गोष्ट दहावी
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती
राहिले न वेगळाले
ना: काय ब्रह्माजी, आज सकाळी सकाळी हे काय गुणगुणता?
ब्र: अरे सहज. काल काकाकाकू मनोभावे एक धारावाहिक बघत होते. मीही पाहिले घटकाभर. त्याचे हे गीतकण अडकून राहिले मनाच्या दाढेत. रात्रभर गणवृत्त आहे की मात्रावृत्त ते तपासून बघत होतो. गोंधळून गेलो. सकाळी सकाळी ओठातून तेच शब्द बाहेर आले एवढेच.
ना: ब्रह्मा, हे गीत म्हणताना सर्वत्र लघुचा उच्चार दीर्घ आहे. म्हणून तो गुरु होतो. मन म्हणायच्या ऐवजी आपण मऽनऽ असे नकळत म्हणतो. आपण कसे म्हणतो हे लक्षात घेतले तर ही कविता अशी वाटेल.
माझे मऽनऽ तूझे झाले
तूझे मऽनऽ माझे झाले
मऽना मऽनाचीये गुंती
राहीले नऽ वेगऽळाले
असे हेल काढत काढत आपण हे गीत म्हणतो. येलपाड्या म्हणेल ती वाड्यातली म्हातारी आपल्याला. पण असे करतो म्हणून त्याला चाल व लय येते. नाहीतर हे कडवे गणवृत्ताच्या वा मात्रावृत्ताच्या साच्यात बसत नाही. उच्चाराप्रमाणे जर लघुला गुरु धरले व मोजले तर मग हे ममगग गण असलेले अष्टाक्षरी वृत्त म्हणायला काही हरकत नाही. ब्रह्मछंद नाव आहे ह्या छंदाचे.
ब्र: खरेच? माझ्या नावाने पण छंद? हा सगळ्यात पहिले निर्माण झालेला छंद की काय? हिरण्यगर्भातून माझ्याबरोबर निघालेला अजन्मा छंद की काय?
ना: नाही रे ब्रह्मा! गंमत केली. याला थाप मारणे म्हणतात. द्यायचे खोटेनाटे धडक ठोकून. फार आवश्यक आहे ही कला भारतवर्षात. पुराणकालापासून. तुला मात्र आता छंदाचा छंद लागला आहे. तू छांदिष्ट झाला आहेस. आणि तसेही तेरा कोटी छंदांमधे एखादा छंद आपण आपल्याही नावाने खपवला तर कुठे बिघडते? थोडी काटछाट जोडजाड केली तर नवा छंद सुद्धा होऊ शकतो. वरच्या कडव्याच्या प्रत्येक चरणातून दोन दोन अक्षरे काढून बघ. अर्थ न बदलता दुसरा छंद तयार होतो. करून बघ गंमत.
माझे मऽनऽ तूझे
तूझे मऽनऽ माझे
मऽनाचीये गुंती
नाही वेगऽळाले
हे झाले मम गण असलेले षष्ठाक्षरी वृत्त. याला पण छान चाल आहे. शेवटच्या ओळीतले आणखी दोन शब्द आपण जर काढले तर अगदी अभंगाची चाल येईल याला.
देवाचीये द्वारी
उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी
साधियेल्या
हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना
कोण करी
ब्रह्मा, ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातले हे अभंग. काय सुंदर चाल आहे. आपल्याला असे काही कधी लिहिता येईल का रे? मला नाही वाटत. असो.
ब्र: नारदा, चाल सोड. विचार सुद्धा किती छान. फक्त क्षणभर देवाच्या द्वारी उभे राहिले तरी उद्धार होतो असे सांगतात. म्हणजे त्यासाठी मोठमोठे यज्ञ करायला नको. तासनतास भागवत सप्ताहात बसायला नको. यात्रेला जायला नको. जागृत देवस्थाने धुंडाळायला नको. नवस सायास करायला नको. म्हणजे अंधश्रद्ध लोकांची कानपिळीच दिसते. फक्त तुझ्यासारखे तोंडानी हरीनाम घ््यायचे मधून मधून. नारायण नारायण. म्हणजे मोक्षप्राप्ती.
त्या जंतुकवीची पण एक कविता आहे आध्यात्मावर. बालवेदातली कविता.
वाती वळता वळता कीर्तन कानावरून गेले होते
जाते वळता वळता ओठी श्लोक मनाचे चालत होते
कणिक मळता मळता चिंतन स्मरण नेहमी त्याचे होते
पुऱ्या तळता तळता मंथन गीतेच्या श्लोकांचे होते
दही घुसळता घुसळता नकळत चित्त गोकुळी गेले होते
धुणे दगडावर आपटता मन कंसावर चिडले होते
भांडी घासता घासता सहस्रनामाचे पारायण होते
रांगोळीच्या ओळी रेखत मन लक्ष्मणरेषेत होते
हात कामात गुंतले असता मन आध्यात्मी रमले होते
भले आध्यात्माने केले की कामाने माहित नव्हते
आजच्यासारख्या रिकामटेकड्या आध्यात्माचे वावडे होते
हात आमच्या आजीचे कधी माळेचे मणी ओढत नव्हते
नारदा, पुण्याची गणना बिणना कोणी करीत नाही असे पण म्हणतो रे हा ज्ञानियांचा राजा. म्हणजेच चित्रगुप्त वगैरे कोणी नाही. माझा तो मानसपुत्र, तुझा भाऊ नाही म्हणजे तू नाही, मी नाही. आपण सारेच काल्पनिक. हेही सत्यकथन मला आवडले ज्ञानेश्वरांचे.
ना: बरोबर. आध्यात्माच्या नावाखाली बोकाळलेल्या कर्मशून्यतेवर हा सरळ सरळ प्रहार आहे. ब्रह्मा, मी त्या विज्ञानसंस्थेत जात होतो हे तुला आठवतच असेल. बर्डीच्या गणपतीला जातांना मी तुला एकदा दाखवले होते. त्याच्या बाजूलाच नागपूर विश्वविद्यालय आहे. त्याला आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणतात. तेच तुकडोजी महाराज विचारतात
देव एका जागी जागृत
दुसरे जागी काय ते भूत?
देव सर्वत्र आहे म्हणणारेच जागृत देवस्थाने शोधतात, तिथे जाऊन नवस करतात मुलगा व्हावा म्हणून. नाही झाला तर स्वतःला दोष देतात, झालाच तर देव नवसाला पावला म्हणतात. मजा मजा असते बघ. यांचेच राष्ट्रसंत तुकाराम महाराज जे म्हणतात ते हे भाविक लोक विसरून जातात आणि त्यांच्याच लाडक्या पंढरीच्या रायाला नवस करतात, साकडे घालतात.
नवसे कन्यापुत्र होती
तरी का करणे लागे पती
आहे की नाही गंमत? किती छान प्रश्न विचारला आहे तुकोबांनी अंधश्रद्ध लोकांना!
ब्र: नारदा पुरे. खरे म्हणजे देव आहे हे मानणे हीच अंधश्रद्धा आहे. तुला मला हे माहीत आहे. मलाही आता पुराणांऐवजी संतवाङमय वाचावे की काय आपण असे वाटायला लागले आहे. त्यात आहे का रे विश्वोत्पत्तीची कथा? मी कोण हे मला त्यात सापडेल का? पण ते राहू दे. तू त्या षष्ठाक्षरी छंदाबद्दल बोलत होता. काय नाव त्याचे?
ना: आपले विषयांतरच फार होते रे. असो. तर या षष्ठाक्षरी वृत्ताचे नाव आहे नारद. ममगग मधून समोरचे मम विभक्त झाले. ब्रह्माच्या भालप्रदेशातून ब्रह्मपुत्रोत्पत्ती झाली तसेच काहीसे. ब्रह्मवृत्ताचा मानसपुत्र, म्हणून नारदवृत्त. नारदवृत्त म्हणजे ब्रह्मवृत्ताचेच प्रत्यंग. तोच अर्थ. तोच विचार. तेच मन. नावही म्हणूनच नारद छंद. याचे गण मम. पुजेत गुरुजी मधून मधून काकांना 'मम' म्हणायला सांगतात आणि ते म्हणतात तसेच याचेही गण. मम.
ब्र: नारदा, ही मात्र चेष्टा हं. पण तू माझा मानसपुत्र आहे हे मात्र खरे. तुझ्या आणि माझ्या मनात बरेचदा एकच विचार येतो. मला तुझ्या मनात काय आहे हे सहज कळते. तूही माझ्या मनात काय आहे ते हमखास हेरतो. आपली मने एकच की काय असे बरेचदा वाटते. की आपली मनेही आपल्यासारखीच पारदर्शक आहेत रे? आरपार बघून घ््या कोणीही? तूही आज नेमका विश्वोत्पत्तीचा विचार कसा केला? तुला पुन्हा उत्पत्ती कशी आठवली? माझ्याही मनात रात्रभर तोच विचार येत होता अधूनमधून. काय झाले असावे त्या विश्वोत्पत्तीच्या क्षणाला? माझ्या मनात तो विचार आला म्हणून तुझ्या मनातही उमटला की तुझ्या मनात तो आधी आला म्हणून माझ्या मनात उपजला? की रात्री तू चोरून माझ्या मनात शिरतोस? नारदा, ममगग पासून मम आले की मम पासून ममगग झाले? ममगग आधी की मम आधी? पण काहीही असले तरी काय बिघडले? काय फरक पडतो आपल्याला?
ना: नाही ब्रह्मा! कशाचीही सुरुवात कशी झाली हे फार महत्त्वाचे आहे. तू काकूंचा जप ऐक. आणि सांग त्या काय म्हणत आहेत ते.
ब्र: मरा मरा मरा मरा म्हणत आहेत.
ना: ब्रह्मा, त्या राम राम राम राम म्हणत आहेत. त्यांनी जप सुरू करतांना 'रा'पासून सुरू केला हे मला माहीत आहे. सुरुवात कुठून झाली हे माहीत नसले तर मरा मरा मरा मरा ऐकू येईल. म्हणूनच सुरुवात कशी झाली हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. म्हणून मला नेहमी विश्वोत्पत्तीची खरी कथा जाणून घ््यायची असते. सुरुवात खूप महत्त्वाची असते ब्रह्मा. तिचे ज्ञान हवे. काका नामस्मरण करतात बघ. सांग काय म्हणतात ते.
ब्र: ठलविट् ठलविट् ठलविट् ठलविट् म्हणतात असे वाटते.
ना: ती त्यांची पोरही काहीतरी घोष करते आहे बघ. सांग काय म्हणत असावी.
ब्र: अरे त्यात काय कठिण? यमाचा धावा करते आहे. यमा यमा यमा यमा यमा यमा यमा यमा.
ना: तेच म्हणतो आहे मी ब्रह्मा. सुरुवात कशी झाली हे फार महत्त्वाचे. काका विट्ठल विट्ठल म्हणत असावे. जपाची सुरुवात 'वि' पासून झाली होती. पोर विट्ठल माउलीला माय माय म्हणत असावी. जप 'मा' पासून सुरू झाला, 'य' पासून नाही. जपाला सुरुवात कुठे झाली हे माहीत असायला हवे. म्हणून मला विश्वोत्पत्तीची कथा जाणून घ््यायची आहे. रुद्राक्षाच्या माळेत सुद्धा सारे मणी सारखे असले तरी एक मोठा असतो. तो पहिला मणी. मेरुमणी! तिथून जप सुरू होतो. विश्वमाळेतला पहिला मणी तू. विश्वोत्पत्तीची कथा फक्त तूच सांगू शकतो. आधी काय झाले? आधी कोण आले? त्याने काय केले?
ब्र: अरे हाच तर मला बरेच दिवसापासून प्रश्न पडला आहे. काकूंना दही लावताना मी रोज रात्री पाहतो. थोडे कुणकुण दूध घेऊन त्यात चमचाभर दही टाकायचे, त्याच चमच्याने ढवळायचे व झाकून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घट्ट दही तयार. त्याच दह्यातले चमचाभर दही दुसऱ्या दिवशी विरजण म्हणून नव्या दुधात वापरायचे. असेच दिवसानुदिवस, वर्षानुवर्ष चालते. घरात आधी दही असल्याशिवाय नवे दही होत नाही. घरात नसेल तर बरेचदा शेजारी मागून आणावे लागते. दह्याशिवाय विरजण नाही. विरजणाशिवाय दही नाही. नारदा, मला प्रश्न पडतो की अगदी सुरुवातीला, जगातले पहिले वहिले विरजण लावायला दही कुठून आले असावे. दे पाहू उत्तर.
ना: ब्रह्मा, आज सकाळी कोंबडी आरवली आणि मला एक प्रश्न पडला. कोंबडी अंडे देते. अंड्यातून कोंबडी येते. ती मोठी होते आणि अंडे देते. अशा कोंबड्यांच्या पिढ्यानपिढ्या उलटतात. पण सुरुवात, आरंभ कुठून झाला? आधी अंडे आले की आधी कोंबडी. ती कशी आली? कोणी आणली. दे उत्तर.
ब्र: नारदा, त्यादिवशी आपण सीताफळ खातांना मी चुकून एक बी गिळली. मी खूप घाबरलो. पोटातून आता सीताफळाचे झाड नक्की येणार असे वाटले. किती विचित्र दिसले असते ते! मी अदृश्य, पण उदरोत्पन्न वृक्ष दिसला असता सगळ्यांना घरात वावरतांना. कसे दिसले असते ते? घरात झाड इकडून तिकडे जात आहे. वा! सुपर भानामतीच! केवढे घाबरले असते हे लोक! यज्ञ बिज्ञ करण्याआधी यांनी ते झाड बाहेर फेकले असते. माझे पोट त्यात अडकल्यामुळे मीही घराबाहेर. असो. बीचा वृक्ष होतो. वृक्षाला फळे येतात. फळात बीया असतात. बीया जमीनीत रुजतात. कोंब फुटतो, रोपटे वाढते, वृक्ष होतो, फळे येतात, बीया देतात. हे चक्र अव्याहत सुरूच आहे. पण पहिले काय आले? फळ की वृक्ष? कोणी आणले? कसे आणले? दे पाहू उत्तर.
ना: ब्रह्मा, उन्हाळ्यानंतर पाऊस पडला की कसे छान वाटते. पाऊस कां व कसा पडतो हा मला नेहमीच प्रश्न पडतो. मास्तर सांगायचे जलचक्र काय ते. ऊन तापते. समुद्राच्या पाण्याची वाफ होते. हलकी वाफ वर जाते. थंड हवेने ढग होते. वाऱ्यावर ती वाहत जाते. डोंगर तिला अडवतो. थंडीने ढगांचे पाणी होते. पाऊस पडतो. धरती भिजते. ओढे नाले पाणी वाहत नेऊन नदीला मिळतात. नदी वाहत वाहत समुद्रास मिळते. पाणी पाण्याला मिळते. पुन्हा ऊन, पुन्हा वाफ, पुन्हा ढग, पुन्हा पाऊस. पण पाऊस पडतो म्हणून समुद्रात पाणी की समुद्रात पाणी म्हणून पाऊस पडतो? सगळ्यात आधी कोण आले? ढगपाऊस की समुद्र? कोणी आणले? कसे आणले? दे उत्तर.
ब्र: नारदा, म्हणूनच मी म्हणतो की आपली मने एकच आहेत. एखादा विचार माझा की तुझा, प्रश्न मला पडतो की तुला, उत्तर तुला सुचते की मला हेच मला कळत नाही. सारी गुंतागुत झाली आहे. असो.
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती
राहिले न वेगळाले
ना: ब्रह्माजी, हा गुंता कोणी सोडवावा? सत्यशोध कोणी घ््यावा? सत्य सांगणारे पुराण कोणी लिहावे? अठरा पौराणिक पुराणांनी तर हा गुंता अधिकच वाढवलेला आहे. कोण लिहील नवे पुराण? कोण तो आधुनिक पुराणकार?
ब्र: होय नारदा. मलाही त्या पौराणिक पुराणातल्या पुराणकथा आवडतात, नाही असे नाही. माझ्याकरिता तेच पुरण. पचायला जड. पण भ्रमरपुराण मात्र आपण नक्कीच लिहायला हवे.
नारदा, जरा मला ओशाळल्यासारखं होत आहे रे. पण खरे सांगायचे तर काल रात्री मी थोडे लिखाण केले. आपल्या ब्रह्मपुत्र पुराणाचीच ती नांदी आहे काय हे तूच ऐकून सांग. पण मी वाचत असतांना तू समोर नको बसू. मला जरा लाज वाटते. संकोच वाटतो. पहिल्यांदाच मी काही लिहितो आहे. अगदी भुक्कड पण असू शकते. अगदीच टाकाऊ असू शकते. वाचताना माझा आवाजही कापतो. तू हासशील असे वाटते. तुझे ट्रेडमार्क 'नारायण नारायण' म्हणशील कदाचित. मी नाही वाचत जा. बरे असे कर, माझ्या पाठीमागे बसून ऐक. नजरेआड. पुढे नको.
ना: ब्रह्मा! तू रात्रभर लिखाण केलेले दिसते. कविता लिहिता लिहिता तुलाच तुझा विसर पडलेला दिसतो. अरे तुझी पाठ कोणीकडे? तू चतुर्मुख. चहूकडे तुझी नजर. ती मी कशी टाळू? चिंता नको करू. तू जे लिहिशील ते स्वानुभवाचे बोल आहेत. ते सुंदरच असतील. न भूतो न भविष्यति ब्रह्मकाव्य. ब्रह्मा, तुझीच तर रे ही सारी सृष्टी. तू प्रजापती. तुझ्यासारखा कवी नाही असे सुभाषित मी तुला म्हणून दाखविले होते. ते खरेच आहे. अरे, सृष्टिनिर्मात्याला, वेदनिर्मात्याला एक पुराणनिर्मिती म्हणजे डाव्या हाताचा मळ. वाच काय लिहिले ते. मीच तुझ्याकडे पाठ करून बसतो. मीच डोळे मिटतो. नाही पाहणार. नाही बोलणार. फक्त श्रवण करणार. तू कर सुरू. दिवसही उत्तम निवडलास. मास्तरांचा विश्राम सदुसष्ट वर्षांचा झाला आज. वाघोबा म्हणायचे त्याला लहानपणी. चल होऊ दे भ्रमरपुराणाचा श्रीगणेशा आजच्या दिवशी. म्हण, अथ प्रथमोध्यायः
ब्र: बरे बाबा! करतो हिंमत. नारदा. हे पुराणही इतर पुराणांसारखेच गुरुशिष्यसंवादरूप घेऊनच आले. कधी मी गुरु, तू शिष्य. कधी तू शिष्य, मी गुरु.
ना: व्हा सुरू ब्रह्माजी. अथ प्रथमोध्याय:
ब्र: जशी आज्ञा मुनिवर. ऐका तर!
नारद वदे-
देवा तूचि अजन्मा, बाकी सारी तुझीच रे सृष्टी
साक्षीदार असे तू विश्वोत्पत्तीस, ना मला भ्रांती
पदनत मी तुज ब्रह्मा, द्यावे मज ज्ञान ब्रह्मसृष्टीचे
केंव्हा, कोण, कसे तू केले उत्पन्न विश्व हे साचे
ब्रह्म वदे-
नारद देवर्षी तू, तूची केवळ त्रिलोक संचारी
सत्य तुझे नी माझे आहे एकच, तयास स्वीकारी
मानव मन उदरी मी जन्मा आलो असे कधी वाटे
तो माझा निर्माता आहे हे सत्य वा असे खोटे
मी मानव निर्माता, मनुची ती लेकरे कधी वाटे
मी त्याचा निर्माता आहे हे सत्य वा असे खोटे
पुत्रा रोज सकाळी कानी येते कुकूच्चकू तुजला
कोण जन्म दे तिजला, प्रश्न पडे मज, जसा पडे तुजला
वरवर विचार करता, अंडोत्पन्ना असे मनी येई
अंडोत्पत्ति कशी हो, प्रश्न झणी ये मनात दूजाही
अंड्याची ती जननी, अंडे फोडून ती स्वतः आली
त्या अंड्याची माता, त्यापूर्वीचीच कोंबडी झाली
कोंबडि अंडे कोंबडि अंडे कोंबडि अशी कडी पुत्रा
आधी ती की अंडे? प्रश्ना उत्तर मला हवे मित्रा
नारद वदे-
ब्रह्मा वंदन तुजला, प्रश्न पुन्हा नेतसे जगारंभा
साक्षीदार प्रभो त्या आद्यक्षणा तू, तुझी जगी आभा
काही जेथे नव्हते, तेथे हे जे दिसे कसे आले
तू आला सर्वाद्या, बाकी सारे तवकृपे घडले
माझे कुतुहल आता तुटे प्रभो खूप ताणुनी घेता
सांगावे ह्या पुत्रा पुण्यकथा निर्मितिक्षणाची त्वां
ब्रह्म वदे-
धीर असो देवर्षी, जन्म अजन्मा कुणी बरे दिधला
प्रश्नमूळ हे जैसे, वृक्ष फळा, फळ तसेचि वृक्षाला
सीताफळ वृक्षाच्या फांदोफांदी, बिया फळा माजी
बीला ऊब धरेची मिळता दे जन्म तीच वृक्षासी
वृक्ष जन्म दे बीजा, बीज असे गर्भ वृक्षजन्माचा
बीज, वृक्ष, बीज, पुन्हा वृक्ष कडी, कोण आद्य हो यांचा
नारद वदे-
वंदन पुनःपुन्हा तुज, वर्तुळ फिरुनी पुन्हा तिथे आलो
प्रश्न मूळ तैसाची, प्रदक्षिणा त्यास करुनिया आलो
जे दिसते नेत्रासी, ते आहे आज हे मला ठावे
पण ते कैसे आले, कोण करविता गणाद्य सांगावे
प्रश्न मूळ हा मजला, त्याचे उत्तर प्रभो मला द्यावे
कमलपाद, कमलाक्षा, कमलमुखा वंदनास मम घ््यावे
ब्रह्म वदे-
मानसपुत्रा माझ्या, प्रश्न न जगती नसे जया उत्तर
प्रश्नोत्तर ही जोडी ज्ञानोदर जन्म देत धरतीवर
प्रश्ना उत्तर असते, ज्ञानापोटीच हे जुळे वसते
बुद्धी, प्रयत्न, दृष्टी संगम ज्यामाजि त्यास ते दिसते
मार्तंडाची ऊर्जा सागरजल बाष्परूप आकाशी
शीतवायुवहनाने मेघोत्पत्ती नभात नित्याची
वायुरथी बसुनीया मेघनृप करित स्वैर संचार
पर्वतशिखरे त्याचा मार्ग अडविती, कसा अहंकार
मेघराज ईर्षेने गिरिशिखरोल्लंघनास वर जाती
थंड हवेने होई बाष्प पुन्हा जल, जडत्व ये त्यासी
वर्षा आकाशीची पाणी पुन्हा धरेवरी येई
ओहळ ओढे नि नद्या आता सर्वत्र वाहता दिसती
जल जीवन सृष्टीचे, वर्षा दैवी गमे चमत्कार
जीवपोष हे पाणी, आशीर्वच स्वर्गदान जलधार
नद्योघाला नित्यच ओढ असे सागरास मिळण्याची
सागर मोक्ष नदीचा, स्वर्ग तिचा तोच, ती सदा त्याची
सागरजल दे जन्मा मेघा, की मेघ सागरा जननी
कोण आद्यजन्मा हे सांगावे संप्रती सुजाण मुनी
नारद वदे-
अढळ प्रश्न तसाची, तारे त्याभोवती जणू फिरती
प्रश्न नदी ही आतुर मिळण्या जणु उत्तरा समुद्राशी
देव असो वा दानव, दिनरजनी आणि संधिकालाचा
साधक तू साधन तू, मातपिता तूच सर्व जीवांचा
शतशत प्रणाम तुजप्रत, अनुग्रह भक्ता तुझा हवा नित्य
कथन करावे देवा विश्वोपत्तीक्षणास मज सत्य
ब्रह्म वदे-
मुनी तुझा हा ध्यास पाहुनी
सत्यदेव होई प्रकट
नको मनी शंका इवलीही
जाणू आपण जे सत्य
सत्य काय जे दिसते डोळा
वा जे स्पर्शे आकलते?
किंवा जे पटते मनास जे
बुद्धीलाही झेपवते?
सत्य काय जे ग्रंथांमध्ये
पुराणातही सापडते?
सत्य काय जे बालमनावर
आई आजी बिंबवते?
सत्य काय जे अचाट वाटे
मनात भीती जे भरते?
सत्य काय जे स्वर्गप्रलोभन
मोक्षवाट तुज दाखवते?
सत्य काय जे लय चालीला
भुलून त्यागे आर्येला
सत्य काय जे विसरे बारा
अठरा बारा अठराला
व्याख्या ना सत्याला, अग्निपरीक्षा नसे असत्याला
माना वा ना माना, सोयर सुतुक न मुनी असे त्याला
शृंगाराने मढवा, सजवा धजवा किती असत्याला
कल्हई लावुन चांदीचे ते भांडे म्हणा कुणी त्याला
ढग आकाशी येती, सूर्यासी झाकती जरी काळे
त्यास न त्याची चिंता, तळपे तो सत्य त्याहि पल्याडे
सत्य असे ध्रुवतारा, ध्रुवबाळाची कथा असत्य असे
सत्य असे सूर्य नभी, रविरथ कविकल्पना, न सत्य असे
हिमशिखरावर मानव, हिमगिरि दिसतो, म्हणून सत्य असे
उलटा पर्वत मेरू, असत्य जो ना कधी कुणास दिसे
दुग्धा विरजण देता, होत दही हे त्रिकाल सत्य असे
क्षीरसमुद्रा विरजण लावुनि का मलय मंथने येते
दहि लावाया विरजण, विरजण हे कालचे दही होते
ते लावाया विरजण, ते परवाचे शिळे दही होते
प्रथम जगी ह्या विरजण लावाया कोठले दही होते?
या प्रश्नाचे उत्तर देवर्षी द्या, मला न ठावे ते
नारद वदे-
विरजण, अंडे, सागरजल, वृक्ष, प्रभो असे अजन्मा हे
अंगुलिनिर्देश तुझा समजे मज ना कशाकडे आहे
उत्पत्ती झाली हे सत्य असे हे कुणा नसे मान्य?
कोणी कैसी केली, रहस्य हे भेदुनी करा धन्य
ब्रह्म वदे-
ऋषिवर सत्यकथेला वाचक कां आज नच कुणी उरला
कां रे इतकी गर्दी पारायणि लोटते पुराणाला
अट्टाहास तुझा हा सत्यासाठी मुला मना भिडला
पुष्पामधुनी मकरंदाला टिपण्या जणू भ्रमर आला
भ्रमरा, पुत्रा, वत्सा, बाळा, मुनिवर करा कथा श्रवण
रोज कथा सत्याची गुंफुनि सांगे तुम्हा चतुर्वदन
भ्रमरपुराणश्रवणे पुण्य न हो प्राप्त, ती नको आशा
हे तर विचारमंथन केवळ, भ्रमरास ने मधुप्राशा
ना: व्वा ब्रह्मा! क्या बात है! पुराण असल्यामुळे शेवटी
इति श्री भ्रमरपुराणे
पितापुत्रसंवादनाम
प्रथमोध्याय:
संपूर्णम्
असे म्हणायचे. भारदस्तपणा येतो. मला असे वाटते की 'ब्रह्म वदे', 'नारद वदे' ऐवजी ब्रह्म उवाच, नारद उवाच म्हणावे. आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांना मगच ते पुराण पुण्यदायक आहे असे वाटेल. पुण्याचे आश्वासन तू देत नाहीस, पुण्य मिळायची आशा ठेवू नये असा प्रांजळ खुलासा करतोस. पण त्या आश्वासनाशिवाय कोण रे वाचणार? थोडं प्रॅक्टिकल व्हावं माणसानं असं मला वाटते. आणि ब्रह्मा, अरे, थापा नाही तरी कमीतकमी अतिशयोक्ती अलंकार तर सढळ हातानी वापर. काहीतरी अद्भुतता हवी पुराणात. थापा मारण्याचाच तो सौम्य प्रकार आहे. वाङमयात ते क्षम्य पण आहे.
बाकी छान हं. आर्यावृत्त तर एकदम फिट. तू गायलास पण मस्त ठेक्यात. अगदी बारा अठरा बारा अठरा. मधे काही कडवे वेगळे होते. अर्नाळ पुराणात तेच वृत्त वापरले आहे बरेचदा. तेही मात्रावृत्त आहे बरे. सोळा चौदा सोळा चौदा. अर्नाळछंद नाव आहे त्याचे. नारायण नारायण!
ब्रह्मा, जरूर रोज लिहीत जा. आपल्याला काही संस्कृत बिंस्कृत येत नाही. आले तरी पुराणातील काव्याचा जो ओघ आहे, जो उच्च दर्जा आहे तो आपल्याला स्वप्नातही येणे अशक्य आहे. तरीपण रोज लिहीत जा. टेबलवर नको मात्र. रात्रभर मनःपटलावर लिहीत जा आणि सकाळी माझ्या कर्णपटलावर आदळत जा. पुराण पूर्ण लिहून झाले की मोठी जांभई दे. जाऊ दे काळ एकदम दोन तीन हजार वर्षे पुढे. मग तुझ्या काव्याला खरेच पुराणाचा दर्जा येईल. मग फक्त व्यासलिखित आहे असे म्हणायचे दोन चार कानात. की झाले. मग सर्व देवळात, देवघरात भ्रमरपुराणाची पारायणे. भ्रमरसप्ताहाचे आयोजन.
ब्र: तू खरेच पृथ्वीवासी झालास रे बाबा. अरे पुराणातील अचाट, अफाट, अद्भुत गोष्टींचा परिणाम म्हणून तर आपण हे नवपुराण लिहायचा विचार केला. आपणही जर तेच केले तर काय होईल? अठरा ऐवजी एकोणीस पुराणे होतील. मग आपण लिहून काय मिळेल? ते काही नाही. आपण शक्यतोवर सत्याधारीत लिहू. लिहू म्हणजे मनातल्या मनात रचू. कधी मी कर्ता, करविता आणि ऐकविता, अन तू ऐकता. कधी तू कर्ता, करविता आणि ऐकविता, अन मी ऐकता. पुरे आता.
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
मना मनाचिये गुंती
राहिले न वेगळाले
_____________________
अनुक्रमणिकेकडे
No comments:
Post a Comment