Tuesday, 22 December 2015


गोष्ट सातवी


ब्र: कोण आहे, कोण आहे!

ना: ब्रह्मा, अरे घाबरतोस काय असा? तुझी टक्कर आणखी कोणाशी होणार? मीच आहे. ब्रह्मपुत्र नारद. संध्याकाळ झाली तरी काकाकाकूंचे स्टडीरूम, म्हणजे खरे म्हणजे आपली खोली, लावण्याचे काम सुरूच होते. तुझा झाडावरच डोळा लागला होता. म्हणून हळूच जाऊन मी बघून आलो कुठपर्यंत आले काकाकाकूंचे काम ते. आता आटोपत आले आहे. आपली खोली अगदी चकाचक झाली आहे. तिथे आता न जाळी न कोळी. तुझा तो रात्रभर कोळी-चिलटाचा खेळ पाहण्याचा विरंगुळा आता भूतकाळजमा होईल. अर्नाळपुराणातल्या 'रिमोट कंट्रोल' नामक स्कंधामधे त्याचे सविस्तर वर्णन आहे. आठवते ना?

ब्र: हं. आजही त्या कोळ्यावरचा राग गेला नाही माझा. बिचारी चिलटे!

ना: ब्रह्मा, परत येऊन बघतो तो तू झाडावर नाहीस. अंधारही पडलेला. असशील आसपास कुठे म्हणून मी असाच रात्रीचे आकाश न्याहाळत होतो. हा अष्टमीचा चंद्र नेहमीच मला वेड लावतो. तो अर्धप्रकाशित चंद्र डोळ्यात भरतो. पण अर्धा चंद्र अंधारात असतो या जाणीवेने मन गदगदते. तो अर्धचंद्र डोळेभरून पाहता पाहता, नकळत मागून तू येऊन आदळलास.

ब्र: मी आदळलो की तू आदळलास? नारदा, मला जाग आली तर तू खालच्या फांदीवर दिसला नाहीस. अंधार पण झाला होता. झाडाच्या पानातून वर बघतो तर आकाशात लक्ष लक्ष दिवे लागलेले दिसले. आधी एकदा गच्चीवर आपण रात्रभर दोघेच बसलो होतो तेंव्हाच काय ते रात्रीचे आकाश मी पाहिले होते. आज दुसऱ्यांदा. आज मलाही सप्तर्षी व धृवतारा ओळखू आले. असे वाटले जणू धृवबाळ हात हालवून मला अभिवादन करीत आहे. म्हणून मी पण झाडावरून उतरून हात हालविला. बाळ हासला असे वाटले. सप्तर्षींना पण मनोमन नमस्कार करून, नजर आकाशाकडे ठेवून मी अनवधानाने इथवर चालत चालत आलो. तर तू येऊन आदळलास पाठीमागून. तशी माझीच चूक. तुला पाठीमागचे दिसत नसले तरी मला दिसते. सर्व दिशांना माझे डोळे. पण आज ते आठही डोळे हे अवकाशातले अद्भुत तारांगण पाहण्यात मग्न होते. असो! तुला लागले तर नाही?

ना: नाही ब्रह्मा! अरे ज्यांना शरीर नाही, ज्यांना वजन नाही, ज्यांना डास चावत नाही, त्यांना लागणार तरी काय, कसे, आणि कुठे? निर्गुण निराकारांची ही पहिली वहिली टक्कर. थोडा वेगळा अनुभव आला एवढेच.

ब्र: पण नारदा, आपली कोणाशी टक्कर होत नाही असे तूच तर म्हणाला होतास. मग आज आपली टक्कर कशी रे झाली?

ना: ब्रह्मा, काकूंशी किंवा काकांशी किंवा टेबलाशी, पलंगाशी आपली टक्कर होत नाही. कारण त्यांना लौकिकार्थाने अस्तित्व आहे. ते सगुण साकार आहेत समज. आपण पडलो निर्गुण निराकार, काल्पनिक. ते असणारे, आपण नसणारे. अशा भिन्न तत्वांची टक्कर होत नाही. काकांची काकूंशी होऊ शकते. कारण अस्तित्व हे त्यांच्यातले साम्य आहे. आपले अनस्तित्व, काल्पनिक रूप हे आपल्यातले साम्य. म्हणून आपली एकमेकांशी टक्कर होऊ शकते. ब्रह्मा, दोन कल्पनांची, दोन विचारसरणींची टक्कर होऊ शकते. विचारवादळ उभे राहू शकते. जगाच्या इतिहासात विचारांचे युद्ध पुढे जाऊन महाशस्त्रयुद्ध झाल्याचे दाखले आहेत. आपली टक्कर होऊच शकते. जशी आत्ता झाली तशी. तू मी एकमेकाशी संवाद करू शकतो. काका काकू एकमेकाशी भांडण करू शकतात. पण मी काकाकाकूंची, किंवा ते तुझीमाझी टिंगल टवाळी करू शकत नाही.

ब्रह्मा कल्पना आणि सत्य हे कधीही हातमिळवणी करू शकत नाहीत. त्यांचा मिलाप शक्य नाही. पण ते दोघेही सतत एकमेकाला समांतर मार्गाने अनंताकडे जात असतात. आगगाडीचे दोन रूळ, रस्त्याचे दोन काठ, नदीचे दोन तीर आहेत हे सत्य आणि कल्पना. वाटतात दूर कुठेतरी मिळालेले, पण जाऊन पहावे तर वेगवेगळेच दिसतात. एक प्रकारचे मृगजळ आहे सत्य आणि कल्पनेचे मिलन. एक प्रकारची कल्पना.

तरी पण ब्रह्मा, अमीलनाचा शाप असलेले हे दोघे शापित एकमेकापासून फार दूरही नाहीत. आगगाडीचे रूळच बघ. त्यांच्या खाली असंख्य आडव्या लाकडी, लोखंडी पट्या असतात. त्यावरूनच ते दोघेही धावतात. तसेच सत्य आणि कल्पनेला सांधणारे पण अनेक दुवे असतात. मनुपुत्र चंद्राकडे पाहतो, तिथे जाण्याची कल्पना करतो, आणि स्वबळावर कधीतरी तेथे जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतो. कल्पना सत्य करतो. कोण जाणे, त्याने आपली केलेली कल्पना कधीतरी तो सत्य करील. त्यातीलच कोणी कधी त्रिलोकसंचारी नारद होईल. कोणी तुझ्यापेक्षाही सरस सृष्टी निर्माण करेल.

ब्रह्मा, कधी न मिळणारे, कधी न जुळणारे सत्य आणि कल्पनेचे हे रूळ, यावरच या मानवांची आगगाडी पूर्वापार चालत आली आहे.

ब्र: नारदा. अशीच ती चालावी. असेच कधीतरी मानवाला अभिप्रेत सर्वगुणसंपन्न ब्रह्मरूप मानवानेच प्राप्त करावे. सत्यब्रह्म मानव प्रत्यक्षात यावा. आपल्या अनुभवाने शहाणे होऊन त्याने खरोखरच नवसृष्टी निर्माण करावी. फक्त एकच मागणे आहे. त्या सृष्टीत त्या २८ नरकांची गरजच भासू नये. सगळीकडे स्वर्गच स्वर्ग. सारेचे सारे त्रिलोकी झेंडा लावणारे महाज्ञानी नारद. सारेच गणपति, साऱ्याच सरस्वती. त्याच्या सर्व देवत्वाच्या कल्पनांचे साकार रूप त्यानेच घ््यावे. त्यासाठीच तर त्याने पूर्णत्वाची, पूर्णप्ुरुषाची, म्हणजे आपली कल्पना केली.

ना: व्वा! ही तुझ्या कल्पनेतली सृष्टी कधीतरी खरेच निर्माण होईल. मला तर वाटते ४२६८८३ वर्ष उलटण्याआधीच होईल.

ब्र: तथास्तु! पण ४२६८८३ वर्षच कां?

ना: अरे, कलियुग संपायला अजून ४२६८८३ वर्षे आहेत असे तुझ्याच वेदात की उपनिषदात आहे. तूच म्हणाला होतास की हे सातव्या मानवांतरातले शेवटचे युग आहे. मग सातव्या मनूचे, वैवस्वताचे राज्य संपेल. त्याआधीच हा हुशार मानव आपली स्वतःची सत्याधारित सृष्टी निर्माण करेल. आपल्यालाही त्यात खऱ्या अर्थाने सत्यरूप मिळेल. मग तुला तुझा आठवा मनू वगैरे पाठवायची गरज नाही पडणार. तुझीही पन्नाशी उलटेल. तूच म्हणाला होतास की हे तुझे पन्नासावे वर्ष आहे आणि सातव्या मनूचे त्यातले हे शेवटचे कलियुग आहे म्हणून.

ब्र: नारदा, तू बोलायला लागला की वाटते कधी आपण ह्या रूळावर आहो, कधी त्या रूळावर! कधी सत्य आणि कल्पनेच्या नेमके मध्ये आपण तोंडबुचक्या पडणार तर नाही?

ना: ब्रह्मा, काय फरक पडतो? आपल्याला काही लागणार नाही, न काही इजा होणार. आपले पडणे हीही सत्य आणि कल्पनेची टक्करच. असून नसल्यासारखी. नारायण नारायण!

ब्रह्मा: अगदी गोंधळून टाकलेस बघ. असाच गोंधळ हे तारे पाहता पाहता झाला. धृव आणि सप्तर्षी म्हणजे आठ तारे. त्यांची सत्यकथा पण तू सांगितलीस. पण नारदा, ह्या तारांगणात तर असे अगणित तारे आहेत रे. मी मोजायला पण सुरुवात केली. पण धृवाच्या दिशेनेच इतके काही दिसत गेले की मी मोजता मोजता थकून गेलो. ह्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी तू मला कधी सांगशील? उत्तानपादाला अनेक हट्टी मुले होती की काय? त्यांनीही तपस्या करून अढळपद प्राप्त केले काय?  हे चमचमणारे तारे ही कोणाची घरे? ही कोणी रे बांधली? ही किती दूर, किती मोठी? ही कोणाभोवती फिरत असतात? ही घरे दिवसा कां दिसत नाहीत? हे सूर्याला घाबरतात का काजव्यासारखे? हे खूप विशालकाय काजवेच तर नाहीत?

ना: ब्रह्मा, सबूर! किती प्रश्न! रात्रीचे तारांगण, रात्रीचा चंद्र, दिवसाचा सूर्य, यांचे मनुपुत्रांनाही फार आकर्षण. आज तू पहिल्यांदा आकाश बघतो आहेस इतके निरखून? तू जसा विस्मयचकित झाला तसाच आदिमानवही. त्या जंतुकवीच्या मानवचंद्र कवितेत या आकाशातील तारांगणाचे, या रांगोळीचे थोडेफार वर्णन आहे. वाच कधी.

दिवसभरी शेतात कष्टुनी शेतकरी थकला
दगड घेउनी डोक्याखाली शेतावर झोपला
झोप येईना, आकाशातील रांगोळी आगळी
किती प्रयत्ने डोळ्यामाजी मावे ना सगळी

रात्रचांदणी रोज अनोखी, चंद्र असे, कधी नसे
काही चांदण्या अंधुक, तर काहींचे स्पष्ट ठसे
काही डोळे मिचकाविती, तर निर्विकार काही
मेघ सांडता खवल्या खवल्या, दृष्य अलौकिक दिसे

अविरत जात राहती तारे सारे एकीकडे
कोणाची त्या ओढ, कोण तो आकाशापलिकडे?
एक परंतु तारा ऐसा जो न कधी ढळतो
रात्रभरी तो तिथेच स्थिर, तो कोण बरे असतो?

सारे तारे पूर्वेकडुनी पश्चिमेस जाती
चंद्र सूर्यही मार्गक्रमणा नित्य तीच करिती
एकच तारा खिळून राही आपुल्याच स्थानी
गूढ काय हे आकाशाचे? प्रश्न सदा तव मनी

ब्रह्मा, मानवाला जसे कुतुहल होते तसेच तू दाखवीत आहेस. मला फार नवल वाटते. अरे ही सारी तुझीच निर्मिती, तूच तारांगणाचाही निर्माता. तुलाच कसे रे विस्मरण झाले? तुला कसा रे पन्नाशीतच स्मृतिभ्रंश? नारायण नाराचण!

ब्र: नारदा! नको रे ते 'नारायण नारायण'. सांग मला तारांगणाविषयी माहिती संपूर्ण. पुराणात असलीच पाहिजे. सांग मला सूर्याबद्दल, सांग मला चंद्राबद्दल, सांग मला ताऱ्यांबद्दल. थोडे सांग. थोडा दिशानिर्देश कर! मी वाचीन.

ना; ब्रह्मा! हे सर्व गूढ अनेक पुराणात उकलले गेले आहे. ताऱ्यांचे नभोमंडळातले स्थान, त्यांचा आकार, त्यांची गती, सारे सारे पुराणात आहे. सारेच सांगणे कठिण आहे. पण आज आपण मोठे जे दोन ग्रह आहेत ते, म्हणजे सूर्य व चंद्र यांची माहिती घेऊ. मग कधी जमल्यास बाकी तरतमदृष्ट्या लहान ग्रह ताऱ्यांची माहिती घेऊ. काकाकाकू जोपर्यंत झोपी जात नाहीत व आपल्याला आपल्या खोलीत जाता येत नाही तोवर सांगतो आजची ही गोष्ट. तुझं एक तोंड राहू दे घरावर केंद्रित. काकाकाकूंनी दिवे मालवले की सांग मला.

सांगू मग आजची कापुसकोंड्याची गोष्ट?

ब्र: अरे सांग. अविलंब!

ना: ब्रह्माजी, ही नुसती राजाराणीची गोष्ट नाही. ही विज्ञानकथा आहे. हे आपण जे तारांगण पाहतो त्याचे विज्ञाननिष्ठ विवरण आहे यात. भागवत महापुराणात मैत्रेय ऋषी ज्ञानपिपासू विदुराला, कधी शुकाचार्य परिक्षिताला, कधी कोणी कोणाला हे ज्ञानदान करतात. भागवत महापुराण म्हणजे गुरुशिष्य संवादच आहे म्हण. कधी मी, म्हणजे नारदाने, सुद्धा त्यात असा वर्ग भरविला आहे. प्रचेत्यांना मी उपदेश केला आहे. तारांगणाचे हे विवरण सत्यनिष्ठ असून सर्व निष्णात लोकांना मान्य आहे असे पुराणात ऋषी अनेकदा प्रतिपादितात. हे पुराण ज्या काळी लिहिण्यात आले, ज्या कोणी लिहिले, त्यांनी ज्ञानविज्ञानाची मोठी सेवाच केली आहे असे म्हणावे लागेल. उत्क्रांती जशी जीवांची होते, तशीच ज्ञानविज्ञानाची पण होते. त्यामुळे यातील प्रत्येक कथन दगडावरची रेघ आहे असे मानणे, न मानणे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण वेदपुराणांवर विश्वास न ठेवणारा नरकाचा रहिवासी होतो हेही या पुराणात सांगितले आहे, हेही मला नमूद करायला हवे. मी पट्टीचा पुराणिक आहे असे तूच एकदा म्हणाला होतास. पुराणिकाचे काम पुराणातले कथन जसेच्या तसे सत्यनिष्ठेने सांगायचे. तेच मी करणार आहे.

मग करू कापुसकोंड्याची गोष्ट सुरू?

ब्र: नारदा, तुझं निरुपण फारच लांबतं बा. अरे, घाल कीर्तनाला हात आता. नाहीतर निरुपणातच अडकून पडू दोघे.

ना: ब्रह्मा, सूर्य आपण रोजच पाहतो. इकडून उगवतो, अन तिकडे मावळतो. इकडेला पूर्व म्हणतात, व तिकडेला पश्चिम हे तुला माहीतच आहे. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की आपल्या उजव्या हाताला दक्षिण व डाव्या हाताला उत्तर दिशा असते. एवढे तरी तुला नक्कीच माहीत असेल.

ब्र: नारदा, तू सतत छळत असतो. अरे मला चार दिशांना चार तोंडे. कोणचे पूर्वेकडे करावे माणसाने? मला काय उजवे, काय डावे?

ना: ओहो, हे माझ्या लक्षातच आले नाही. जरा वेगळ्या प्रकाराने सांगावे लागेल. मीच पूर्वेकडे तोंड करतो. आता माझ्या या हाताला दक्षिण अन् इकडे उत्तर. उत्तरेला धृव तारा. अढळ तारा. उत्तरेला तोंड करून उभे राहिले तर उजव्या हाताला जी दिशा ती पूर्व. व डाव्या हाताची पश्चिम. पाठीमागची दक्षिण. आले का लक्षात?

ब्र: अरे एकतोंड्या, मला चार चार तोंडे आहेत रे. पुन्हा तुझे तेच.

ना: ब्रह्मा, आता असे बघ. आपल्या खोलीत शिरतांना आपले तोंड जिकडे असते ती उत्तर दिशा. उजवीकडची पूर्व, डावीकडे पश्चिम, मागची दक्षिण.

ब्र: अरे रामचंद्रा! कसे सांगू याला? नारदा मला आता तूच सांग माझे डोळे कोणत्या दिशेला बघत आहेत? माझे तोंड कोणत्या दिशेला आहे?

ना: चारही दिशांना.

ब्र: अरे तेच तर मी सांगतो आहे. नारदा, सूर्योदयाची दिशा पूर्व. सूर्यास्ताची पश्चिम. धृव तारा उत्तरेकडे. आणि उरलेली चौथी दिशा दक्षिण. हे मला समजले. पण याचा आजच्या गोष्टीशी काय संबंध? गोष्ट सुरू कर. सूर्याबद्दल सांग सुरुवातीला. उगवू दे कथासूर्य. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!

ना: ब्रह्मा, तुला दिशा समजल्या असतील तर पुढे जाऊ. तर, ब्रह्मा, प्रियव्रत नावाचा एक राजा होता.

ब्र: नारदा, हा उत्तानपादाचा भाऊच का रे? पहिल्या मनूचा, म्हणजे स्वायंभूवाचा, म्हणजे माझ्या मानसपुत्राचा पुत्र? माझा नातू?

ना: नाही ब्रह्मा, हा प्रियव्रत त्यानंतर मोठ्या कालखंडाने आलेला भरतवंशोत्पन्न महापुरुषांच्या श्रृंखलेतला हा एक महान राजा.

ब्र: अरे पण वंशावळी सांगशील की नाही?

ना: ब्रह्मा, भरतापासून १८-१९ पिढ्यांनी हा आला. म्हणशील तर वंशावळी सांगतो. ब्रह्मा, त्याकाळी एकेकाला अनेक भार्या, अनेक पुत्रकन्या. अरे म्हणूनच तर एका ब्रह्माचे १२५ कोटी झाले ना? पण तुझ्याकडे पूर्ण रेकाॅर्ड असतो. तुला माहीत असावे भरत कोण आणि नंतरचा भरतवंशाचा पूर्ण वंशेतिहास.

ब्र: नाही रे आठवत. तूच सांग.

ना: ब्रह्मा, भरत पृथ्वितलावर आला तीही एक मोठी गोष्ट आहे. मोठ्ठी कापुसकोंड्याची गोष्ट. ती नंतर कधी. आज भरतापासून प्रियव्रतापर्यंतची वंशावळी जशी भागवतात आहे तशी सांगतो. मधे थांबवू नकोस. मी गोंधळून जाईन.

ब्रह्मा, भरताचा पुत्र सुमती. सुमतीला पत्नी वृद्धसेनेपासून देवताजित पुत्र. देवताजिताला असुरीपासून देवद्युम्न नावाचा मुलगा. देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमेष्ठ. परमेष्ठाला सुवर्चलेपासून प्रतीह नामक पुत्र. प्रतीहाला सुवर्चलेपासूनच प्रतिहर्ता नावाचे पुत्ररत्न. प्रतिहर्त्याला स्तुतीपासून भूमा. भूमाला ऋषिकुल्येपासून उद्गीथ. उद्गीथाला देवकुल्येपासून प्रस्ताव. प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू. पुढे विभूला रतीपासून पृथुषेण.

ब्र: शेण?

ना: ब्रह्मा, तुला आधीच सांगितले मध्ये टोकू नकोस म्हणून. अरे शेण नाही, षेण. पोटफोड्या ष, शेंडीफोड्या नाही. केलास ना घात. कुठवर आलो होतो आपण?

ब्र: पृथुषेण. पोटफोड्या.

ना: पृथुषेणाला आकूतीपासून नक्त. नक्ताला द्रुतीपासून गय. हा गय सर्वदृष्टीनी उत्तम पुरुष. म्हणून याला विष्णूंचा अंश मानल्या जाते. महापुरुष मानले जाते. गयाला गयन्तीपासून चित्ररथ. चित्ररथाला ऊर्णा पासून सम्राट. सम्राटाला उत्कलेपासून मरीची. मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान. बिंदुमानाला सरघेपासून मधू. मधूला सुमनेपासून वीरव्रत.

ब्रह्मा हाच आपल्या आजच्या गोष्टीतला वीरव्रत राजा. महापराक्रमी. सूर्यदेवांशी स्पर्धा करू पाहणारा भरतवंशी, महाशूर, महाराजा.

ब्रह्मा, म्हणशील तर पुढच्या पिढ्या पण सांगू शकतो. सांगू का?

ब्र: बापरे! एवढे सगळे पुराणात आहे? नको सांगू पुढचे पुत्रपौत्र. पुढे कधी. पण नारदा, एवढे सगळे कोणी लक्षात ठेवले? कोणी कोणाला सांगितले?

ना: तुला काय वाटले? महापुराण आहे म्हटलं ते. शुकाचार्यांनी परिक्षिताला ही सारी माहिती दिली आहे. आपल्या गोष्टीचा संबंध मात्र प्रियव्रताशी आहे. प्रियव्रताचा रथ फारच मोठा होता. प्रियव्रताचा हा विशाल रथ गोलाकारात फिरून फिरून त्याच्या चाकांनी जमिनीवर सात  गोलाकार खाचा पडल्या. या सात गोलाकार खंदकांसारख्या खाचांच्या मधल्या भागातील जमीन उंच येऊन त्याचे विशाल आणि उंचच उंच पर्वत झाले. अशा तऱ्हेनी सहा वर्तुळाकृती पर्वत व सात वर्तुळाकृती खंदक तयार झाले. हे खंदक वेगवेगळ्या प्रकारच्या द्रव्याने भरले गेले व त्यांचे सात समुद्र झाले.

ब्र: नारदा, असे समजत नाही रे. जरा आकृती काढून समजवतोस का? भूगोल शिकवितांना नकाशा काढावा माणसाने. नाहीतर डोळ्यासमोर दृश्य उभे राहत नाही.

ना: चल, टेबलावर काढू.

ब्र: नको नको. पुन्हा भानामतीचा संशय येईल. तो प्रकार नको. इथेच आंगणात मातीवर बोटाने काढून दाखव. नंतर मिटवून टाकू.

ना: ठीक. हे बघ. हा मी काढला माझ्या बोटाने एक गोल. तुझ्या त्या रावणाच्या तोंडासारखा. शून्यासारखा. ह्यालाच वर्तुळही म्हणतात. बोट रुतवून मातीत फिरविल्यामुळे एक वर्तुळाकृती खाच पडली. खाचेत मी जर पाणी टाकले तर ही खाच भरून खंदकासारखी दिसेल. आता ह्या खाचेभोवतीच मी दुसरे थोडे मोठे वर्तुळ काढतो बोटाने. हा दुसरा मोठ्या आकाराचा खंदक. पाणी टाकले तर हाही भरेल. या दोन वर्तुळाकृती खंदकांमध्ये, दोन खाचांमधली माती थोडी वर आली. तो वर्तुळाकृती पर्वत समज.

ब्र: हं. समजायला लागले. आता मी काढतो तिसरे वर्तुळ. हे बघ. ही झाली तिसरी खाच. आणि तिसऱ्या आणि दुसऱ्या खाचेमध्ये हा दुसरा वर्तुळाकृती पर्वत. आता हा चौथा आणखीन मोठा गोल खंदक. चौथ्या आणि तिसऱ्या खंदकामधे हा  तिसरा वर्तुळाकृती पर्वत. हा पाचवा खंदक. हा चौथा पर्वत. हा सहावा खंदक. हा पाचवा पर्वत. हा सातवा खंदक. हा सहावा पर्वत. व्वा, मजा आली.

ना: ब्रह्मा, खरेच. किती दिवसांनी मातीशी खेळलो. काय मजा आली. नखात माती गेली. मज्जा मज्जा आली. मातीत पाणी टाकल्याबरोबर काय सुंदर वास आला. केवडासुद्धा लाजेल. वाड्याच्या आंगणात म्हातारीची मुलेमुली लहानपणी माती खेळायची. उन्हाळ्यात दिवसभर तापून कोरड्या झालेल्या मातीवर ऊन उतरल्यावर सडा टाकला की काय सुवास यायचा? उन्हाळा जाऊन मृगाचा पहिला पाऊस आंगणात पडला की काय सुगंध दरवळायचा? असा खमंग सुवास फक्त पुरणपोळीचाच.

ब्रह्मा, चिखल असेल तर आणखीनच छान. चिखलात तळहात लिडबिडला आणि त्याने गंजाला बूड लावले की ब्रह्मानंद!

ब्र: नारदा, हे बूड म्हणजे काय रे?

ना: ब्रह्मा, सांगणे कठिण रे. पण पातेल्याला बाहेरून अशी माती फासली की चुलीवर पातेलं ठेवलं तरी आतले भात वा वरण जळत नसे, करपत नसे.

ब्र: नारदा, चूल म्हणजे काय रे?

ना: ब्रह्मा, नको विचारूस. चूल म्हणजे काय सांंगायला चिक्कण माती काय सांगावं लागेल. चिक्कण माती काय सांगताना 'घ््या ना बाई चुलीची माऽऽतीऽऽ' सांगावे लागेल. हे सगळं सांगू म्हटलं तर कोणाला समजणार नाही. समजले तर विश्वास बसणार नाही. ते युगच संपले. आजच्या युगात त्या गतयुगातल्या गोष्टी कापुसकोंड्याच्या गोष्टी वाटतील. जशी आजची आपली गोष्टं.

ब्र: बरं राहिलं. नारदा. मला मनापासून असं वाटत आहे की हे सातही खंदक पाण्याने भरावे. आणू का टाक्यातून थोडे पाणी हे समुद्र भरायला?

ना: मी टाकतो. हे बघ भरले खंदक. सात गोलाकार समुद्र. आणि त्यांना एकमेकापासून दूर ठेवणारे हे सहा गोलाकार पर्वताळ प्रदेश. आणि सगळ्यात आतल्या खंदकानी वेढलेला हा जमिनीचा पोळीसारखा गोल तुकडा. तुझ्या निर्मितीची तोड नाही ब्रह्मा! नारायण नारायण!

ब्र: अरे, चिडवणे सोड नारदा. प्रियव्रताच्या रथाच्या चाकांनी निर्माण झालेल्या समुद्रांचा आकार केवढा. त्यांना काही नावे आहेत का?

ना: होय ब्रह्मा! पुराणात सारी सारी माहिती आहे. आपण केलेल्या खाचांची रुंदी आपल्या बोटाच्या जाडी एवढी. प्रियव्रताच्या रथाच्या चाकांनी केलेल्या प्रत्येक समुद्राची रुंदी लाखो योजने. मधले पर्वताळ प्रदेश पण असेच रुंद, पर्वतही हजारो योजने उंच.

ब्रह्मा, हे सहाही गोलाकार पर्वत म्हणजे बेटेच झाली कारण हे सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेले आहेत. एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर पाणी ओलांडूनच जाता येईल. म्हणजे हे सहाही पर्वत म्हणजे सहा द्वीप झाले, सहा बेटे. तसेच, सगळ्यात आतल्या खंदकाने वेढलेला जो गोल जमिनीचा खंड आहे तेही एक द्वीपच. त्या द्वीपावर कोण राहतं ओळख बघू.

ब्र: अरे मला काय माहीत? मी फक्त या भूगोलावर काकाकाकूंना ओळखतो.

ना: ब्रह्मा, ह्या द्वीपाचे नाव जंबुद्वीप. इथेच आपण सध्या राहतो. इथेच वाड्यातले मास्तर, म्हातारी, त्यांची पिल्ले, नातनातू, पणतपणतू, सुनाजावई, नातसुनानातजावई, सारे सारे राहतात. इथेच ती ३३ कोटींची वरातगंगा आली. आपल्या साऱ्यांचा पत्ता: जंबुद्वीप, भूमंडळ, ब्रह्मसृष्टी!

ब्र: नारदा, पत्ता आहे याचाच अर्थ अस्तित्वही आहे असा नाही का?

ना: ब्रह्मा, सोड तो अस्तित्वाचा अनस्तित्वाचा विषय. त्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपण सप्तद्वीपांबद्दल, सप्तसमुद्रांबद्दल बोलू.

ब्रह्मा, सगळ्यात आतले द्वीप, जंबुद्वीप वर्तुळाकार असून एक लक्ष योजने लांब रुंद आहे. मास्तरांनी शिकविलेली भूमिती आठवत असेल तर या वर्तुळाचा व्यास एक लक्ष योजने आहे असे म्हणता येईल.

ब्र: हो आठवते मला. व्यास एक लक्ष योजने म्हणजे त्रिज्या पन्नास हजार योजने हेही आठवते. नारदा, मीही एकदा शिकलेले सहसा विसरत नाही बरे!

ना: अर्थात. ब्रह्मा, जंबुद्वीपावर असलेले पर्वत, देश यांची सविस्तर माहिती नंतर सांगीन. पण जंबुद्वीपावर एक विशाल जांभळाचा वृक्ष आहे एवढे मात्र लक्षात ठेव. म्हणून त्याचे नाव जंबुद्वीप. जंबुद्वीप खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेले आहे. या समुद्राचा विस्तार जंबुद्वीपाएवढाच आहे. या खाऱ्या समुद्राला घेरणारे जे द्वीप आहे ते जंबुद्वीपापेक्षा दुप्पट विस्तार असलेले प्लक्ष नामक द्वीप आहे. येथेही एक विशाल सोनेरी प्लक्षवृक्ष आहे. ब्रह्मा, हे द्वीप अग्नीचे वास्तव्यस्थान आहे असेही पुराणात सांगितले आहे. सात जीभा असणारे अग्निदेव येथेच राहतात.

प्लक्षद्वीपाला त्याच्याएवढ्याच विस्ताराच्या समुद्राने वेढले आहे. हा समुद्र ऊसाच्या रसाने भरला आहे. या समुद्राच्या पलिकडे प्लक्षद्वीपापेक्षा दुप्पट शाल्मलीद्वीप आहे. हे द्वीप म्हणजे भगवान गरुडांचे निवासस्थान आहे. विष्णुवाहक गरुड.

अशा तऱ्हेने आधीच्या द्वीपापेक्षा पुढचे द्वीप दुप्पट आकाराचे तसेच प्रत्येक द्वीपाला घेरणारा समुद्र द्वीपाएवढाच अशी ह्या सप्तद्वीपांची व सप्तसमुद्रांची रचना आहे.

ब्रह्मा, शाल्मलीनंतरच्या चार द्वीपांची नावे कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप व पुष्करद्वीप. तसेच ऊसाच्या रसाच्या समुद्रानंतरचे पाच समुद्र अनुक्रमे मद्य, घृत, दूध, ताक व शुद्ध पाण्याने भरले आहेत. ब्रह्मा, या शुद्धोदक समुद्राच्या पलीकडे, म्हणजे खरे म्हणजे त्रैलोक्याच्या काठापर्यंच लोकालोक पर्वत व अतिविशाल भूभाग आहे. येथील जमीन आरशाप्रमाणे स्वच्छ असते व येथे फक्त देवगण राहतात. इथे मानवांना प्रवेश नाही. त्यांचा पदस्पर्श जरी या आरसपानी जमिनीला झाला तरी ते सदेह त्या भूमीत कायमचे लुप्त होतील. ते फक्त आरशातले प्रतिबिंब होतील.

ब्रह्मा, एक गोष्ट तुला खूप आवडेल. शेवटच्या द्वीपावर, म्हणजे पुष्करद्वीपावर एक कल्पनातीत विशाल कमळ आहे. ते तुझे आसन आहे. ते लाखो पाकळ्यांचे कमळ ब्रह्मकमळ आहे. आणि तू आज येथे एका झाडाच्या फांदीवर अंग चोरून बसला आहेस. काय काय खेळ दाखवतो हा काळ!

ब्र: नारदा, मी अगदी भारावून गेलो आहे रे. असे वाटते उडत उडत जावे आणि ही सप्तद्वीपे, हे सप्तसमुद्र, तो लोकालोक पर्वत, तो विशाल आरसा डोळेभरून बघून यावे. गोड्या आणि खाऱ्या पाण्याचे समुद्र सोडले तर बाकी पाच समुद्र म्हणजे पंचामृत स्नानाला योग्य. दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र, ताकाचा समुद्र, तुपाचा समुद्र, ऊसाच्या रसाचा म्हणजे गोड साखरेचा समुद्र. पंचामृत स्नान करावे म्हणतो. उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया. वा! जाऊ या का?

ना: ब्रह्मा, कल्पना छान आहे. कल्पनेतले आपण, कल्पनेचे पंख लावून तिथे जाऊ. पण ब्रह्मा, कल्पनेला कल्पनेचे पंख ज्याने आपली मूळ कल्पना केली तोच लावू शकतो असे मला वाटते. मला तर असे वाटते की काल्पनिक मी काल्पनिक तुला ही जी काल्पनिक कापुसकोंड्याची गोष्ट सांगतो आहे ही सुद्धा कोणी तरी माझ्याकरवी तसे करून घेण्याची कल्पना केली असेल म्हणूनच. कोण जाणे कोणी ही कल्पना केली! असो.

ब्र: नारदा, कधीकधी तुझे बोलणे फारच गूढ होत जाते रे. अर्थ कळला कळला असे वाटता वाटता तो हातातून निसटून जातो. साबणाच्या पाण्याचे बुडबुडे नुसते. असू दे. घे गोष्ट पुढे.

ना: ब्रह्मा, आता आपल्याला आपल्या बेटाकडे, जंबुद्वीपाकडे वळायला हवे. तसं म्हणावं तर सप्तद्वीपात हे द्वीप सर्वात लहान. पण 'मेरा भारत महान!'.

ब्रह्मा, जंबुद्वीप एक लक्ष योजने व्यासाचे वर्तुळ आहे हे आपण पाहिलेच. याच्या पूर्व-पश्चिम व्यासावर दहा विभाग करणारे वेगवेगळे वर्ष आहेत. ब्रह्मा, वर्ष म्हणजे ते ३६० दिवसांचे नाही. वर्ष म्हणजे देश समज. यातले ९ देश अंदाजे ९-९ हजार योजने लांब आहेत.

ब्र: म्हणजे नारदा, दहावा देश १९ हजार योजने लांब असेल.

ना: नऊ नऊ ८१ अन् १९ म्हणजे १००. बरोबर ब्रह्मा. अंकगणितात पैकीचे पैकी असतात तुला आजकाल. ब्रह्मा, जंबुद्वीपाच्या मधोमध जे वर्ष आहे ज्याला इलावृत म्हणतात. त्याच्या मधोमध एक खूप मोठा पर्वत, मेरु नावाचा पर्वत आहे. जंबुद्वीप सात समुद्राच्या मध्यावर. इलावृत जंबुद्वीपाच्या मध्यावर, आणि मेरु पर्वत त्याच्या मध्यावर. उंचच उंच पर्वत. एक लक्ष योजने उंच पर्वत. इतर पर्वतांपेक्षा अगदी भिन्न पर्वत. 'पायथ्याला लहान, शिखराला महान' असा उलटा पर्वत. पायथ्याला सोळा हजार योजने लांब, तर शिखराला ३२००० योजने लांब. सुवर्णकांतीने चमचम करणारा पर्वत. सुवर्ण पर्वत! मेरु पर्वत!

ब्र: पण नारदा, पर्वत म्हणजे मोठी टेकडीच ना रे? सीताबर्डीच्या गणपतीला तू एकदा नेलेस तेंव्हा मी ती विशाल टेकडी पाहिली. ती तर पायथ्याला ज्यास्त विस्तार असलेली व शिखराकडे निमुळती होत गेलेली. उलटे कसे शक्य? उलट्या पर्वतावर चढणार कसे? हा पर्वत कलंडून पडणार नाही का?

ना: ब्रह्मा हा कल्पनातीत असा पर्वत आहे. झाडासारखा समज. बुंध्याला लहान, वरचा वृक्षसंभार मोठा. तू लहान मुलांना भोवरा खेळतांना पाहिले असशील. फिरणारा भोवरा कसा खाली टोकदार व वर पसरट होत गेलेला असतो? मेरु पर्वत म्हणजे असेच काही समज. कावळ्याची छत्री! भोवऱ्याची आरू जशी जमिनीत घुसते तसा मेरु पर्वत पण १६००० योजने जमीनीतही घुसला आहे.

ब्र: पण नारदा, हा आपल्याला दिसतो का रे?

ना: ब्रह्मा, हा दिव्य पर्वत दिसायला दृष्टीही दिव्य लागते. हा पायथ्याशी १६००० योजने लांब, शिखराशी ३२००० योजने लांब, उंचीलाही एक लाख योजने उंच पर्वत, १६००० योजने जमिनीत रुतलेला पर्वत, हा अतुल्य पर्वत ज्याला दिसत नाही तो आंधळा. आणखी काय? नारायण नारायण!

ब्र: बरे बाबा. असेल. नाहीतरी मी म्हाताराच. नाही दिसत मला. इतक्या दूरचे सप्तर्षी मला दिसतात. पण हा जवळचा, आपल्याच जंबुद्वीपावरचा पर्वत खरेच नाही रे दिसत.

ना: ब्रह्मा, खरे सांगायचे तर मीही कधी पाहिला नाही. पण पुराणात आहे म्हणजे असला पाहिजे. नारायण नारायण!

ब्रह्मा, मेरुपर्वताच्या उत्तरेकडे जे वर्ष आहेत त्यांची नावे आहेत रम्यक, हिरण्मय आणि कुरू. आणि दक्षिणेकडचे देश म्हणजे हरिवर्ष, किंपुरुषवर्ष आणि भारतवर्ष. ब्रह्मा, या भारतवर्षात आपण राहतो. आणि मुख्य म्हणजे आपण या भारतवर्षाच्या मध्यभागी नागपूर नगरीत राहतो. विशाल त्रैलोक्यात, या विशाल भुवनकोशात हे आपले स्थान.

ब्र: चला, म्हणजे या त्रिभुवनात यावेळेस नेमके आपण कोठे आहो याचा थांगपत्ता लागला. छान!

ना: ब्रह्मा, मेरुपर्वताचे स्तंभ, म्हणजे खांब ज्यांना म्हणता येईल, त्या चार बाजूच्या चार पर्वतांची नावे मंदर, मेरुमंदर, सुपार्श्च आणि कुमुद. या चार पर्वतांवर चार विशाल वृक्ष आहेत. हे वृक्ष अकराशे योजने उंच आणि शंभर योजने वृक्षसंभार असलेले आहेत. आंबा, जांभूळ, कदंब आणि वड अशी ही चार झाडे.

ब्र: नारदा, म्हणजे हे सीताफळाचे झाड म्हणजे तर काहीच नाही रे. अगदी चिंटू!

ना: होय ब्रह्मा! चार पर्वतांवर दूध, मध, ऊसाचा रस आणि गोड पाण्याने भरलेले डोह आहेत. सुंदर उपवने आहेत. इथेच देव, अप्सरांबरोबर राहतात आणि गंधर्व देवस्तुतीगान करतात.

ब्रह्मा, आम्रवृक्षाचे आंबे तर पर्वतशिखराएवढे मोठे. आंबे जमिनीवर पडून फुटून त्यांच्या लाललाल रसाची एक नदी वाहते. आंब्याच्या रसाची नदी. तसेच हत्तीएवढी बिनबियांची जांभळे पडून फुटून त्यांचा रस जंबू नदीतून वाहतो. हा रस जेंव्हा तीरावरील मातीत मिसळतो आणि जेव्हा ती माती वाळते तेव्हा जांबूनद नावाचे सोने तयार होते. देव, अप्सरा, गंधर्व याच सोन्याच्या दागिन्यांनी मढलेले असतात. नारायण नारायण!

ब्रह्मा, तसेच कदंबवृक्षाच्या ढोलीतून मधाच्या धारा निघतात व मधाची नदी वाहते. वटवृक्षाच्या पारंब्यातून अनेक नद नद्या निघतात. ते सर्व नद नद्या इच्छा असेल ते प्रदान करतात. दूध, दही, मध, तूप, घरदार, गादी, घोडा, दागिने, जी वाटेल ती उपभोगाची वस्तू. ह्या कल्पवृक्षाने दिलेले उपभोग भोगणाऱ्यांना वृद्धत्व येत नाही. त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, दात पडणे, मोतिबिंदु होणे, घाम येणे, सर्दी खोकला, रोग, म्हातारपण, मृत्यु काही काही नाही. चिरतारुण्य!

ब्र: नारदा, वाचा बंद होते रे हे ऐकतांना. आपण कधी तेथे जायचे ते सांग. वरातगंगा घेऊन नाही तरी दोघे तरी जाऊ.

ना: तुला मला कोण थांबवेल? तुझीच ही सारी निर्मिती. आणि मी निर्मात्याची निर्मिती. जाऊ कधी. पण आत्ता तुझी एक चाचणी परीक्षा. त्यात पास झाला तरच पुढची गोष्ट.

ब्र: नारदा, ही तुझी शाळा. घे तिमाही परीक्षा. पास कर रे देवा!

ना: सप्तसमुद्र आणि सप्तद्वीपांचे वर्णन आपण पाहिले. मला सांग, सगळ्यात बाहेरच्या द्वीपाचा, म्हणजे पुष्करद्वीपाचा, म्हणजे ज्या द्वीपावर तुझे कमलासन आहे, ब्रह्मकमळ आहे त्या द्वीपाचा विस्तार किती?

ब्र: नारदा, प्रत्येक द्वीपाएवढाच त्याला घेरणाऱ्या समुद्राचा विस्तार असे तू सांगितलेस. तसेच आतल्या द्वीपापेक्षा त्याच्या नंतरचे द्वीप दुप्पट हे सांगितलेस. सर्वात आतले दीप, जंबुद्वीप १ लक्ष योजने सांगितले. तसे असेल तर माझे द्वीप, पुष्करद्वीप ६४ लक्ष योजने विस्ताराचे असले पाहिजे. म्हणजे त्याला घेरणारा शुद्धोदकाचा समुद्रही तेवढाच मोठा.

ना: बरोबर ब्रह्मा. गणितब्रह्मा! जंबुद्वीपापासून सातव्या समुद्रापर्यंत जो भाग आहे, तेवढीच जमीन त्याच्या बाहेरही आहे. आणि त्याच्या भोवताल मग साडेबारा कोटी योजने विस्तार असलेला लोकालोक पर्वत आहे. ती विश्वाची सीमा. पलिकडे काही नाही. ब्रह्मा, पूर्ण हिशोब करून विश्वाचा विस्तार ५० कोटी योजने आहे असेही पुराणात सांगितले आहे.

ब्र: अबब! खरे म्हणजे अबबबबबबबबबबबबबबबबबबबबब.......

पण नारदा, अजून तुझी गोष्ट सूर्यापर्यंत पोहोचलीच नाही. तुला आठवते तरी का रे की आजची गोष्ट सूर्य आणि चंद्राची होती? मूळ गोष्टीला हात घालावा मुनिवर. गोष्टीत सूर्योदय होऊ द्यावा.

ना: ब्रह्मा, कापुसकोंड्याच्या गोष्टीचे असेच असते. कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल ते सांगता येत नाही. बघ काकाकाकूंचे काम आटोपले. जेवून, सिरियल पाहून, दुधाला विरजण लावून ते केंव्हाच झोपी पण गेले. केव्हा आपल्या खोलीत जाऊ असे झाले आहे. आणि ब्रह्मा, इतक्या मध्यरात्री सूर्य कसा उगवेल रे? कोंबडीला कुकूच्चकू तर करू दे. जगरहाटी पाळावी माणसाने.

ब्र: नारदा, तो मेरू पर्वत उलटा असला तरी त्याला तळ आहे, शिखर आहे. बूड आहे, शेंडा आहे. तुझी आजची गोष्ट मात्र अगदीच 'शेंडा ना बूड'. नारायण नारायण!

_____________________


अनुक्रमणिकेकडे

No comments:

Post a Comment