गोष्ट आठवी
काकू: अहो मी पण रविवार पाहून आज महिला मंडळाची घरीच मीटिंग ठेवली आहे. वर्ष झालं मीटिंग होऊन. मीटिंग ठरते आणि रद्द होते. अामच्या मंडळात भांडणेच फार. कागाळ्या, चुगल्या यातच सगळ्यांना मजा येते. शेवटी मीच पुढाकार घेतला व घरीच भेंड्यांची मॅच ठेवली. त्यानिमित्ताने तरी काही जणी एकत्र येऊ. दोन टीम्स केल्या आहेत पाचपाचच्या. एका टीमचं नाव शारदा आणि दुसरीचं सरस्वती. मी शारदाची कॅप्टन आहे. सरस्वतीची कॅप्टन तीच आपली घटवाई. ध चा मा करतात तसाच तिच्या नावात कोणीतरी स चा घ केला असे वाटते. अगदी कळीची नारदच! पण आज मात्र बघ म्हणावं, माझ्याशी गाठ आहे.
तुम्ही नं, आरामात घरी या. पाचच्या आधी तर नकोच नको.
काका: तुझ्या सगळ्या साळकाया माळकाया गेल्या की तू मला मेसेज कर. मी मगच येईन. आता मस्त फोडणीचे पोहे कर. मागून पुढून आपलं जंबुद्वीपामृत.
काकू: बस, दहा मिनिटं.
ब्र: नारदा, आपली दोघांचीही नावे आलीत रे. आपले बिंग फुटले की काय? की त्या आंगणातल्या कोरलेल्या जंबुद्वीपासहित सप्तद्वीपांनी व सप्तसमुद्रांनी घात केला? काल रात्री ते मिटवायचे राहूनच गेले. जंबुद्वीपाचा पण उल्लेख आला. आपल्या गोष्टीतले शब्दही नारदा येथे हवेत राहून जातात का रे? आणि मग तेच श्वासाबरोबर आत जाऊन यांच्या मुखाद्वारे बाहेर येतात असे मला वाटते. आपल्याला मूर्त स्वरूप नसले तरी आपल्या काही कृती नक्कीच इथल्या वातावरणात दरवळतात आहे असे मला वाटते. माझा संशय वाढतो आहे नारदा. नाहीतर नेमका आजच जंबुद्वीपाचा पण उल्लेख का?
ना: ब्रह्माजी, असे काही नाही. आपली नावे म्हणजे या मानवांकरिता तोंडीलावणे झाले आहे. आपली कालची गोष्ट भागवत पुराणातली आहे. काकाकाकू तसेही धार्मिक आहेत. शेजारच्या देवळात भागवत सप्ताह ऐकायला बरेचदा जातात. म्हणून तर काकूंच्या पेटकोलीत शंभर शंभर वातींच्या शंभर तरी जुड्या आहेत. पुराणात तुझा तर उद्धार कितीदा तरी होतो. त्यामुळे आपल्या नावाचा केवळ उल्लेख झाला म्हणजे आपले बिंग फुटले असे नाही. हा केवळ योगायोग. आणि ब्रह्मा, कल्पनेला बिंग नसते. ते फुटणार कसे?
ब्रह्मा, चिअर अप! आज आपल्याला भेंड्यांची स्पर्धा पाहायला मिळणार. काकूंची शारदा टीम नक्कीच जिंकणार. वाड्यातले कोणीही कधीही भेंड्यात हारत नाही. सप्तस्पर्धात सप्तढाली मास्तरांचे हे सप्तवीर दरवर्षी मिळवायचे.
ब्र: नारदा, मला वाटायचे पुराणात सहाचा जोर खूप असतो. पण आता वाटते की सात हा कथाकाराचा ज्यास्त आवडता आकडा. सप्तद्वीप, सप्तसमुद्र, सप्तर्षी, भागवत सप्ताह वगैरे वगैरे.
ना: ब्रह्मा, तेवढ्यावरच हे थांबत नाही. राजा वीरव्रताच्या रथाने जी सप्तद्वीपे तयार झाली त्यांतील प्रत्येकावर वीरव्रताने आपल्या सप्तपुत्रांपैकी एकेकाची नेमणूक केली. त्या प्रत्येक पुत्राला प्रत्येकी सात पुत्र झाले. प्रत्येत द्वीपावर सप्तवर्ष, म्हणजे सप्तदेश निर्माण करून त्यातील एकेकावर वीरव्रताचे हे नातू राज्य करू लागले असाही पुराणात उल्लेख आहे.
ब्रह्मा, वीरव्रताच्या रथाच्या चाकांच्या सात खाचा का पडल्या याचेही भागवतात वर्णन आहे. सूर्य रात्री मेरू पर्वतामागे जातो आणि भारतवर्षात अंधार पडतो याचा राजा वीरव्रताला खूप राग आला. सूर्य मेरूच्या उत्तरेला गेला की मेरूच्या दक्षिण प्रदेशात मी स्वतः प्रकाश पाडीन अशी त्याने वल्गना केली. त्या दृष्टीने तो सूर्यासारखेच, पण बारा तास उशिराने रथात बसून मेरूभोवती फेरे मारू लागला. वेगवेगळ्या व्यासाचे सात फेरे त्याने मारले व त्यामुळेच सात खाचा पडून सात समुद्र तयार झाले. ही सत्यकथा मी भागवत पुराणात वाचली आहे.
ब्र: नारदा, वाड्यातील मास्तरांनाही सात मुलीमुले होती ह्यातही काही संकेत असेल का रे?
ना: ब्रह्मा, असेलही. प्रत्येक गोष्टीत योगायोग, संकेत धुंडाळायची मास्तरांना पण सवय होती. तुझेही आजकाल तसेच होते आहे. छान. अविश्रांत विचारचक्राची ती ग्वाही आहे. बुद्धिमान मनुष्याचे विचारचक्र जागृतपणीच नाही, तर निद्रावस्थेतही सुरू असते. म्हणूनच तर स्वप्न पडतात. अगदी सूर्यासारखी अखंड तळपते ह्या मानवाची बुद्धी. दिवसा तर सूर्य असतोच, पण सूर्य बुडला असे आपण म्हटले तरी त्यावेळी तो कुठे दुसरीकडे तितक्याच तेजाने तळपत असतो. सूर्य चालतो तोवर सृष्टी जिवंत, बुद्धी चालते तोवर मनुष्यप्राणी जिवंत.
ब्र: नारदा, पुन्हा तू सूर्याचा विषय काढला. आजतरी सांगणार ना मला तारांगणाची, तारामंडळाची गोष्ट? की आजही कालसारखेच?
ना: ब्रह्मा, आज कसे शक्य आहे? अरे, किती वर्षांनी भेंड्यांचा सामना, अंताक्षरीचा सामना पाहायचा योग आला आहे. वाड्यात असतांना मी मुलामुलींच्या सगळ्या सामन्यांना जात असे. एकही मी बुडविला असे झाले नाही. वाड्यातील भेंड्या आणि पुरणपोळी मी कधीच विसरू शकत नाही. अगदी घरपोच आलेली अशी सुवर्णसंधी दवडणे योग्य नाही. कापुसकोंड्याची गोष्ट काय, उद्याही सांगता येईल. पण भेंड्या, त्याही मास्तरांच्या मुलीचा सहभाग असलेल्या, म्हणजे अहो भाग्यम्! तूही बघ. आल्याच बघ बाया. चहा झाला की केव्हाही सुरू होतील भेंड्या.
ब्र: बरे बाबा. पण मला तू सर्व समजवून सांगत जा. स्पर्धेचे नियम, कवितांचे अर्थ, लौकिकार्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, व्यंगार्थ, कवि कोण, सारे सारे.
ना: सांगीन कानात. ब्रह्मा, या खेळात ५-५ जणांची चमू असते. आज काकू व त्यांच्या ४ मैत्रिणींची एक चमू, जिचे नाव शारदा. तसेच ५ अन्य मैत्रिणींची दुसरी चमू, सरस्वती. शारदाच्या कॅप्टन, म्हणजे चमूच्या ब्रह्मदेव, काकू आहेत. सरस्वतीच्या कॅप्टन घटवाई बाई. त्याही काही कमी नाहीत. सामना अटीतटीचा होईल. पण शेवटी काकू जिकडे, विजय तिकडे हेच निश्चित.
ब्रह्मा, बघ चहापाणी आटोपले. दोन्ही चमू समोरासमोर स्थानापन्न पण झाल्या. काकू आणि घटवाई बाई आता नाणेफेक करतील.
ब्र: ही नाणेफेक म्हणजे रे काय?
ना: ब्रह्मा, सामन्याला सुरुवात कोणी करायची ते ठरविण्याची पद्धत. काकूंकडे एक नाणे आहेत. वंशपरंपरेने चालत आलेले. त्याच्या एका बाजूस ब्रह्मदेव, व दुसऱ्या बाजूस नारदाचे चित्र कोरले आहे. काकू नाणे वर फेकतील आणि ते पडण्याच्या आत घटवाई बाई नाणे जमिनीवर पडल्यावर वरच्या भागाला ब्रह्म असेल की नारद असेल याचा कयास लावतील. त्यांचा कयास खरा ठरला तर नाणेफेक त्या जिंकतील व पहिली कविता त्या म्हणतील. कयास खोटा ठरला तर काकू नाणेफेक जिंकतील व पहिली कविता म्हणतील.
बघ आपण बोलत असता नाणेफेक झालीही आणि काकू आता कविता म्हणायला सुरुवात करतील. ही मास्तरांची मुले कुठल्या कवितेने भेंड्या सुरू करतात ते मला माहीत आहे.
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
सदानंद आनंद साऱ्या जगाचा
बघ काकू सुरु करीत आहेत. ऐक काय कविता म्हणतात ते.
शारदा चमू:
सुवर्ण मेरु उभा मधोमध, जंबुद्वीपची स्वर्ग असे
चला करू या सुरू आजचे भेंड्यांचे हे युद्ध कसे
सरस्वती, शारदा चमूंचे सैन्य उभे ठाकले असे
कुरुक्षेत्र हे, कविता येथे एकमेव शस्त्रास्त्र असे
ब्र: नारदा, ही तर वेगळीच कविता आहे रे.
ना: हं. आश्चर्यच आहे. काळ खरेच पुढे गेला नारदा. जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षांनी मी भेंड्यांचा सामना बघतो आहे.
ब्र: मला अर्थ सांग आणि थोडे सामन्याचे नियम पण समजावून सांग. आपल्यालाही फावल्या वेळात खेळता येईल कधी.
ना: ब्रह्मा, काकूंनी एक कवितेचे कडवे म्हटले. कविता मी कधीही ऐकली नाही. मास्तरांच्या भेंड्यांच्या वहीतली नाही. माझ्या वाचनातली पण नाही. काकूंना कुठे गवसली हे कळत नाही. ब्रह्मा, कवितेचा अर्थ सोपा आहे. कवी म्हणतो की जंबुद्वीप हे त्याच्याकरिता स्वर्गासमान आहे आणि त्याच्या मधोमध एक सुवर्णाचा मेरुपर्वत उभा आहे. देवा, हे अगदी मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे, भागवतपुराणात जसे सांगितले आहे तसेच आहे. नंतर कवि म्हणतो की हा आजचा सामना शारदा आणि सरस्वती अशा दोन चमूतील आहे व दोन्ही चमूंचे सैन्य युद्धाला तयार आहे. या युद्धात आणि महाभारत युद्धात एवढाच फरक आहे की येथे कविता हेच एकमेव शस्त्र आहे. कवीने उल्लेख न करता असेही सुचविले आहे की हे भेंड्याचे युद्धही धर्मयुद्धासारखेच लढायला हवे. लबाडी न करता. ब्रह्मा, महाभारत युद्धाच्या कथेचा जनमानसावर जो ठसा आहे तो अवर्णनीय आहे आणि पुराणातील कथा यांच्या मनात नेहमीकरिता वास करतात. म्हणून ब्रह्मा, आपण काल्पनिक की सत्य हा वाद बरेचदा अनाठायी आणि निष्फळ ठरतो.
ब्रह्मा, आता सरस्वतीची पाळी आहे. काकूंच्या कवितेचे शेवटचे अक्षर, अंताक्षर 'से' आहे. सरस्वतीला 'स'च्या बाराखडीतल्या, म्हणजे 'स, सा, सि, सी, सु, सू, से, सै, सो, सौ, सं' पैकी कुठल्यातरी अक्षराने कविता सुरू करावी लागेल. ऐक घटवाई बाई काय म्हणतात ते.
सरस्वती:
सूर्यचि आम्हा प्रकाश देतो, दिन रजनी तोची करितो
तोच स्वतःचा वेग कधी वाढवुनी दिन छोटा करितो
वेग कमी होता दिन मोठा, रात्र होतसे पुन्हा लहान
तोचि करविता सहा ऋतूंचा, शक्तिस्रोत तो, तोचि महान
ना: ब्रह्मा, पुन्हा एकदम न ऐकलेली, न वाचलेली कविता. सूर्याचे गुणगान करणारी कविता. रात्र आणि दिवस सूर्यामुळेच होतात हे सत्य सांगणारी कविता. ब्रह्मा, सध्या दक्षिणायन सुरू आहे. दिवस लहान व रात्र मोठी असते. उद्या, २१ डिसेंबरला दिवस सगळ्यात लहान व रात्र सगळ्यात मोठी असेल. नंतर दिवस हळूहळू मोठा होईल व रात्र लहान होत जाईल. सहा महिन्यांनी, २१ जूनला दिवस सगळ्यात मोठा व रात्र सगळ्यात लहान होईल. २१ सप्टेंबर व २१ मार्चला दिवस आणि रात्र बरोबर १२-१२ तासांचे असतील. हे सर्व सूर्य आपला वेग कमी ज्यास्त करतो म्हणून होते असे कवी म्हणतो. सहा ऋुतु, म्हणजे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे सूर्यामुळेच होतात असेही कवी म्हणतो. सर्व जगाच्या शक्तीचे उगमस्थान सूर्यच आहे, तो महान आहे असेही कवी म्हणतो.
ब्रह्मा, अगदी हेच भागवतपुराणातही लिहिलेले आहे, आणि मी तुला आपल्या गोष्टीतही तेच सांगितले असते.
ब्र: वा, बरेच झाले. तू सांगायला चालढकल करीत होतास. योगायोगाने, सरस्वतीने मला ते सांगितले. नारदा बघ, शारदा चमूने आपसात बरीच कुजबुज केली व खूप आनंदाने आता काकूच पुन्हा कविता म्हणणार असे दिसते. मला माहित आहे त्या 'न'च्या बाराखडीतलेच काहीतरी घेऊन कविता म्हणतील. म्हणतात बघ!
शारदा:
नसे यास सुट्टी, न याला विसावा
तया दर्शने येतसे स्फूर्ति जीवा
दिशा पूर्व लाजे सरे रात्र जैसी
तिच्या गालि लाली पहाटेस कैसी?
ना: ब्रह्मा, आज सूर्याचाच दिवस दिसतो. तसाही रविवारच आहे म्हणा. काकूंची कविताही सूर्यावरच आहे. चाल वेगळी आहे हे तुझ्या लक्षात आले असेल. सुटसुटीत चाल. अशा ठेक्याच्या कवितेला भुजंगप्रयात वृत्तातली कविता म्हणतात. मी आधी म्हटलेली 'गणाधीश जो ईश' पण याच साच्यातली. जंतुकवीची 'उद्या लग्न आहे' तर पूर्ण अशाच वृत्तातली.
ब्र: हं. खरेच. पण नारदा, अशी कुठलीही चाल चालते का रे?
ना: भेंड्यात वृत्तबद्ध कविता हवी. कवितेला त्याने सुरेख चाल येते. जंतुकवी म्हणतो 'कविता म्हणजे कदमताल । एकच ठेका, एकच चाल।।'. नाहीतर मग ते गद्य होईल. भेंड्यामध्ये गद्याला प्रवेश निषिद्ध.
ब्र: मास्तर, जरा अर्थ पण सांगा. तसेच शारदा चमू एवढी खूष कां तेही सांगा.
ना: ब्रह्मा, अर्थ तर फार सोपा आहे. कवी म्हणतो, सूर्याला कधी सुट्टी नसते, न कधी आराम. याच्या केवळ दर्शनाने प्राणिमात्राला स्फूर्ति येते. पूर्व दिशा पहाटे तांबड्या लाल रंगाने उजळते. जणू ती कोणाची चाहूल लागून लाजते व तिचे गाल लाल लाल होतात. ब्रह्मा, सूर्योदयापूर्वीच्या पूर्वरंगाचे नाजुक वर्णन कवी करतो या कवितेत.
ब्रह्मा, आधीची कविता 'न' ने संपली. काकू 'न'च्या बाराखडीतले कुठलेही अक्षर घेऊ शकल्या असत्या. पण त्यांनी ना, नि, नी वगैरे न घेता 'न' पासूनच कविता सुरू केली. याला दाम म्हणतात. दाम साधल्यामुळे त्यांच्या चमूला १ गुण मिळाला. सरस्वतीला अजूनतरी काही नाही. काकूंची चमू आता एक-शून्य ने आघाडीवर आहे. म्हणून सर्वजणी आनंदल्या होत्या.
ब्रह्मा, बघ आता घटवाई बाईंची चमू काय करते. आपसात सल्लामसलत करून बघ कोणीतरी कवितेला सुरुवात करीत आहे.
सरस्वती:
सप्ताश्वा रथि लावुनी अरुण जो सारथ्य त्याचे करी
आणी हा रथ आगळा, नच दुजा विश्वात कोठे तरी
याला एकच चाक, नाहि दुसरे, वेगात धावे तरी
पूर्वेसी अरुणोदयास उधळे आभा किती गोजिरी
ना: ब्रह्मा, शारदाची कविता 'कैसे'वर संपली होती. सरस्वतीने 'स'ने सुरुवात केली. म्हणून दाम झाला नाही. पण कविता सुंदर. कवि सूर्याच्या सात घोड्याच्या, एका चाकाच्या रथाचे वर्णन करून म्हणतो की असा रथ जगात दुसरा नाही. रथाचा सारथी अरुण असून तो रथ वेगाने हाकतो. पूर्वेला अरुण रथ घेऊन येताच जी दिव्य आभा दाटते त्याचे कवी वर्णन करतो.
ब्रह्मा, सूर्याच्या ह्या एक चाकी रथाचे, सात घोड्यांचे, अरुण सारथ्याचे वर्णन अगदी भागवत पुराणातील वर्णनाशी जुळते. सूर्यचंद्राच्या आपल्या कापुसकोंड्याच्या गोष्टीचे अपहरण झाले की काय असा संशय येण्याइतपत आजच्या भेंड्या आगळ्या वेगळ्या आहेत. असो.
ब्र: नारदा, रोजच्या पाहण्यातला हा सूर्योदयाचा मनोवेधक सोहळा. पण आज काळ बदललेला दिसतो आहे. उंचच उंच इमारतीतून सूर्य रे काय दिसणार. आणि दैनंदिन धकाधकीत वेळ तरी कुणाला? लोक सूर्योदय पाहायला माथेरान की कुठेतरी जातात म्हणे. मला काही दिवसापूर्वी अर्नाळपुराणात तू आणि मीही माथेरानला गेलो होतो असा उल्लेख आढळला. खरेच असावे. त्यापुराणाच्या सत्यतेबद्दल मला मुळीच संदेह नाही. 'घडले ते सांगितले' असे ते निर्मळ पुराण.
ना: ब्रह्मा, सांग की रे तो माथेरानचा अध्याय.
ब्र: बघू नंतर कधी. आत्ता नको. केव्हाही शारदाची कविता सुरू होईल. पण नारदा, खरेच का रे सूर्याचा रथ एक चाकाचा?
ना: ब्रह्मा, रथ, रथी, सारथी यांचे वर्णन इतरत्रही आहे. हाच श्लोक बघ.
एकचक्रो रथो यन्ता विकलो विषमे हयाः ।
आक्रामत्येव तेजस्वी तथ्याप्यर्को नभस्तलम् ।
ब्रह्मा, एक चाकाचा रथ, अपंग विकलांग सारथी, विषम घोडे, म्हणजे ३, ५, ७ वगैरे, असूनही तेजस्वी सूर्य आकाशावर आक्रमण करायला चुकत नाही, असे हा कवीही म्हणतो. ब्रह्मा, या कवितेत अमुक नाही, तमुक नाही अशी कारणे सांगून आपल्या नकर्तेपणाचे कौतुक व समर्थन करणाऱ्यांचा कवीने उपहास केला आहे असे वाटते. असो. ही घटवाई बाईंची कविता शार्दूलविक्रीडित वृत्तात होती. अहाहा! मसजसततग!
ब्र: अरे हे ततपप काय म्हणतोस?
ना: ब्रह्मा, ततपप नाही रे. शार्दूलविक्रीडितचे हे गण आहेत, म स ज स त त ग. अहाहा! आता ते नाही सांगत बसत. पुढे कधी. काकू पुन्हा पुढे सरसावल्या बघ कविता म्हणायला.
शारदा:
रथाच्या पुढे चालती देव काही
स्तुतीगान गाती रवीचे सदाही
बसे सारथी पाठमोरा न त्यासी
रवीसी न्याहाळोनी हाके रथासी
ना: ब्रह्मा, पुन्हा भुजंगप्रयात. यययय. अहाहा! सूर्याच्या रथाच्या पुढे अनेक देवगण सूर्यस्तुतीचे नित्य गायन करीत असतात. त्याचा सारथी अरुण सूर्याकडे तोंड करून बसलेला असतो. सूर्याकडे पाठ करून बसणे त्याला प्रशस्त वाटत नाही. तसे केल्यास सूर्यदेवांचा अपमान होईल असे त्यास वाटते. सूर्यदेवांना न्याहाळत तो रथ हाकत असतो. ब्रह्मा, अगदी भागवतातलेच रे हे वर्णन. कधी न ऐकलेल्या अशा आजच्या कविता. अगदी अटीतटीचा आजचा सामना. सरस्वतीवर 'रथासी' आले आहे. 'सी' पासून एखादी कविता म्हणतील तर त्यांना दामाचा एक गुण मिळेल. मग दोन्ही बाजूंचा एक एक गुण होईल. सध्या काकू एक-शून्य पुढे आहेत. बघ सरस्वती पुढे सरसावली.
सरस्वती:
सूर्यरथा सामोरी सहस्र षष्ठादशे मुनी पायी
गाती गान स्तुतीचे, तेजोमय गोल मागुनी येई
ब्र: नारदा, दाम हुकला. सरस्वतीची कविता 'सू'पासून सुरू झाली. मला अर्थही कळला. सूर्याच्या रथासमोर साठ हजार ऋषी पायी चालतात आणि सूर्याची स्तुती करतात. त्यांच्या मागे तेजाचा गोल, सूर्य, येतो असे कवी म्हणतो. वा! पण ब्रह्मा खरेच का रे असे असते?
ना: ब्रह्मा, अगदी भागवतातलेच वर्णन. भागवतातही या साठ हजार ऋषींचा उल्लेख आहे. त्यांचा आकारही अंगठ्याएवढा आहे असे सांगितले आहे. जंतुकवीच्या 'अंगुष्ठीमाल' कवितेची आठवण झाली.
ब्र: हं. मलाही ती आरती आवडली. नारदा, ह्या कवितेची चाल तर आणखीनच निराळी होती रे.
ना: होय ब्रह्माजी. हे आर्यावृत्त होते. खूप वापरातले. मोरोपंत नावाच्या कवीने तर या वृत्तात संपूर्ण महाभारत लिहिले. आर्याभारत नावाचे त्यांचे महाकाव्य प्रसिद्ध आहे. भेंड्यांमधेही हे वृत्त खूपच वापरात येते. मला याची चाल खूपच आवडते. अहाहा! काकू बघ किती आनंदल्या. काय त्यांना सुचले असावे? सरस्वतीच्या कवितेच्या शेवटी 'येई' आले होते.
शारदा:
येई जाग जगाला, पडती किरणे नभातुनी जैसी
आकाशी तो असता, झोपे जो, त्यास सद्गती कैसी
ना: हं. म्हणून एवढा आनंद? म्हणून गालावर एवढी मोठी खळी? ब्रह्मा, काकूंनी 'येई' पासून कविता म्हणून दोन अक्षरी दाम साधला. तीन गुण. आता शारदेची आघाडी चार-शून्य.
ब्र: वा! तू म्हणाला तसेच होत आहे. नारदा, ही सुद्धा आर्या होती. अर्थ पण किती सोपा. किती सोप्या कविता लिहितात रे काही लोक? मलाही खूप मज्जा मज्जा येत आहे.
ना: घटवाई चमू गांगरलेली दिसते. पण त्यांचेही पाठांतर खूपच आहे बरे. बघ, म्हणतात पुढची कविता.
सरस्वती:
सूर्याचा रथ हा विशाल इतुका, सांगू न कोणी शके
लांबी चौपट रुंदिच्या असतसे, रुंदी न थोडी असे
जंबुद्वीप महान, व्यास जितुका, मेरूचिही उंचि हो
मेरू मेरु असे नऊ जुळविता, रुंदी रथाची असे
ब्र: नारदा, पुन्हा ते शार्दूलविक्रीडित. श्रीनिवासच्या लग्नात जे मंगलाष्टक गायले त्या चालीवरही ही कविता म्हणता आली असती असे वाटते. ततपप!
ना: ततपप नाही रे. मसजसततग. याची मंगलाष्टकांसारखी चाल खूप सुंदर असते. त्या विश्रामची सून बागेश्री तर खूपच सुंदर म्हणते. लग्नात तिचेच तू ऐकलेस.
ब्र: पण नारदा, अर्थ मात्र फारसा कळला नाही रे. मराठीचा गोंडच की काय मी?
ना: ब्रह्मा, या कवितेत सूर्याच्या रथाच्या आकाराची माहिती आहे. सूर्याचा रथ विशाल असून विश्वात इतका मोठा रथ दुसऱ्या कोणाचा नाही. या रथाची लांबी रुंदीच्या चौपट आहे. पण रुंदी सुद्धा काही कमी नाही. जंबुद्वीपाचा जितका व्यास, तितकीच मेरुपर्वताची उंची आहे असे कवी सांगतो. आणि सूर्याच्या रथाची रुंदी एकावर एक नऊ मेरु पर्वत ठेवले तर जितके अंतर होईल तितकी आहे असे कवि म्हणतो. गणितसम्राट ब्रह्माजी, हे एक गणिती कोडे आहे. सोडवा.
ब्र: नारदा, सुटले पण. तूच सांगितले काल की जंबुद्वीपाचा व्यास एक लक्ष योजने आहे. मेरू पर्वताची उंची पण तितकीच. एकावर एक नऊ मेरु पर्वत म्हणजे नऊ लक्ष योजने. ही सूर्याच्या रथाची रुंदी. लांबी त्याच्या चौपट, म्हणजे छत्तीस लाख योजने. बरोबर? की चुकले काही?
ना: अरे अगदी बरोबर. ब्रह्मा, भागवत पुराणही म्हणते की सूर्याचा रथ ३६ लक्ष योजने लांब व ९ लक्ष योजने रुंद आहे. यावरून सूर्याच्या आकाराची कल्पना येऊ शकते. सरस्वतीची कविता आणि भागवतातले सूर्यरथाचे वर्णन हुबेहूब एकसारखे आहे. आता तर मला असे वाटायला लागले आहे की आजच्या सगळ्या कविताही एखाद्या पुराणातल्याच आहेत.
ब्रह्मा, आता मला आठवले की रथसप्तमीला मास्तर अंगणात जो सूर्याचा रथ काढायचे त्यालाही एकच चाक काढायचे. अगदी पुराणनिष्ठ प्रतिमा! असो.
ब्र: असो नाही, असे. आधीची कविता 'असे'वर संपली, 'असो'वर नाही. आता पाहू शारदा काय करते. दाम साधतात की काय काकू पुन्हा?
शारदा:
सूर्य फिरतसे गोल गोल मेरूच्या अवती भवती हो
इंद्रपुरी पूर्वेसी ज्याच्या, पश्चिम पुरी वरुणाची हो
दक्षिणेस यमराजपुरी अन् उत्तरेस शशिनगरी हो
इंद्रपुरीहुनी निघतो जेंव्हा, सकाळ भारतवर्षी हो
ना: ब्रह्मा, पुन्हा अगदी भागवत पुराणातलच वर्णन रे! सूर्य रथात बसून मेरुपर्वताभोवती प्रदक्षिणा घालतो. दिवसाकाठी एक प्रदक्षिणा. मेरूच्या पूर्वेस इंद्रपुरी, दक्षिणेस यमराजपुरी, पश्चिमेस वरुणपुरी व उत्तरेस चंद्रपुरी आहेत. सूर्य इंद्रपुरी, यमराजपुरी, वरुणपुरी, चंद्रपुरी करीत करीत पुन्हा इंद्रपुरीला येतो. असे रोज सुरु असते. तो इंद्रपुरीला, म्हणजे पूर्वेला असतो तेंव्हा भारतात सकाळ असते. यमराजपुरीला पोहोचतो तेंव्हा माध्यान्ह. वरुणपुरीला, म्हणजेच पश्चिमेला असतो तेव्हा संध्याकाळ असते. सूर्य मेरुपर्वतापलिकडे, म्हणजे चंद्रपुरीला असतो तेव्हा भारतात मध्यरात्र असते व सारे झोपलेले असतात. असे सविस्तर वर्णन भागवतात आहे. तसेच या कवितेतही.
ब्रह्मा, सूर्याच्या रथाची धुरा मेरुपर्वताच्या शिखरावर आहे. याचाच अर्थ बहुधा सूर्य जमिनीपासून एक लाख योजने अंतरावर फिरत आहे असा विद्वज्जन लावतात. तेलाच्या घाण्याभोवती जसा बैल फिरतो तसाच सूर्य मेरु पर्वताभोवती फिरत राहतो. फिरता फिरता तो क्रमाक्रमाने बारा राशींमध्ये जातो येतो. या राशी कालचक्रावर कोरलेल्या आहेत. सूर्याच्या रथाच्या चाकाला बारा आरे आहेत तेच बारा महिने, त्याच्या गोल काठाचे तीन भाग आहेत तेच उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असे सविस्तर वर्णन भागवतात दिले आहे. उद्या मी ही कापुसकोंड्याची गोष्ट सांगितलीच असती. पण आज योगायोगाने तीच आपल्यासमोर घडते आहे. काही योगायोग खरेच विचित्र असतात.
ब्र: नारदा, थांब. पुढची कविता सुरू होते आहे. मागची 'हो'वर संपली होती.
सरस्वती:
होता संध्याकाळ सूर्य जाई वरुणाच्या द्वारी हो
जाता जाता माध्यान्ही तो यमराजांच्या नगरी हो
मध्यरात्री तो चंद्रपुरीला, पुन्हा पहाटे पूर्वेला
नव्या दिनीच्या नव्या पहाटे उजळी भारतवर्षाला
ब्र: नारदा, तू आत्ता सांगितलेले भागवतातलेच हे वर्णन रे. अगदी हुबेहूब. सरस्वतीने दाम साधून एक गुण पण मिळवला बघ. त्यांना आता हुरूप चढलेला दिसतो.
ना: आजचा सामना अद्भुत वाटतो. असो. काकू अजूनही चार-एक नी आघाडीवर आहेत. पुन्हा कुजबुज कुजबुज. पुन्हा गाली खळी. काहीतरी विशेष होणार बघ. मागची कविता 'भारतवर्षाला'वर संपली होती.
शारदा:
वर्षाला राशींच्या चक्राला रवि करूनिया पूर्ण
आयन उत्तर दक्षिण संपवुनी ऋुतु सहा करी पूर्ण
ना: अरे! घात केला बघ या आर्येनी आर्या म्हणून घटवाई आर्येचा. तीन अक्षरी दाम. एका दमात दामाचे पाच गुण. ९-१ ची आघाडी. थोडीसुद्धा दयामाया नाही रे काकूंना.
ब्र: बाकी ब्रह्मा, ही कविता तू म्हणालास तेच सांगते. दर वर्षी सूर्य उत्तरायन दक्षिणायन आटोपतो, सहा ऋतूंचे चक्र पूर्ण करतो, बारा राशींचे चक्रही पूर्ण करतो. कवितेच्या शेवटीही 'पूर्ण' शब्दच आला. सरस्वतीला 'ण' पासून कविता म्हणावी लागेल.
ना: ब्रह्मा, 'ण' पासून एकही शब्द नाही. ङ ञ ण ळ या चार वर्णांपासून एकही शब्द सुरू होत नाही. जंतुकवीची 'ङञणळ' कविता या चारही वर्णांचे सांत्वन करते. त्यांच्यापासून शब्दनिर्माण होत नसला तरी त्यांच्याविना भाषा नाही असे म्हणते. वाच कधी.
ब्र: वाचली एकदा. आता पुन्हा एकदा वाचीन.
ना: एकतर सरस्वतीला 'पूर्ण' पासून कविता म्हणून दाम साधावा लागेल, नाहीतर शारदा त्यांना एखादे दुसरे अक्षर देईल कविता म्हणायला. बघ काय करतात घटवाई बाई.
सरस्वती:
पूर्ण चंद्राला पोर्णिमा म्हणावे
चंद्ररात्रीचे स्तुतीगान गावे
सूर्य ना जाणे कधी क्षीण होणे
तया जैसे मानवानेहि व्हावे
ब्र: नारदा, जमले त्यांंना. दाम साधला. तीन गुण. ९-४ नी अजूनही शारदा पुढे. पण दोघांमधील अंतर मात्र कमी झाले. नारदा, हे रे कोणते नवे वृत्त? कवितेता अर्थ मात्र फार छान हं.
ना: ब्रह्मा, मलाही नाही आठवत रे हे वृत्त. विचार करून, नाहीतर अभ्यासून सांगतो. पण बघ, काकू पुन्हा उत्साहित दिसतात. पुन्हा फटाका फोडणार वाटते.
शारदा:
वाट रवीची बारा कोटी योजन दिवसाकाठीची
प्रदक्षिणा मेरूची रोजच, तेजोमय मार्तंडाची
तापवि चार महीने, तैसे शीतकाल अन् वर्षाही
सूर्याचे रथचक्र ऋतूंचेही, न भिन्न कालाचेही
ना: ओहो, नाही साधला दाम. पण कविता छान! सूर्याची प्रदक्षिणा बारा कोटी योजनांची असते असे कवी म्हणतो. भागवतात बारा कोटी साडे बारा लाख योजनांची असते असे म्हटले आहे. सूर्याच्या रथाचे चाक किंवा रथाची चाकोरी, ऋतुचक्र व कालचक्र हे सारे एकच असावे असे कवी म्हणतो. काळाचे माप सूर्यामुळेच पडले हे तसे खरेही आहे म्हणा.
सरस्वती:
हे तारांगण आहे निर्मिति त्याचीच, सृष्टिही त्याची
स्वर्ग पृथ्विही त्याची, वेद पुराणेहि त्याच ब्रह्माची
ब्र: ही कविता मात्र आवडली हं. ब्रह्मा खुष झाला!
सगळं सगळ माझच आहे असे ही कविता म्हणते. अजुनही काकू ९-४ ने पुढेच आहेत. चुळबुळही सुरू झाली आहे. सामना संपेल लवकरच असे दिसते.
ना: बघू. मला वाटले की आता चंद्र व इतर ग्रहांचा पण समाचार घेतील. भागवत पुराणात ते पण सांगितले आहे.
शारदा:
चंद्र असे सूर्यावर, अंतर दोघात मेरुची उंची
गति चंद्राची बारापट सूर्याच्या, मिती पुराणांची
ना: मला वाटलेच होते. गाडी आता चंद्राकडे वळली आहे. वर्णनही भागवतपुराणनिष्ठ असेच आहे. चंद्र सूर्याच्याही वरती आहे. तोही मेरुपर्वताच्याच प्रदक्षिणा करतो, घाण्याच्या बैलासारखाच. सूर्य पृथ्वितलाच्या एक लक्ष योजने वर, तर चंद्र सूर्याच्याही वर आणखी एक लक्ष योजनांवर. म्हणजेच सपाट पृथ्वीपासून दोन लक्ष योजनांवर. चंद्राचा वेग सूर्याच्या वेगापेक्षा बारापट ज्यास्त आहे. सूर्य एका वर्षात जेवढे अंतर चालतो, चंद्र तेवढेच अंतर एका महिन्यात पार करतो. सूर्याचा एक महिन्याचा मार्ग चंद्र सव्वादोन दिवसात क्रमतो. तसेच सूर्य एक पंधरवाड्यात जेवढा मार्ग चालतो तेवढा मार्ग चंद्र एका दिवसात सर करतो. चंद्र हाच सर्व जीवांचा प्राण व जीवन आहे असे भागवतपुराण म्हणते. चंद्र हा पुरुषस्वरूप देवच आहे आणि तोच देवता, पितर, मनुष्य, भूत, व इतर चराचरांच्या प्राणांचे पोषण करतो. म्हणून चंद्राला सर्वमय असेही नाव आहे. हाच सोमदेव.
ब्र: नारदा, म्हणजे चंद्र तर सूर्यापेक्षाही थोर. मग त्याचा रथ वगैरे?
ना: ब्रह्मा, पृथ्वी, स्वर्ग व सर्व आकाशाला प्रदक्षिणा घालणारा सूर्य महान नाही असे कोण म्हणेल? पण त्यापेक्षा चंद्र तसा मोठाच. त्याच्या रथाचे मात्र वर्णन पुराणात वाचल्याचे मला आठवत नाही. आपले वाचनच कमी पडत असावे. बघ आता सरस्वतीकडून काय कविता येते. 'ची' आला आहे त्यांच्यावर. त्यांना लवकर काहीतरी करून शारदेची आघाडी पार करायला हवी. नाहीतर पराजय निश्चित आहे.
सरस्वती:
चंद्रावरती अंतर लक्षद्वय योजने पुढे शुक्र
तितुकेचि पुढे जाता बुध, मग मंगळ, गुरू, शनी वक्र
ना: नारदा, चंद्रापलिकडे दोन लक्ष योजनांवर शुक्र, आणखी वर दोन लक्ष योजनांवर बुध, आणखी वर दोन लक्ष योजनांवर मंगळ, आणखी वर दोन लक्ष योजनांवर बृहस्पती म्हणजे गुरु, आणि आणखी दोन लक्ष योजने वर शनि स्थित आहे. वर्णन अगदी भागवतात जसे आहे तसेच कवीनेही केले आहे.
ब्र: नारदा, काकू पुन्हा खूपच उत्साहित दिसतात. स्फोट करणार बहुतेक.
शारदा:
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ््नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा
ब्र: दोन अक्षरी दाम. तीन गुण. १२-४ ची आघाडी. पण नारदा, असा संस्कृत श्लोक चालतो का रे? घटवाई बाई आक्षेप घेतात की काय? आणि हो, तुझ्या कानाजवळ भुंगा गुं गुं करतो आहे. वार त्याला. आज पूर्ण वेळ हा भुंगा मात्र येथेच भ्रमण करीत आहे नारदा. कधी शारदेकडे, तर कधी सरस्वतीकडे.
ना: ब्रह्मा, स्पर्धेचे नियम त्यांनी आधीच ठरविले असतील. तसेही हा श्लोक गणेश वंदना आहे. काकाकाकू म्हणजे मोरयाचे वंशज, गणपतीचे परम भक्त. त्यांच्या घरी या श्लोकाला कोणी महामूर्खच आक्षेप घेऊ शकेल.
घटवाई बाईंना घेउनि आक्षेप काय साधेल?
काकूंच्या तळपायी आग वसे, मस्तकात जाईल
ब्र: अरे वा! तू पण पहिल्यांदा आर्या केली व म्हटली. स्वरचित दिसते. शीघ्रकवी! तू म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: मी कुठे काही म्हणालो? ती आर्या मात्र मलाही ऐकू आली बरे. अगदी उत्सफूर्तपणे निघाली ब्रह्मा मुखातून. असो. सरस्वतीवर 'सर्वदा' आले आहे. दाम अगदी आवश्यक आहे त्यांना. स्पर्धा संपत आली आहे. शारदावर भेंडी बसली तर मात्र सरस्वती अजूनही जिंकू शकेल.
ब्र: भेंडी?
ना: होय ब्रह्मा. भेंडी बसली तर १० गुण मिळतात. आलेल्या अक्षरावर ज्यांचा डाव आहे त्यांना कविता न सुचली तर दुसऱ्या चमूला त्याच अक्षरावर कविता म्हणण्याची संधी मिळते. त्यांना जर तसे तरता आले तर १० गुण मिळतात. भेंडी बसवायचा प्रयत्न असतो सगळ्यांचाच. म्हणूनच तर भेंड्या नाव पडले या खेळाला.
सरस्वती:
दर्शन सप्तग्रहांचे तारांगणि रोज मानवा भावे
सप्तर्षीही असती एकादश लक्ष योजने जावे
ना: ब्रह्मा, पुन्हा तुझी परीक्षा. शनि पृथ्वीपासून किती उंचीवर आहे सांग.
ब्र: बारा लक्ष योजने. एक अधिक एक अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन.
ना: बरोबर. सूर्य म्हणजे रवि, सोम म्हणजे चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे पृथ्वीभोवती फिरणारे सप्तग्रह. म्हणून तर सात दिवसांची नावे यांच्यावरूनच पडली. पंचागात आजही सोमवार ऐवजी चंद्रवारच म्हणतात. ब्रह्मा, शनीच्या वर ११ लक्ष योजनांवर सप्तर्षी आहेत असे कविने सांगितले आहे या कवितेत. अगदी भागवत पुराणातलाच आकडा.
ब्रह्मा, आता काकूंची शेवटची कविता. त्यांच्यावर 'जावे' आले आहे. 'जावे'पासून कविता सुरू झाली तर तीन गुण. 'वे'पासून असेल तर एक. व, वा, वि, वी, वगैरे असेल तर गुण नाही. त्यांना कविता सुचलीच नाही आणि सरस्वतीने व पासून कविता म्हटली तर शारदावर भेंडी बसेल व सरस्वतीला १० गुण मिळतील. अजूनही सरस्वती जिंकू शकते. पण मला नाही वाटत काकू सहजासहजी हारतील. बघ त्या सरसावल्या पुढे.
शारदा:
विधिनिर्मित तारांगण वर्णिति नारद पित्यास ब्रह्मास
ब्रह्मनिर्मिती सांगे निर्मिति ब्रह्माचि आज ब्रह्मास
ब्र: काकूंनी भेंडी बसू नाही दिली. त्या अजूनही १२-४ ने पुढेच आहेत. आता मात्र सरस्वती हारेल असे दिसते.
नारदा, कवी म्हणतो की माझी, म्हणजे ब्रह्माची, निर्मिती असलेला तू नारद मलाच मीच निर्मित केलेल्या तारांगणाची, तारामंडलाची माहिती देत आहेस. हा टोमणा का रे? की ज्या पुराणावरच आधारीत आजच्या साऱ्याच कविता दिसतात त्या पुराणात तूच मला तारामंडलाची माहिती देत आहे?
ना: ब्रह्मा, शनि व सप्तर्षीतले हे ११ लक्ष योजने अंतर भागवतपुराणातही आहे. तसेच नारदपुराणातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाहीतरी मी तुला ही कापुसकोंड्याची गोष्ट सांगणारच होतो. म्हणजे कवी म्हणतो ते सत्यच आहे.
ब्रह्मा, मला हे कळत नाही रे की आजच नेमके भेंड्यांच्या रूपात तारांगणाचे वर्णन कसे आले. अंताक्षरीत अंतरिक्ष कसा संचारला? विश्वास बसणार नाही असा हा योगायोग. असो. सरस्वतीची शेवटची कविता येत आहे. मग सामना सफळ संपूर्ण.
सरस्वती:
सप्तर्षींच्या पुढती तेरा योजन पुढे पुढे जाता
अढळ धृव आढळतो, विष्णु करी वास, नमवितो माथा
ना: ब्रह्मा, घटवाई बाईंनी एक अक्षरी दाम साधून एक गुण मिळविला खरे. पण तरीही काकू सप्तगुणांनी जिंकल्याच. अपेक्षितच होते. पण नेमक्या सातच गुणांनी का? सप्तसमुद्र, सप्तद्वीप, सप्तग्रह, सप्ताश्व, सप्तर्षी, आणि आता हा सप्तगुणांनी काकूंचा विजय. नारायण नारायण!
ब्रह्मा, कवी म्हणतो, सप्तर्षींच्या पुढे १३ लक्ष योजनांवर अढळ धृव तारा आहे. तेथेच भगवान विष्णूंचाही वास आहे. त्यांना कवी वंदन करतो. अगदी भागवत पुराणाचीच कथा.
ब्र: नारदा, म्हणजे धृव तारा पृथ्वीपासून ३६ लक्ष योजनांवर. सूर्याचा रथ ३६ लक्ष योजने लांबी असलेला. हे ३६ खूपदा आहे बा या भागवत पुराणात.
ना: काय मोजून मापून, आखून रेखून काटेकोरपणे तू सृष्टी निर्मिलीस ब्रह्मा. तू वास्तुविषारद आहेस ब्रह्मा! व्वा!
ब्रह्मा, पुराणात असेही म्हटले आहे की पृथ्वी हा जणू द्विदल धान्यातला अर्धा भाग. तुरीच्या दाण्यातली फक्त एक डाळ. नंतर तारांगण. व त्यावर द्विदलाचा उरलेला भाग. खालची डाळ, म्हणजे पृथ्वी. मध्ये तारांगण. आणि नंतर उरलेला द्विदलार्ध म्हणजे स्वर्गलोक त्या तारांगणावर. अगदी काकू बनवतात तसे सँडविच! सत्य असो वा नसो. पण काय अप्रतिम कल्पनाविस्तार. धन्य ते पुराणकार!
ब्र: नारदा, किती सविस्तर रे हे तारामंडलाचं, भुवनकोशाचं वर्णन. मी नसलो तरी जो कोणी सृष्टीकर्ता असेल त्याने आधी विचार केला असेल, आकडेमोड केली असेल, आराखडा तयार केला असेल, कागदावर आलेख काढला असेल, माॅडेल तयार केलं असेल. त्याशिवाय का एवढा मोठा प्रकल्प सिद्धीस गेला असेल? भागवत सप्ताहातून भुवनकोशाचे व तारांगणाचे हे सर्व ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविले जात आहे हेही वाखाणण्याजोगे आहे. म्हणूनच ऐकणारे एवढे मंत्रमुग्ध होतात. आहेच हा सर्व प्रकार अद्भुत.
पण नारदा, हे सर्व खरे आहे का रे? कापुसकोंड्याच्या गोष्टीत खरे काय, खोटे काय हे नक्की कळत नाही. वरून तुझा मिस्कीलपणा!
ना: ब्रह्मा, मी कोण रे यावर भाष्य करणारा? पण मास्तरांच्या शाळेत विज्ञानप्रदर्शनात मी नकाशे, माॅडेल्स पाहिली आहेत. नुकताच मी काकूंच्या फोनवर म्हातारीच्या सगळ्यात लहान नातवाने, निनादने तयार केलेल्या सूर्यमालिकेच्या माॅडेलचा फोटो पाहिला. त्यात तर सूर्य मध्यभागी व त्याभोवती मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि फिरताना दाखविले आहेत. आणखीही काही ग्रह होते. नवल म्हणजे पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. ब्रह्मा, पृथ्वीभोवती फक्त चंद्र फिरतो. तो आपल्याला सगळ्यात जवळचा लहानसा ग्रह. म्हणून तर मानव पहिले तेथे जाऊन आला. सूर्य जर इतका जवळ, तर चंद्रयानाऐवजी आधी सूर्ययान नसते का पाठवले मानवाने?
ब्रह्मा, सूर्य पृथ्वीपासून अंदाजे ९ कोटी मैल दूर आहे. सर्वच ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. ते सर्व आणि सूर्य एका सरळ रेषेत आले असता पृथ्वीपासून इतर ग्रह किती दूर असतील तेही आज शाळकरी मुलाला माहीत आहे. पृथ्वीला शुक्र सर्वात जवळ म्हणजे ३ कोटी मैलांवर, मंगळ साडे चार कोटी मैलांवर, बुध साडेपाच कोटी मैलांवर, गुरू ४० कोटी मैलांवर, शनी ८० कोटी मैलांवर. म्हणजे ८०००००००० मैलांवर. चंद्र फक्त अडीच लाख मैलांवर. म्हणजे २५०००० मैलांवर. धृव किती मैलांवर आहे हे मी तुला आधीच सांगितले आहे. २००००००००००००००० मैलांवर. मी हे सर्व अंदाजे सांगतोय. ब्रह्मा इथून मास्तरांचा वाडा ३ मैलांवर आहे. ते लक्षात घेतले तर या अंतरांची तुला कल्पना येईल. भागवत पुराण त्या पुरातन काळचे ज्ञान असावे, कयास असावा, कविकल्पना असावी. कल्पनाविलास असावा. मला तर ते काहीही असले तरी स्पृहणीयच वाटते. ते सत्य मानणे, त्यातील कथा सत्यकथा आहेत असा अट्टाहास धरणे, हा त्या ज्ञानपिपासू पूर्वजांचा अपमानच नव्हे का? मी आपला एक विचार मांडला. बघ पटतो का?
ब्रह्मा, हे तारांगणातले आपले सोयरे सपाट वर्तुळाकार नसून चेंडूसमान गोलाकार आहेत. आजचे तारांगणाचे चित्र एकदम वेगळे आहे. आज लहान मुलाला जरी हे पुराणोक्त तारांगणाचे चित्र रंगवून सांगितले तर तोही म्हणेल 'गप्पा नका मारू आजोबा'. मला तर वाटते की तुझेही आधुनिक माॅडेल चतुर्मुखी नसून वेगळेच काहीतरी असावे.
ब्रह्मा, जुन्या पुराणोक्त ज्ञानशीळेची झीज ज्ञानसरितेच्या प्रवाहात सतत सुरू आहे. आता जंबुद्वीपावर ऊसाच्या रसाच्या, जांभळाच्या रसाच्या, आंब्याच्या रसाच्या नद्या वाहत नाहीत. फक्त ज्ञानसरिता अखंड वाहते. या नदीचा ओघ आता भगीरथ सुद्धा वळवू शकेल असे वाटत नाही. खरे म्हणजे भागवत पुराणातली गंगेची गोष्टही खूप छान आहे. वाचू कधीतरी.
ब्र: नारदा, मला आज तारांगणाची कथा हवी होती, तुला भेंड्या ऐकायच्या होत्या. दोन्ही गोष्टी झाल्या. मला तर हे सारे खरे वाटते. की याही कापुसकोंड्याच्या कविता झाल्या? हे सारे कोणी जुळवून आणले? आपण नाही. मानवानेही बहुधा नाही कारण त्याला तू मला तारांगणाची गोष्ट सांगतो आहेस हे माहीतही नाही. खरे म्हणजे आपण येथे आहोत हेही त्याला माहीत नाही. मग आजच्या सामन्याचा करविता कोण? हा तिसरा कोण? हासतोस काय? तू आणि काकाकाकू मिळालेले तर नाही? सर्वांनी मिळून हे सारे घडवून तर नाही आणले? नारदा, तू वाटतो तितका साधाही नाहीस रे! सतत काहीतरी कारस्थान! आणि गप्पा म्हणजे रे काय नारदा?
ना: नारायण नारायण! ब्रह्मा! गप्पा मारू आपणही कधी. पृथ्वीतलावर गप्पा मारण्याची कला फार आवश्यक आहे बरे. ब्रह्मा आज जे झाले ते घडविणारा तो तिसरा कोणी दुसरा नसून आज येथे घोंघावणारा भुंगा, भ्रमर असावा. तोच शारदेच्या, सरस्वतीच्या, माझ्या नी तुझ्या कानात मधूनमधून काहीतरी गुणगुणत होता व आपल्या ओठातून ते त्याचे शब्द तसेच्या तसे बाहेर येत होते. आज असे होणार हे त्याने आधीच लिहून ठेवले होते असे मला वाटते. आज फक्त तसेच्या तसे घडले. ब्रह्मा, व्यासलिखित नाही, आज भ्रमरलिखित घडले. ते कोणाला टळत नाही रे! भुंगा हा देवाधिदेव झाला आहे काकाकाकूंच्या घरी आजकाल असे वाटते मला.
ब्रह्मा! खरेच आपला काल्पनिक रूळ व मानवाचा समांतर सत्य रूळ ह्या दोघांच्या मधे आपण आज तोंडबुचक्या पडलो की काय? आता सर्व भ्रमरच ठरवितो की काय? म्हणूनच काल रात्री ती अस्पष्ट आरती ऐकू येत होती की काय? बघ पुन्हा तीच आरती ऐकू येत आहे. गुणुगुणुगुणुगुणु!
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ।
चरण कमळदळु रे भ्रमरा ।
भोगी तू निश्चळु रे भ्रमरा ।।
सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विंदिदु रे भ्रमरा ।
सौभाग्यसुंदरु रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरु रे भ्रमरा ।।
_____________________
अनुक्रमणिकेकडे