६. नऊ असतील तर ५१२, दहा असतील तर १०२४. अकरा असतील तर २०४८, बारा असतील तर ४०९६. म्हणजे, भुजंगप्रयातच्या कुटुंबात ४०९६ सदस्य. तो त्यातला एक मेंबर. बापरे!
ब्र: होय ब्रह्मा. अशी २६ कुटुंबे. व कुटुंबांचा आकार असा दुप्पट दुप्पट होत जातो. या सगळ्यांची बेरीज केली तर जी येईल तितके गणवृत्त कवितेत असतात. बारा अक्षरापर्यंत तू सांगितलेच. आता सव्वीसपर्यंत मी देतो बघ.
१३ अक्षरे : ८१९२
१४ अक्षरे : १६३८४
१५ अक्षरे : ३२७६८
१६ अक्षरे : ६५५३६
१७ अक्षरे : १३१०७२
१८ अक्षरे : २६२१४४
१९ अक्षरे : ५२४२८८
२० अक्षरे : १०४८५७६
२१ अक्षरे : २०९७१५२
२२ अक्षरे : ४१९४३०४
२३ अक्षरे : ८३८८६०८
२४ अक्षरे : १६७७७२१६
२५ अक्षरे : ३३५५४४३२
२६ अक्षरे : ६७१०८८६४
आणि बेरीज केली तर एक ते सव्वीस अक्षरांचे चरण असणाऱ्या कवितांच्या वृत्तांचे एकूण प्रकार किती ते सांग बघू.
ब्र: मला माहीत आहे. पण मी नाही सांगत जा. कविता शिकवतो म्हणता म्हणता तू गणितावर आला. मला गणित आवडते. पण हा आकडा कसा सांगावा ते मला माहीत नाही.
ना: अरे आकड्यातले आकडे सांग. हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष यांच्या पलिकडे काय असते ते आपण नंतर कधी पाहू. तेही नारदपुराणात आहे. गणितावर तर मोठा अध्याय आहे. उद्या तो वाचू. सांगता येत नसेल तर लिही इथे टेबलवर. काय?
ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! टेबलवर नाही लिहीत आता आयुष्यात कधी. तू ऐक, मी सांगतो. १३४२१७७२६.
ना: ब्रह्मा बरोबर. तेरा कोटी बेचाळीस लाख सतरा हजार सातशे सव्वीस. इतकी गणवृत्ते सव्वीस किंवा कमी अक्षरेच जर एका चरणात असतील तर तयार करता येतील. गणितात खरेच तुझा कोणी हात धरू शकत नाही. पण तू इतक्या लवकर इतके मोठे गणित कसे सोडवले?
ब्र: अरे मला चार चार प्रोसेसर्स आहेत. चार डोके. पॅरॅलल काँप्यूटिंग म्हणतात याला. सुपरकाँप्यूटर आहे मी अगदी ओरिजिनल.
ना: काय ब्रह्मा, ठीक आहेस ना? काय बोलतोस तू? मग तर आपण खूप पुढे जाऊ शकतो.
ब्र: नारदा, कां ते मला माहीत नाही. पण गणित मला ताबडतोब सुटते हे खरे. कालच मी सुपरकाँप्यूटरबद्दल वाचत होतो. तेव्हा मला माझे हे गुपित कळले. चार तोंडांचा काही तर फायदा. नाहीतर आजपर्यंत फक्त त्रासच व्हायचा त्यांचा. अरे झोपावं कसं माणसानी? कसही झोपलं तरी एक तोंड उशीतच जातं.
ना: हं. हे माझ्या लक्षातच नाही आलं. बरं झालं मी तुझ्यावर नाही गेलो. असो. तर ब्रह्मा सुरू करायचा का एका एका वृत्ताचा अभ्यास? नारायण नारायण!
ब्र: नको रे बाबा. अभ्यास संपेपर्यंत कलियुग संपेल. मग मला आठवा मनू आणावा लागेल. रामायण रामायण! भराभर आटोप. महत्त्वाचे, नित्याच्या वापरातलेच छंद घे. तेवढे पुरे आपल्याला भ्रमरपुराण लिहायला.
ना: ठीक आहे. आपण एकदम अष्टाक्षरी छंदापासून सुरू करू. हे सगळे अनुष्टुप् नावाच्या छंदात मोडतात. याचे २५६ प्रकार आहेत हे आपण आधीच पाहिले आहे. त्यांना वेगवेगळी नावे पण प्राचीन ग्रंथात दिली आहेत. विद्युन्माला, चित्रपदा, नगस्वरूपिणी, समानिका, श्लोक वगैरे. आपण गीतेचा श्लोक म्हणतो तेव्हा श्लोक हे अनुष्टुप् छंदाच्या एका प्रकाराचे नाव आहे हे विसरून जातो. प्रत्येक चरणात पाचवे अक्षर लघु, सहावे गुरू हवे. पहिल्या व तिसऱ्या चरणात सातवे अक्षर गुरु व दुसऱ्या व चौथ्यात ते लघु असले पाहिजे. बाकी अक्षरांवर काही बंधने नाहीत. एवढी शिस्त पाळली की झाला श्लोक नावाचा छंद.
ऊर्ध्वमूलमधः शाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्
बघ तपासून. गीतेचा श्लोक. अगदी श्लोक छंदाच्या साच्यात बसणारा.
ब्र: खरेच. हा श्लोक छंद आहे. असेच बाकीचे गीतेचे श्लोक असतील. सातशे आहे म्हणतात. मी तपासून पाहीन. आता आपल्या खोलीत गीता पण आहे.
ना: आता हे तुझे आवडते पद बघ. सांग काय वृत्त आहे ते.
मयौ रसौ तजौ भन्नौ गुरुर्लघुरपि द्विज
कारणं छंदसि प्रोक्ताश्छंदः शास्त्रविशारदैः
ब्र: अरे हाही श्लोकच आहे. नारद पुराण सारे अशा श्लोक छंदातच की काय?
ना: होय ब्रह्मा. नारद पुराणात एकूण पंचवीस हजार श्लोक आहेत. भागवत पुराणात अठरा हजार. अठरा महापुराणे मिळून चार लाखावर श्लोक आहेत. इतर प्राचीन ग्रंथही धरले तर लाखो कविता अनुष्टुप्, आणि त्यातल्याही त्यात श्लोक छंदात आहेत. हा विक्रम दुसरे कुठलेही वृत्त तोडेल हे अशक्य. आपण ब्रह्मपुत्र पुराणात समजा आर्यावृत्त वापरले तरी वापरून वापरून किती वापरणार? किती आर्या लिहायचा विचार आहे तुझा?
ब्र: नारदा, तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा! अरे. आधी लिहू तर दे. सुरुवात तर करू दे. आधी केले, मग सांगितले. करायच्या आधीच काय जाहिरात?
ना: बरे बाबा! लिहू फारच फार तर एक हजार कडवे. आता आपण एकदम एकादशाक्षरी चरण असणाऱ्या कवितांकडे वळू. ब्रह्मा, अकरा अक्षरी चरण असणाऱ्या कवितांमध्ये इंद्रवज्रा नावाचे वृत्त प्रसिद्ध आहे. याचे गण आहेत ततजगग. त आणि ज मधे तसा फारसा फरक नाही. त म्हणजे गगल आणि ज म्हणजे लगल. इंद्रवज्राचे उदाहरण बघ.
निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैर्गच्छंत्यमूढाः पदमव्ययं तत् ।।
गीतेत या वृत्ताचाही बराच वापर आहे. तपासून बघ ततजगग.
ब्र: अगदी फिट्ट बसते हे ततजगग मध्ये. हेच वृत्त इंद्रानी हनुमानावर फेकले होते का रे?
ना: ती कापुसकोंड्याची गोष्ट तूच सांग मला. मला नाही माहीत. ब्रह्मा, ततजगग ऐवजी जतजगग असेल तर त्याला उपेंद्रवज्रा वृत्त म्हणतात. काका बरेचदा म्हणतात बघ.
त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देवदेव
ब्र: हं. नारदा दोन वृत्तात फक्त पहिले अक्षरच काय ते वेगळे. एकात ते गुरु, एकात ते लघु. चालही दोन्ही वृत्तांची एकसारखी. अगदी जुळे वाटावे असे.
ना: होय ब्रह्मा. म्हणूनच यांच्यासारखेच आणखी अनेक वृत्त आहेत. चार चरणांपोकी पहिले व तिसरे इंद्रवज्राचे, व दुसरे चौथे उपेंद्रवज्राचे वापरले तर उपजाती नावाचे वृत्त होते. असेच आणखी अनेक वृत्त. तसेही अकरा अक्षरी गणवृत्तात २०४८ प्रकार असतात हे तुला माहीतच आहे. दोनचारच आपण पाहिले.
ब्र: मी करून पाहीन बाकीच्या दोन हजार चौरेचाळीस एकादशाक्षरी वृत्तात कविता. आता बारा अक्षरी वृत्त सांग एखादे.
ना: तूच सांग एखादे माहितीतले. तुला कमीतकमी २०५ अशी कडवी माहीत आहेत ज्यांचे चारही चरण बारा अक्षरी असतात.
ब्र: हं. उद्या लग्न आहे. भुजंगप्रयात. यययय.
ना: खूप सोपे, व खूप वापरातले हे वृत्त. आपल्या खोलीत 'मनाचे श्लोक' नावाचे एक पुस्तक आहे बघ. त्यातही २०५ कडवी आहेत. खरे म्हणजे ते श्लोक वृत्तात नाहीत. भुजंगप्रयात वृत्तात आहेत. पण श्लोक म्हणतात खरे. खरे श्लोक म्हणजे गीतेचे, नारदपुराणातले. असो. नारदा, कविता करणे सुरू करायला हे सोपे वृत्त आहे रे. कर एखादे कडवे.
ब्र: जशी आज्ञा!
मला चार तोंडे, तुला लांब शेंडी
हहाहा हिहीही डडाडा डिडीडी
जरी दृश्य नाही, जरी सत्य नाही
डडाडा डिडीडी हहाहा हिहीही
ना: एकदम छान. अगदी वृत्तबद्ध. कविता अशीच करतात. जिथे शब्द आठवत नाही तिथे गण जुळतील असा वायफळ शब्द ठेवायचा. मग आपल्याला अभिप्रेत अर्थ असलेला शब्द शोधायचा व टाकायचा त्या साच्यात. आपल्या शब्दसंपत्तीची अनायासेच छान उजळणी होते. आणि मग हवा तसा शब्द सापडला की ब्रह्मानंद!
ब्र: नारदा, २०४८ पैकी हा एक छान प्रकार झाला. आणखी असेच गोड चालीचे काही द्वादशाक्षरी वृत्त आहेत का रे?
ना: ब्रह्मा, यययय जर वृत्त असू शकते, तर रररर का नाही? कर प्रयत्न. र म्हणजे गलग म्हणजे गुरु-लघु-गुरु. म्हणजे तुझ्या भाषेत डाडडा.
ब्र:
नारदा नारदा नारदा नारदा
हे तुझे वागणे काय रे नारदा
ना मला आवडे, ना तुला शोभते
लाज रे डाडडा डाडडा वाटते
ना: बघ कशी ठसकेदार चाल आली. या वृत्ताला स्रग्विणी म्हणतात. आता आणखी काही तूच सुचव, तूच गण ठरव. तूच कविता कर. तू गणाधीश होत आहेस आता.
ब्र: हं. यययय झालं. रररर झालं. आता सससस पाहू. स म्हणजे लघु-लघु-गुरु. डडडा.
डडडा डडडा डडडा डडडा
डडडा डडडा डडडा डडडा
छान ठेका येईल नारदा. करता येईल कविता. तू सांग ना काही.
ना: ब्रह्मा, या द्वादशाक्षरी वृत्ताला तोटक म्हणतात. मला एक खूप छान कविता माहीत आहे या तोटक वृत्तावर आधारित. ऐक.
अधरं मधुरं वदनं मधुरं
नयनं मधुरं हसितं मधुरं
ह्रदयं मधुरं गमनं मधुरं
मधुराधिपतेरखिलं मधुरं
ब्रह्मा, असेच सजसस गण असतील तर प्रमिताक्षरा वृत्त, ममयय गण असतील तर वैश्वदेवी वृत्त, ततजर असतील तर इंद्रवंशा वृत्त, जतजर असतील तर वंशस्थ वृत्त, नभभर असतील तर द्रुतविलंबित वृत्त. हे व अन्य द्वादशाक्षरी वृत्त वापरून केलेल्या संस्कृत कविता प्राचीन ग्रंथात सापडतात. ब्रह्मा हे सगळे द्वादशाक्षरी वृत्त जगति छंदप्रकारात मोडतात हे तुला माहीतच आहे. छंदशास्त्रात आणखीही याच कुटुंबातले अनेक वृत्त आहेत. नावे सुद्धा सुंदर ठेवलेली आहेत. कुसुमविचित्रा, चंचलाक्षिका, कान्तोत्पीडा, वाहिनी, नवमालिनी, प्रमुदितवदना, प्रियंवदा, मणिमाला, ललिता, मोहितोज्ज्वला, प्रभा, मालती, वगैरे वगैरे. प्रत्येकाला सुंदर चाल.
ब्रह्मा, कवितेचे छंद आणि संगीत यांचे म्हणूनच फार जवळचे नाते आहे. आठ गण आणि सात सूर मिळून विश्व निर्माण करू शकतात. ब्रह्मा, मला तर वाटते की तू गायन शिकायला हवे. तू काय काय गाऊ शकशील! नवे नवे राग निर्माण करू शकशील. तू एकटाच असा गायक होशील जो एकल, युगल, समुहगीत, कोरस सगळ काही स्वतःच गाऊ शकतो. चार तोंडांनी चार आवाज. चार तोंडे एकसाथ गातील तर तू सवाई तानसेन होशील.
ब्र: हं, चला पुढे. त्रयोदशाक्षरी वृत्ताकडे. कुलनाम
अतिजगती. एकूण प्रकार ८१९२.
ना: ब्रह्मा, तेरा नको रे. तेराचा आकडा अशुभ मानतात. काकाकाकूंच्या घरी नेमकं त्रयोदशाक्षरी वृत्त नको. चौदाही नको. आपण सरळ पंधराकडे वळू. हे छंदकुटुंब अतिशक्वरी नावानी प्रसिद्ध आहे. त्यात ३२७६८ प्रकार आहेत. मालिनी नावाचं वृत्त प्रसिद्ध आहे. ननमभभ याचे गण.
टटटट टटटाटा टाटटा टाटटाटा
ब्र: हं. ते करुणाष्टक या वृत्तात होते. पण तू तर तेव्हा हे अनुष्टुभ वृत्त आहे म्हणाला होतास.
ना: अरे माझी ती चूक होती. तू बरी पकडलीस. पण आता तू मालिनी वृत्त वापरून एक कविता कर बघू.
ब्र:
मज तुज अति भावे रोज कापूसकोंड्या
अढळ ध्रुव कधी वा, वा कधी छान भेंड्या
अचपळ मन माझे नावरे आवरीता
गणित मजसि यावे, नारदा तूच त्राता
ना: अरे वा! पूर्ण कडवे केलेस. थोडे वाङमयचौर्य आहे. पण चालेल. व्हेरी गुड!
ब्रह्मा, पंधरा अक्षरी वृत्तात आणखी एक मजेशीर वृत्त आहे. नाव मला आठवत नाही. शोधू पुढे कधी. भेंड्यांच्या वहीत ही कविता होती. आणि ल अक्षर आले की मास्तरांची मुले मोठ्या ठसक्यात ही कविता म्हणायची.
लेह्य पेय चोश्य खाद्य भक्ष भोज्य आणिती
जे जयासि आवडे तयासि तेचि वाढिती
प्रीतिपाद्य बद्धहस्त काैंडणेश लाघवी
स्वस्थ चित्त जेविजे, विवाहियास वीनवी
म्हणजे रजरजर. र गण म्हणजे गलग. ज म्हणजे लगल. म्हणजेे प्रत्येक चरणात अक्षरांचा क्रम गलगलगलगलगलगलगलग. आलटून पालटून गुरु आणि लघु. ही कविता म्हटली की अक्षरशः टाळ्या पडायच्या. तू कर बघू एखादी कविता.
ब्र:
तू मुनी असा कसा, सदैव त्रास देतसे
काय ते तुझे खट्याळ हासणे मला दिसे
मी तुझा पिता जरी, अनादि मी अनंत मी
तीन लोक फक्त तूच रे ध्वजास नेतसे
ना: आता सोळा अक्षरी वृत्त. कुलनाम अष्टि. एकूण प्रकार ६५५३६. पण ते जाऊ दे. तू थकलेला वाटतोस. सतरा अक्षरी बघू. वृत्तसमुदायाचे नाव अत्यष्टि. एकूण प्रकार १३१०७२. त्यातले एक वृत्त खूप प्रसिद्ध. तू रोज ऐकतोस काकाकाकूंना विष्णुसहस्रनामातलं हे पद म्हणताना. आहे आपल्या खोलीत ते पुस्तक पण.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं
याचे गण मभनततगग. मंदाक्रांता नाव आहे या वृत्ताचे. खूप सुंदर चाल. एक शिखरिणी नावाचे वृत्त पण असेच सुंदर आहे. यमसनभलग.
उभा राहे एके चरणि धरणीते धरुनिया
तपश्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनिया
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेचि फसती
परी ज्ञाते त्याचे कपट लवलाही उमजती
आता माझी एक स्वरचित कविता ऐक याच शिखरिणी वृत्तातली.
कसा तू भोळा रे, तुज न उमगे भेद मनिचा
कसा तू ब्रह्मा रे, तुज न शिवला गर्व कणिचा
कसा तू देवा रे, नच तुज असे गंध इथला
इथे सारे काळे, तुज परि दिसे शुभ्र धवला
ब्रह्मा, सतरा अक्षरांचे आणखी एक वृत्त प्रसिद्ध आहे. नाव पृथ्वी. गण जसजसयलग. तू ऐकलं पण आहेस. जंतुकवीच्या बालवेदात चंद्रिका म्हणून एक कविता याच वृत्तात होती. आठवते का? यालाच वसंततिलका म्हणतात काही जण बहुधा. तशाच चालीवर आणखी एक कविता मला अर्धीच आठवते.
अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे
ब्र: माहीत आहे. चाल खूप आवडली म्हणून मी पण या चालीवर कविता करायचा प्रयत्न केला होता.
मुनी तव शिरी उडे भुरभुरी तुझी शेंडिका
कका किककिकी कका किककिकी ककाका कका
चाल खूप प्रसन्न. आता अठरा अक्षरी वृत्त सांग.
ना: त्याहीपुढे जाऊ. एकोणीस अक्षरी. अतिधृति गटातले वृत्त. एकूण ५२४२८८ प्रकार. एक फार प्रसिद्ध. तुझ्या आवडीचं. शार्दूलविक्रीडित.
ब्र: हं माहीत आहे. मसजसततग. मंगलाष्टकांचं वृत्त. मी एक कडवे करून पाहिले होते. अर्धवटच राहिले.
आहे पृथ्विवरी अनेक गमती भावे पहाया मला
वाटे वाचुनि सत्वरी समजु या, 'मी कोण' सांगा मला
नाही सत्य, न देव मी, मनुज हा कां मानतो रे मला
लालाला ललला लला लललिला कां नारदाला मला
ना: छान. पण ब्रह्मा तुला कंटाळा आला आहे असे वाटते. झोप येत असेल कदाचित. महत्प्रयासाने तू जांभई जिरवत आहेस. ते फार धोक्याचे रे बाबा. ब्रह्मजांभई उफाळून आली तर काळ पुढे जाईल. कलियुगच संपेल एखाद्या वेळेला. सातव्या मनूचं मानवांतर संपेल. ताबडतोब आठवा मनू अरेंज करावा लागेल तुला. तू सांग, पुढे जायचं, की थांबायचं?
ब्र: यययय
नको फार आता, पुरे रे पुरे रे
मला झोप येते, असा तू कसा रे
उद्या सांग पुन्हा, तुला काय घाई
उद्या सूर्य येईल, कल्पांत नाही
ना: वा ब्रह्मा! तू आता खरोखरच कवी झालास. तुला वृत्तज्ञान आले. छंदशास्त्र समजले. आता खरेच पुरे. शुभरात्री!
_____________________
No comments:
Post a Comment