गोष्ट पाचवी
रोज सकाळी दोनतीनदा स्नूझ दाबून शेवटी नाईलाजाने उठणाऱ्या काकू आज न जाणे कां, पण गजर व्हायच्या एक तास आधीच उठल्या. उठून आधी काँप्यूटरच्या खोलीत आल्या. माऊस मागेपुढे होताना पाहून, त्याची डावी बटन मधूनमधून दबतांना पाहून, स्क्रीनवर वेगवेगळ्या विंडोमध्ये काही ना काही उघडतांना पाहून, विंडोज मॅक्झिमाईज मिनिमाईज होतांना पाहून त्यांचा स्वतःचाच स्वतःवर विश्वास बसेना. सर्व खर्च वाया गेला की काय असे त्यांना वाटले. पुन्हा भानामती, पुन्हा लंकापती आला तर नाही असा विचार येऊन त्या धावत धावत काकूपतीला, म्हणजे काकांना, उठवायला गेल्या. सकाळच्या शाळेसाठी मुलांना आया जसे झोपेतच उभे करून तोंडात पेस्ट लावलेला ब्रश कोंबतात तसेच काहीसे करून त्या अर्धवट झोपेत काकांना काँप्यूटरच्या खोलीत घेऊन आल्या. अहो, काँप्यूटर वर कोणी अदृश्य भूत आहे असे पुटपुटत खोलीत येतात तो काय! काँप्यूटर अगदी शांत, रोज पहाटे असतो तसा.
काकाः इथे तर कोणीच नाही. कोणाची चाहूल पण नाही. कुठे आहे भूत?
काकूः अहो, मीही भूताला नाही पाहिलं. पण आत्ता मिनिटापूर्वी माऊस चालत होता, माऊस की खालीवर होत होती की, स्क्रीनवर काही येत जात होते की. नक्कीच कोणीतरी समोर बसून ते करत होते की. आता तसे काही नाही. पण नक्की होते तुम्ही यायच्या आधी.
काका: मग काय भूत मला घाबरले की काय? काय हे! तुला भास झाला असेल. झोप पूर्ण उघडली नसेल. आता त्या भानामतीला काढ मनातून.
काकू: नाही हो. मी पूर्ण जागी आहे. काँप्यूटर खरेच सुरू होता. बहुधा खुर्चीवर भूत होते.
काकाः असू दे. असला तरी व्हायरस असेल. स्कॅन करू. काढून टाकू. त्यासाठी का पुन्हा यज्ञ करायचा? तुझं पण खूळ, अंधविश्वास फारच वाढतो आहे बरं. भूत वगैरे वर्तमानकाळात कशाला येईल. माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
काकूः बरं, जाऊ दे. उद्या पुन्हा मी लवकर उठून पाहीन. पण मी झोपेत वगैरे नव्हती हे मात्र खरे. आणि काँप्यूटरवर कोणीतरी होते हेही तितकेच खरे.
काका: जाऊ दे. सकाळी सकाळी भांडण नको. नवराबायकोचं कधीतरी पटतं का? त्यांच्या भांडणातून काही निष्पन्न होतं का?
काकू: हं. आपलं पहिलं वहिलं भांडण झालं तेव्हा अचानक बाबा आले होते. आपण लगेच भांडण बंद करून 'all is well' च नाटक केलं तरी त्यांनी सत्य हेरलं होतं व म्हणाले होते:
अजायुद्धमृषिश्राद्धं प्रभाते मेघडम्बरम् ।
दम्पत्योः कलहश्चैव परिणामे न किञ्चन ॥
आपण दोघेही ओशाळं हसलो होतो. पण आपल्याला काहीही कळलं नाही हे हेरून बाबांनी मग आपल्याला मराठीत अर्थ पण सांगितला होता. एडक्यांच भांडण, ऋषींच श्राद्ध, सकाळी ढगांच गडगडणं व पतीपत्नींचे भांडण यातून काहीही निष्पन्न होत नाही.
तेंव्हापासून भांडायला लागलं की मला ते सुभाषित आठवतं व माझी खुमखुमीच जिरून जाते. You are lucky? नाही का?
काका: हो ना. बाबांची संस्कृत सुभाषितं म्हणजे गाढवापुढे वाचली गीता. तुला काहीतरी कळत असेल. आपल्याला तर ते आपलं कौतुक करतात की थट्टा चेष्टा करतात ते कधी पण कळलं नाही. असो. भाषा हा आपला प्रांतच नव्हे. संस्कृत तर नाहीच नाही. चला आता. चहा करा व लागा कामाला.
ना: ब्रह्मा, आज इतक्या पहाटे पहाटे माझ्या उशाशी? काँप्यूटर क्रॅश झाला की काय? की टेबलवर आज अळी बळी काढून आला?
ब्र: नारदा, आज पुन्हा गडबड झाली रे. खूप सर्च केल्यावर मला ते हरिपुत्र पुराण सापडलं. तूच मला वाचायला सांगितलं होतस. मूळ संस्कृत ग्रंथ तर नाही सापडला. पण बहुधा त्याचाच इंग्रजी अनुवाद 'Harry Potter' सापडला. ते पुराण सहा खंडात आहे. पहिल्या खंडात मी अगदी रमून गेलो असतांना काकू केव्हा खोलीत आल्या ते कळलेच नाही. काँप्यूटरवर कोणीतरी आहे हे त्यांना कळले. पण आपण अदृश्यरूप असल्यामुळे मी वाचलो. त्या घाबरून काकांना उठवायला गेल्या अन् मी संधीचा फायदा घेऊन काँप्यूटर आॅफ करून तातडीने इकडे आलो. घाम फुटला रे बाबा गुलाबी थंडीत. बरे झाले ब्रह्मकमळाने माझी दृश्य स्वरूप धारण करण्याची इच्छा पूर्ण केली नाही ते.
ना: ब्रह्माजी! शांत व्हा. आपण कल्पनेतले का होईना पण देव आहोत. आपल्याला ह्या वैवस्वतपुत्रांसारखे घाबरून कसे चालेल. आपण निर्गुण निराकार. आपण स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांना सांगतो. त्यावर गीताध्याय लिहितो. आपल्याला सूर्यासारखे नको का असायला?
ब्र: सूर्यासारखे? तो कुठे स्थितप्रज्ञ? तो तर सतत भ्रमण करीत असतो. आग पाखडत असतो.
ना: तसे नाही रे. त्याची वृत्ती स्थितप्रज्ञ! मास्तर एकदा म्हणाले होते:
उदये सविता रक्तो रक्तश्चास्तमने तथा ।
सम्पत्तौ च विपत्तौ च साधुनामेकरूपता ॥
जसे, उदय असो वा अस्त, दोन्ही समयी सूर्य रक्तवर्णच असतो, तसेच वेळ चांगली वा वाईट असो, साधुवृत्तीच्या लोकांचा भाव तोच असतो. ब्रह्मा, आपण तर देव. एवढ्या साध्या गोष्टीनी विचलित होऊन कसे चालेल?
ब्र: नारदा, मला आपली चिंता नाही रे. पण ही पोरे पुन्हा घाबरतील व यज्ञ वगैरे करतील अशी भीती वाटते.
ना: ब्रह्मा, तसे काही होईल असे वाटत नाही. बघ ते दोघे खोलीतून बाहेर पण आले आणि शांत पण झाले. काकूंच्या मनात शंकेनी व चिंतेनी घर केले असेल. चिंता मनुपुत्रांना कायमचीच असते. त्यावरही मास्तरांनी एकदा उन्हाळ्यात एक सुंदर संस्कृत श्लोक ऐकवला होता. तुला सांगतो ब्रह्मा, ही संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे आणि या भाषेत इतकं काही लिखाण झालं आहे की विचारू नको. देवभाषा म्हणतात खरे, पण ती भाषाच नाही, मानवांची संस्कृती आहे. देवांवर, मुख्यत्वेकरून तू, शिव व विष्णु ह्या त्रिमुर्तीवर, खूपच काही लिहिण्यात आले आहे. आता ती भाषा फारशी वापरात नाही. तिचा फक्त अभिमान उरला आहे. पण ती आहे मात्र साहित्याचा खजिना.
ब्र: अरे पण तो चिंतेवरचा श्लोक सांग नं.
ना: ऐका तर.
चिता चिन्ता समाप्रोक्ता बिन्दुमात्रं विशेषता ।
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ॥
ब्रह्माजी, चिता आणि चिंता यात फक्त अनुस्वाराचाच काय तो फरक. चिंता माणसाला जिवंतपणी जाळते, चिता मृत्यूनंतर.
ब्रह्माजी, तसे पाहिले तर ह्या श्लोकात भाषेत प्रत्येक गोष्टीला कसे महत्त्व आहे व साध्या अनुस्वारानेही कसा अर्थ बदलून जातो हे ही अंडरलाईन केले गेले आहे. जंतुकवीचीही अशीच एक कविता आहे ज्यात ङ ञ ण ळ ह्या वांझ मुळाक्षरांचे महत्त्व दर्शविले आहे.
ब्र: हं. वाचीन. पण लिंक जरा सांगशील तर बरे. त्या रावणप्रतापात ते सर्व विसरल्या गेले.
ना: घे तर.
ब्र: पण नारदा, आता मला रात्री काँप्यूटरवर बसणे धोक्याचे वाटते. काकूंना दाट संशय आला असावा. त्या नक्कीच अपरात्री उठून चेक करतील. भूत भूत ओरडतील. ते मला आवडणार नाही. मी काही भूत नाही.
ना: ब्रह्मा, तू केवळ भूतच नाही, तर भूत, वर्तमान, भविष्य सारे काही आहे. खरे म्हणजे तुझ्याइतके 'भूत' कोणीच नाही. First to arrive तूच आहेस. १५६०००००००००००० वर्षांपूर्वी तू आलास. मीही तसा जुनाच. एखादे शून्य कमी. काकू फक्त ६० वर्षांच्या.
ब्र: नारदा, नको आठवण देऊस मला माझ्या वयाची. एकदम ते डिप्रेशन का काय ते येतं बघ. सगळे पृथ्वीवरचे रोग मला त्रस्त करतील असे वाटते. आज तर मी खरेच डिप्रेशनमधे आहे. एकच विरंगुळा होता रात्री काँप्यूटरवर बसून पुराणे वाचायचा. मग दिवसभर मनन करायचा. संध्याकाळी एखादी तुझी कापुसकोंड्याची गोष्ट. दिवस कसा छान जायचा. आता पुन्हा रात्री काँप्यूटरवर जायची भिती वाटते. आता रात्रभर करायचे काय? तू झोपलेला असतो. बरे, कंटाळा यायला नको. जांभया येण्याचा धोका. जांभई दिली की काळ पुढे निघून जातो. अक्षरश: तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे बाबा ही पृथ्वी तुझी.
ना: देवा, थोडा टाईमटेबल बदलू. दिवसा काकाकाकू नसतात. तेव्हा वाचत जा. ते यायच्या आधी काँप्यूटर बंद करत जाऊ. रात्री मग मनन, चर्चा, कापुसकोंड्या वगैरे. प्रत्येक समस्येला समाधान पण असतं देवा. काका काकू बघ सतत कसे संकटाला सामोरे जातात, तडजोड करतात. असे डिप्रेशनमधे नाही जात खुट्ट झाले की.
बरे, सोड आता. वाटल्यास कापुसकोंड्याची गोष्ट सांगतो. त्या गोष्टीत मी पण आहे. सांगू का?
ब्र: सांग बाबा, पण ते रामायण महाभारत नको. त्यात खूप गुंतागुंत आहे. एकदम लहान मुलांची असते तशी गोष्ट सांग. काकू नातवाला मांडीवर बसवून सांगतात तश्शी.
ना: मांडीवर बसणाऱ्या पोराचीच गोष्ट आहे ब्रह्मा. मांडीवर बसणाऱ्या पोरांनाच खूप आवडते. खूप म्हणजे खूप्पच आवडते. आणि अगदी सत्यकथा बरे!
ब्र: सांग तर मग! हसू नकोस.
ना: ब्रह्मा, ही गोष्ट साधारणतः आई आपल्या बाळाला, आजी आपल्या नातवंडांना, कधीमधी बाप आपल्या मुलाला सांगतात. मुलाने बापाला सांगितल्याचे मी तरी ऐकलेले नाही. आज आपण नेमके ते करणार आहोत. त्यामुळे मला गोष्ट सोपी किंवा रसाळ करायची गरज नाही. 'मग काय झालं माहित आहे क्का?' वगैरेची गरज नाही. त्यामुळे गोष्ट थोडी तशी बोअरिंगच होईल असे वाटते. त्या स्वर्गातल्या आयुष्यासारखी. गोष्ट ऐकताना तुला जांभई येऊ शकते. तेवढी मात्र आवर. नाहीतर त्या म्हातारीच्या मोठ्या मुलीसारख्या जांभयावर जांभया देशील तर कल्पांतच यायचा.
ब्र: नारदा! मी जांभईवर बराचसा विजय प्राप्त केला आहे. पुतना, शूर्पणखा परवडतील, पण ही जांभई राक्षसीण फार वैताग आणते बघ. सुरू कर तू गोष्ट.
ना: ब्रह्मा, गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे. कलियुगातली नाही, द्वापारातली नाही, त्रेता पण नाही. गोष्ट सत्ययुगातली. विष्णूंच्या पहिल्या अवताराच्या, मत्स्यावताराच्या आसपास घडलेली ही सत्यकथा. सत्ययुगातल्या पहिल्या मनूच्या वेळेची. सध्या सातवा मनू वैवस्वताचा काल आहे हे तूच मला सांगितले. आठवतात तरी का रे तू निर्मितोस त्या चौदा मनूंची नावे? कमीत कमी पहिल्यातरी?
ब्र: झाली परीक्षा सुरू. अरे सरळ गोष्ट सांग. प्रश्न काय विचारतोस?
ना: ब्रह्मा, पहिला तू पाठवलेला मनू म्हणजे स्वयंभूव. बाकी तू बारशाला नावं मात्र मस्त ठेवतोस हं. एक माझं सोडलं तर. नारद म्हणे! हे काय नाव झालं?
ब्र: अरे नावात काय आहे. बाळ काय, बेबी काय! हं, पण ते अडोण्याचे की माोहरीरांचे हे मात्र महत्त्वाचे.
ना: असो. तर स्वयंभूवाला दोन मुलगे. उत्तानपाद आणि प्रियव्रत. स्वयंभूव जर तुझी निर्मिती, तर हे दोघे तुझे नातू लागतात. तिसरी पिढी. त्यातल्या उत्तानपादाची ही गोष्ट. तुझ्या लाडक्या नातवाची. काही आठवते का?
ब्र: नाही रे नारदा! म्हातारी नेहमी म्हणते, ब्रह्मदेव विसराळू, ते खरेच आहे. मला वाचन वाढवायला हवे. कमीतकमी आपली वंशावली तरी माहीत असावी माणसाला. काकू बघ कशा मानाने सांगतात आम्ही मोरयाचे वंशज म्हणून. मलाही आपले ज्ञान वाढवायला हवे. तुम्हाला काही माहीत असेल माझ्या वंशावळीबद्दल तर सांगा जगद्गुरु!
ना: ब्रह्मा, देवांची वंशावळी पुराणात आहे. तुझी तर आहेच आहे. ही जी गोष्ट मी तुला सांगतो आहे ती मी सुद्धा पुराणातच वाचली आहे. म्हणून तर मला कळले की ह्या गोष्टीत मी सुद्धा एक पात्र आहे. ब्रह्मा, भागवत पुराणासारखे लोकप्रिय पुराण नाही. त्यात मी वाचली. गोष्टीच्या सुरुवातीलाच मैत्रेय ऋुषी विदुराला तुझ्याबद्दल माहिती देतात. विषयांतर होईल म्हणून सांगत नाही.
ब्र: अरे असं नको करू. सांग. सांग.
ना: ब्रह्मा, तुझी मुले; जसे की मी, रिभु, हंस, अरुणी वा यति; सांसारिक नाही. आम्ही सारे ब्रह्मचारी असल्यामुळे ही फांदी इथेच संपते. पण तुझा आणखी एक पुत्र, अधर्म, व कन्या मृषा यांना, दंभ आणि माया अशी दोन अपत्ये. त्यांना पुढे लोभ आणि निकृता असे पुत्र-कन्या. त्यांच्यापासून पुढे पुन्हा क्रोध व हिंसा हे भाऊबहिण, व त्यांना पुढे कली व दुरुक्ती असे पुत्र व कन्या. कली व दुरुक्तीपासून पुढे भय आणि मृत्यु जन्म पावले. त्यांनी पुढे निरय (म्हणजे नरक) आणि यातना यांना जन्म दिला. अधर्मापासून यातना व नरकापर्यंतची ही वंशावली सांगूनच मग मैत्रेय ऋषी आजच्या, तितक्याच सत्य गोष्टीला हात घालतात.
ब्र: बरे, आता ही अधर्माची फांदी नको. मला तो माझा मुलगा होता हेही आठवत नाही. नंतर आलेले नातनातू-पणतपणतू वगैरे तर सोडच. आपण त्या दुसऱ्या फांदीवर जाऊ.
ना: इथेच तर गोम आहे ब्रह्मा. वरची वंशावली जरा वेगळ्या शब्दात सांगितली असती तर वेगळाच अर्थ तू घेतला असता. धर्मबाह्य किंवा अधर्मी कृत्याचे पर्यवसान पुढे दंभ व मायेत होते. त्यातूनच पुढे लोभ आणि निकृता व नंतर क्रोध, हिंसा, दुरुक्ती असे दुर्गुण जन्म घेतात. शेवटी यातना, मृत्यु व नरक ठेवलेला आहे. असे जर सांगितले तर ही वंशावली फक्त मानवांच्या पतनाची कारणमिमांसा वाटेल. तो एक फक्त इशारा वाटेल. पण त्याच अधःपतनाच्या पायऱ्यांना मुले मुली म्हटले आणि ही कथा आहे म्हटले की आपण ती कथा आहे, पुराणातली कथा आहे, तीही संस्कृतमधे आहे, म्हणून सत्यकथा आहे म्हटले तर गोष्टच संपली. ही तुझी वंशावली खरेच तुझी वंशावली आहे म्हणून काही जन तुझ्या वंशात किती अनाचार, कदाचार, दुराचार, व्यभिचार माजला होता त्याकडे अंगुलीनिर्देश करतात. तर काही त्याचा शब्दशः अर्थ घेऊन त्या नावाच्या व्यक्ती खरोखरीच होत्या असे समजतात. दोन्ही प्रकारचे लोक तुला 'अज्ञान' नावाचा पुत्र व 'अबुद्धी' नावाची कन्या होती त्यांचेच वंशज दिसतात.
ब्र: आता ही कोणची माझी नवीन वंशशाखा?
ना: कुठल्याही पुराणात या फांदीचा उल्लेख नाही ब्रह्मा. पण एकंदरीत आज लोकांचा भोळेभाबडेपणा पाहिला की ही दोघेही तुझीच मुले असावीत व त्यांचा वंशविस्तार पिढी दर पिढी होत आजचा समाज बनला असावा असे वाटते. तसे नसते तर पुराणातली वरच्यासारखी कथा ही केवळ महारूपकात्मक आहे, काल्पनिक आहे, दीर्घोत्प्रेक्षा आहे हे कोणालाही कळेल. तसेच बाकीच्या कथांचेही. त्यात उपदेश आहे. चिंतन आहे. ते सर्व दुर्लक्षिल्या गेल्यामुळे त्या कथांची मजाच गेली ब्रह्मा. कथाकारांना पण त्याची झळ पोहोचली व त्यांच्या कल्पनाविलासाचे व साहित्य निर्मितीचे हवे तेवढे प्रांजळ कौतुक झाले नाही. मला याची फार हळहळ वाटते.
ब्र: नारदा, आपण आजच्या कथेकडे वळायचे का? तुझी कथा म्हणजे 'एक ना धड, भाराभर चिंध्या' अशी गत होत आहे बघ. कथेवर लक्ष केंद्रित कर पाहू.
ना: ब्रह्मा, मी ही कथा जशी भागवत पुराणात आहे तशी सांगतो आहे. संस्कृत श्लोकांच्या रूपात भागवत पुराण आहे. श्लोक म्हणजे कविताच. तीही प्राचीन काळची, म्हणजे वृत्तबद्ध. कवितेचा अर्थ शब्दशः घेतला तर त्या जंतुकवीला पण अपमानित झाल्यासारखे वाटते. पुराणे तर महाज्ञानी, महापंडित, महाकवींनी लिहिली आहेत. त्यांच्या काव्याचा नुसता संधिविग्रह करून शब्दार्थच घेतला तर त्यांचा घोर अपमानच होईल.
जंतुकवीनी आपल्या गद्य नामक कवितेत वृत्तबद्ध शिस्तबद्ध छंदबद्ध पद्याचे हळूहळू पतन होत होत आता आधुनिक कविता पद्य नसून मुक्तछंद पद्य व अत्याधुनिक कविता तर गद्य झाली म्हणून उसासा सोडला आहे. पण जंतुकवीची ती कविता फक्त एका वंशाची वंशावली आहे असे कोणी म्हणेल तर डोक्यावर दगड किंवा दगडावर डोके मारणे असे दोनच पर्याय त्याला उरतील.
पद्याला मुलगी झाली
नाव ठेवले कविता
कविताला मुलगी झाली
नाव ठेवले छंदा
छंदाला मुलगी झाली
नाव ठेवले वृत्ता
वृत्ताला मुलगी झाली
नाव ठेवले मुक्ता
मुक्ताला नुकताच मुलगा झाला
ब्र: नारदा, आले माझ्या लक्षात. मीही तुझी भागवतकथा रसाळ कथा म्हणून न ऐकता थोडा खोलात शिरीन. थोडं डोकं वापरीन. पण तू सांग तर आधी. गाडी येऊ दे मूळपदावर. उत्तानपादावर.
ना: ब्रह्मा, उत्तानपाद राजा तसा चांगला राजा होता. राजधर्माचे पालन करणारा. प्रजेचा लाडका. त्याला दोन राण्या. एक आवडती, एक नावडती. असे सर्वच गोष्टीत असते. दोघींमध्ये मोठी सुनीती. पण ती नावडती झाली होती. दुसरी सुरुची. ती आवडती राणी. सुनीती पण सुरुची येईपर्यंत राजाला आवडत असावी. पण सुरुची आली व ती जास्त रूपवान असल्यामुळे सहज आवडती झाली. सुनीती नावडती झाली. नशीबच! नाही का?
ब्र: नारदा, मला काय विचारतोस? पण असेल नियतीची तशी इच्छा.
ना: सुनीतीला एक मुलगा, धृव. पट्टराणीसाहेबा सुरुचीलाही एकच, उत्तम. म्हणजे एकच मुलगा आहे हे उत्तम म्हणतो असे नाही, मुलाचे नावच उत्तम.
ब्र: उत्तम!
ना: वयाने पाहिले तर धृव मोठा, उत्तम लहान. नियमाप्रमाणे, त्या काळच्या रीतीप्रमाणे, उत्तानपादानंतर धृवाचा राजसिंहासनावर हक्क. तो राजा झाला असता. पण पट्टराणी सुरुचीच्या मुठीत राजा असल्यामुळे व स्वतःच्या मुलावर तिच्या मातृसुलभ प्रेमाने राजसिंहासनावर तिचा मुलगा बसावा असे तिला वाटत असल्यामुळे धृवाचा ती नेहमीच खार खायची.
ब्र: म्हणजे? तिला तो आवडायचा की नावडायचा? नाही, लोणच्याचा खार खूप चविष्ट असतो आणि सर्वांनाच आवडतो म्हणून विचारले.
ना: ब्रह्मा, खार खाणे म्हणजे पाण्यात पाहणे. दुश्वास करणे.
ब्र: सरळ सरळ सांग. तिला धृव आवडायचा की नाही?
ना: नावडायचा. ती त्याचा द्वेष करायची. एके दिवशी उत्तानपाद राजा उत्तमला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसला होता. सुरुचीही बाजूलाच होती. तेवढ्यात धृवही तेथे आला. त्यालाही बाबांच्या मांडीवर बसावे वाटले. साहजिक आहे. सुनीती नावडती असली तरी तो राजाचा नावडता नव्हता. सुरुची त्याची सावत्र आई असली तरी उत्तानपाद त्याचा सख्खा पिता होता. शिवाय कुठेतरी त्याला त्याच्या अधिकाराचीही जाणीव होती. त्याला माहीत होते की सिंहासनावर बाबांनतर आपला हक्क आहे. तसा तो जेमतेम सहा वर्षांचा होता. आजच्या काळात पहिलीत जाईल एवढा. पण तो राजपुत्र होता. उत्तम त्याहीपेक्षा लहान.
धृवबाळ राजाच्या मांडीवर बसणारच होते की सुरुचीने त्याला बळेच खाली खेचले. त्या बळजबरीने बाळ जबर घाबरले. त्यातून सावरते न सावरते तेवढ्यात सुरुचीराणींचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. 'बाबांच्या मांडीवर बसायचा तुझा हक्क नाही. सिंहासनावर तर दूरच राहिले. तिथे बसायचेच असेल तर नारायणाची आराधना कर, त्याला प्रसन्न कर आणि माझ्या उदरी जन्माला ये.'.
ब्र: नारदा, तो माझा पणतू रे. सुरुची माझी नातसून. काय हे! मला कळले असते तर काही तिचे खरे नव्हते. आणि माझा तो नातू, तो उत्तानपाद? तो काय करीत होता?
ना: ब्रह्मा, राजा उत्तानपाद माझा पुतण्या रे. सत्ययुगातला धृतराष्ट्र. फक्त पुत्रासाठी नाही तर पत्नीसाठी प्रेमांध! माझा त्यावेळी बहुधा पृथ्वीचा टूर नसावा. नाहीतर मी असे होऊ दिले नसते. असो. पण खरेच, तो राजा एक शब्द बोलला नाही. कदाचित हाच त्याचा पतिधर्म असेल. पण पिताधर्माला तो चुकला. असो.
६-७ वर्षांचा धृव रडत रडत आपल्या आईकडे गेला. तिला सर्व वृत्तांत सांगितला. ती तरी काय करेल बिचारी. ती स्वतःच तिरस्कार सहन करीत होती. तिने बाळाला समजवायचा लटका प्रयत्न केला. आपली असहायताही व्यक्त केली. सहज म्हणाली की फक्त नारायणच त्याची मदत करू शकेल. तोच सत्य, न्याय, योग्यायोग्यतेचा खरा भोक्ता व प्रतिपालक. तोच सर्व काही.
ब्र: नारदा, दोन्ही राण्यांमधे मला एक साम्य जाणवते. दोघींचाही नारायणावर, विष्णूवर, देवावर विश्वास दिसतो.
ना: ते खरेच ब्रह्मा. राणीने दाखविलेला तिरस्कार व बाबांनी दर्शविलेली हताशा धृवाच्या बालमनावर खोल आघात करती झाली. हा अन्याय, हा अपमान त्याला सहन न होऊन नारायणाची आराधना करून, कठोर तपस्येने त्याला प्रसन्न करायचा त्याने निर्णय घेतला. कोणाचेही काहीही न ऐकता तो वनाकडे चालता झाला.
ब्र: नारदा तू म्हणालास गोष्टीत तू पण एक पात्र आहेस. अजून दिसला नाहीस. नाटकात पडदे ओढण्याचेच काम मिळाले होते की काय?
ना: ब्रह्मा, आताच माझी एंट्री बघ. धृवबाळ वनात तपाला जात असता मी त्याला गाठले. त्याचा जो अपमान झाला व त्याच्यावर जो अन्याय झाला तो झालाच, पण आता माझे काम त्याची समजूत काढून त्याला बालवयात कठोर तप वगैरे करण्यापासून प्रवृत्त करणे होते. तसे मला जमेल याची मला गर्वभरित खात्री पण होती. मोठमोठ्यांना शब्दपेचात अडकवणारा म्हणून माझी त्रिलोकी कीर्ती काही उगाच का होती? हा तर सहा वर्षांचा कोवळा नातू. नारायण नारायण!
वनात जातांना मी त्याला आडवा गेलो. त्याच्या बालमनातला राग काढून टाकणे माझे कर्तव्य आहे असे माझे मन मला सांगत होते. मी त्याला म्हणालो की मनुष्याचे थोरपण तो राजा होता म्हणून नाही तर त्याने कार्य काय केले यावर अवलंबून आहे. कर्तृत्त्ववान मनुष्याला यशाच्या अनेकानेक वाटा आहेत. बाबांची मांडीच हवी हा हट्ट हक्काच्या जाणीवेतून अाला असावा. पण देवकृपा व मोक्षप्राप्ती पद बघत नाहीत. ते जन्मभर धर्माला धरून केलेल्या आचरणाचाच निकष लावतात. पद, अधिकार, मान, मरातब हे सर्व तितके महत्त्वाचे नाहीत जितकी ज्ञानप्राप्ती करणे व तत्कालीन ज्ञानात भर टाकणे आहे. त्या बालकाने ते सर्व ऐकले खरे, पण तो त्याच्या निर्णयापासून तसूभरही हलला नाही.
धृवबाळ मला म्हणाला, हे देवर्षी, तुम्ही त्रिलोक संचारी आहात. महाज्ञानी आहात. तुमचे दृष्टिक्षेत्र फार व्यापक आहे. भगवान श्रीकृष्णही स्वतःचे अनन्य स्थान समजवितांना 'देवर्षींमध्ये जसे नारदमुनी, तसा सर्व देवगणात मी' असे म्हणतात. तुम्ही जे म्हणता ते माझ्या एका मनाला पुरेपूर पटतेही आहे. पण माझे दुसरे मन, माझे राजपुत्राचे मन, मला ही अवहेलना सहन न करण्यास बाध्य करते. माझे आचरण बहुधा माझे हे दुसरे मनच ठरविते. पहिले मन इशारा नेहमीच देते, योग्य काय तेच सांगते, पण दुसऱ्या मनाचा कल ऐहिक गोष्टींकडेच असतो. माझा तपस्येचा निर्णय बदलणे अशक्य आहे. तो व्यर्थ अभिमानजन्य आहे हे मला कळत असूनही.
ब्र: नारदा, खरेच का रे त्या लहानग्याचे हे कथन? हे सखोल विश्लेषण व तुझी केलेली स्तुती मोठ्यांसारखी वाटते.
ना: मी जे सांगतो ते पुराणनिष्ठ आहे. असेच झाले की नाही मी नाही सांगू शकत. मला आठवतही नाही. अरे सत्ययुगाच्या सुरुवातीची गोष्ट. म्हणजे लाखो वर्षांपूर्वीची. विस्मरण होते माणसाला.
ब्र: बरे. पुढे सर.
ना: खरे म्हणजे धृवबाळाला तपःसाधनेपासून प्रवृत्त करणे माझे कार्य होते. ते सिद्धीस नेलेच पाहिजे असे माझे मन मला सांगत होते. पण बाळाने माझ्या केलेल्या स्तुतीने मी जरा पाघळलोच. त्याला पुढे म्हणालो 'बाळा, नारायणाला, विष्णूला प्रसन्न करणे वाटते एवढे सोपे नाही. तपस्या करण्याचे तुझे वय नाही. एकदा पुनर्विचार कर'.
पण कसचे काय, अन् कसचे काय. तो मानत नाही हे पाहून मग मीही त्याला तप कुठे व कसे करावे म्हणजे विष्णुभगवान प्रसन्न होऊन प्रकट होतील ते सांगितले.
ब्र: म्हणजे नारदा, तुलाही दोन मने आहेतच की. एक सद्सद्विवेकी मन तुला सांगते की प्रवृत्त कर बाळाला तपस्येचा हट्ट सोडायला, आणि दुसरे मन प्रशंसेला भाळून त्याला तपस्येचे दिव्य ज्ञान देऊ पाहते.
ना: ब्रह्मा, ते खरे असावे. या देहरूपी वृक्षावर ही दोन मने, हे दोन पक्षी नित्य वास करतात असे वाटते. एक सत्यमार्ग दाखविते, आणि दुसरे प्रलोभनांना बळी जात स्वैराचाराला संमती देते. हेच ते झाडावरचे दोन पक्षी ब्रह्मा. 'Two birds in Vedas and Upnishadas' म्हणजे वेदोपनिषदातील दोन पक्षी अशी शोधमाला देऊन गूगल करशील तर खूप संदर्भ मिळतील. खूप म्हणजे खूपच! ह्या दोन पक्षांवर अफाट संशोधन व लिखाण आहे. वाच कधी. लिंक देत नाही. तुलाही सर्च करणे यायला हवे. नाहीतर आपल्याला आपण कोण कसे कळणार? तुलाही ब्रह्म आणि परब्रह्म, आत्मा आणि परमात्मा, यातील फरक कसा कळणार. खरेच, वाचन कर दोन पक्षांवर.
ब्र: करीन बापडा. ब्रह्म आणि परब्रह्म! पण तू चल पुढे. कथेची परकथा नकोस करू.
ना: ब्रह्मा, मी बाळाला तपस्येची योग्य रीत सांगितली. तपस्या तेथेच करणे योग्य जेथे ज्याला प्रसन्न करायचे आहे त्याचा वास असतो. काकूंना प्रसन्न करून पुरणपोळी मागायची असेल तर आपल्याला येथेच काहीतरी करावे लागेल. न्यूयाॅर्कला जाऊन धरणे धरण्यात काय अर्थ? कालिंदीच्या काठावर मधुवनात विष्णूंचा वास असतो हे मला माहीत होते. तेच स्थळ मी त्याला सुचविले. कालिंदी म्हणजे यमुना नदी बरे. विष्णूंची आवडती.
ब्र: नारदा! पण ती तर कृष्णाची आवडती जागा. तिथे तर राधा नृत्य करायची, कृष्णाचा शोध घ््यायची. ही धृवाची गोष्ट तर सत्ययुगातली गोष्ट. विष्णूंचा जेमतेम पहिला अवतार, मत्स्यावतार शक्य. तूच म्हणाला. सत्ययुग संपून, त्रेतायुग जाऊन, द्वापारयुगात यायला तर लाखो वर्ष जातील. मग ह्या गोष्टीत मधुवन, कालिंदी यांचा कसा उल्लेख? पुराणकारांची काही चूक तर नाही ना यात?
ना: ब्रह्मा! छान. प्रश्न विचारयोग्य आहे. पण उत्तर मलाही नाही रे माहीत. विष्णूंनी कदाचित आधीच कृष्णावताराचा आराखडा तयार करून ठेवला असेल. आग लागल्यावर का कोणी विहीर खणतं? आग लागणारच, धर्माला ग्लानी येणारच, आणि धर्माभ्युत्थानाकरिता आठवाही अवतार पुढे घ््यावा लागणारच म्हणून त्याची कथा लिहून तयारही असेल धृवकाळी. व्यासांनी नाही का आधी महाभारत लिहिले, व मग ते घडले? देवा, देवांच सगळच वेगळं रे!
ब्र: हं.
ना: ब्रह्मा, मी धृवाला सगळी तपाची सिस्टीम समजावून सांगितली. तपाची जागा कशी तयार करावी ते सांगितले. तीनदा कालिंदीत आंघोळ करूनच कसे तपाला बसावे ते सांगितले. सहा महिन्यांच्या तपकाळात मनात विष्णूच्या रूपाशिवाय दुसरा विचार नको. पण बाळाने तर विष्णूला पाहिले नाही. तो दिसावा म्हणून तर तो तपप्रवृत्त झाला. विष्णू ज्या रूपात प्रकट होणार तेच रूप तपस्व्याच्या मनात तप करतांना असणे आवश्यक अाहे. हे शक्य नसल्यामुळे बरेचदा तपसिद्धी होत नाही. कोंबडीशिवाय अंड नाही, अंड्याशिवाय कोंबडी नाही. अशी स्थिती. नशीबाने मी निर्गुण निराकार विष्णूला बरेचदा पाहिले असल्यामुळे त्याचे सगुण रूप मला चांगलेच माहीत होते. ते मी साद्यंत धृवबाळाला वर्णन केले. मुखकमल, चरणकमल, नयनकमल, नाभीकमल सारे सारे. हे रूप मनात कल्पून सहा महिने जप करायचा. जपाचा अत्यंत काॅन्फिडेंशियल द्वादशाक्षरी मंत्र मी त्याला कोणी ऐकू नये म्हणून त्याच्या कानात सांगितला. तप करतांना तो मोठ्याने म्हणायचा हे ही सांगितले. गायत्री मंत्र जसा बाप मुंजीच्या वेळी बटूच्या कानात सांगतो आणि मग तो जन्मभर त्रिसंध्येत त्याचा मोठ्याने उच्चार करतो तसेच काहीसे.
ब्र: नारदा, पण मग तप सुरू असतांना कोणी ऐकतीलच की रे. हे उघडे गुपितच की. मला उत्सुकता आहे तो मंत्र जाणून घ््यायची. सांगतोस का?
ना: कानात सांगतो. कर इकडे कान.
ब्र: घे तर, केला.
ना: उजवा नाही रे. डावा कान. डावा कान ह्रदयाच्या जवळ असतो म्हणून गुपित नेहमी डाव्या कानात सांगावे म्हणतात. हं, असा! ऐक तर.
ब्र: अरे लबाडा. हा मंत्र तर काका काकू रोज पूजेत म्हणतात. दहावीसदा म्हणतात. ॐ नमो भगवते वासुदेवाय. पण मला पुन्हा तोच प्रश्न नारदा. सत्ययुगातल्या तपस्येत लाखो वर्षे नंतर येणाऱ्या द्वापारयुगातल्या वासुदेवाला, म्हणजे वसुदेवसुत कृष्णाला नमन कसे? माझ्यासारखाच तूही त्रिकालदर्शी होतास आणि आहेस की काय?
ना: ब्रह्माजी, तसे असते तर मी ही गोष्ट तुला सांगायला घेतलीच नसती. मला तू कठिण प्रश्न विचारणार हे आधीच दिसले असते. मी चिऊ काऊची गोष्ट सांगितली असती. ती बालवेदातली गोष्ट आहे असे म्हणतात.
ब्र: बर. हो पुढ.
ना: पण ब्रह्मा, मला खरेच आवडायला लागले तू प्रश्न विचारतोस हे. अरे ह्या साध्या, केवळ कथानक असणाऱ्या गोष्टी नाहीत. 'पण मग पुढे काय' असा रेटा ह्या गोष्टींना नसतो. ह्या कापूसकोंड्याच्या गोष्टी आहेत. कापूस आणि कोंडा ऐकणाऱ्यानी वेगळा करायला हवा. शुभ्र मुलायम कापूस तेवढा स्वीकार करायला हवा आणि कथानकाचा कोंडा त्याज्य म्हणून टाकून द्यायला हवा. मऊ मुलायम कापसाची उशी डोक्याशी ठेवून त्यातला गर्भितार्थ, मतितार्थ, बोध डोक्यात साठवायला हवा. म्हणून तर कापूस भरलेली उशी आणि मेंदू भरलेल्या डोक्याचे इतके जवळचे नाते. मगच तर ही गोष्ट कापूसकोंड्याची गोष्ट म्हणून पात्रता पावेल.
ब्र: वा नारदा वा! पण थोड कथानक पण पुढे जाऊ दे.
ना: ब्रह्माजी, नंतर मग मी धृवाला तपस्याकालात घ््यायच्या आहाराचा पण पूर्ण कार्यक्रम आखून दिला. पायरी पायरीने जीना चढायचा असतो. यशशिखराला लिफ्ट नसते हे त्याला समजावून सांगितले. पहिल्या महिन्यात फक्त दर तीन रात्रींनंतर फळेबोरे खायची. शरीररक्षणाकरिता. दुसऱ्या महिन्यात आहार कमी करून दर सहा रात्रींनंतर बोरेफळे खायची. तिसऱ्या महिन्याच फक्त पाणी. असे करत करत सहाव्या महिन्यात फक्त हवेवर निर्वाह करायचा. असे करण्याची शक्ती व निर्धार, मनात साठवलेले कमलबाहुल्यित विष्णुरूप, मंत्रशक्ती, आणि इंद्रियविजयच देऊ शकतात. शेवटच्या महिन्यात उजवा पाय उचलून फक्त डाव्या पायावर तोल सांभाळायचा. मंत्रजप अव्याहत सुरूच हवा. शेवटी हळूहळू मंत्राबरोबरच श्वास घेण्याची व सोडण्याची गती कमी करायची व या दोघांमधला श्वास कोंडून धरायचा अवधी वाढवायचा. शेवटी या श्वास आणि उश्वास, प्राण आणि अपान, यांच्या मध्ये स्थिर व्हायचे. हे सर्व जमेल, मन जर फक्त नारायण रूपावर स्थिर असेल तरच, आणि फक्त तरच, ध्येयप्राप्ति होईल असे मी त्यास सांगितले.
सर्व लक्ष ध्येयप्राप्तीवर आहे, त्यात श्वासोश्वास पण व्यत्यय आणत नाही, अशी स्थिती प्राप्त झाली तर भक्तवत्सल धाऊन येईल असे सांगून, त्याला शुभेच्छा देऊन, त्याचे वंदन स्वीकारून, त्याचे धन्यवाद घेऊन, मेंशन नाॅट म्हणून मी रानातून बाहेर येऊन सरळ उत्तानपाद राजाकडे गेलो.
ब्र: नारदा आता मीही तपस्या करू शकेन इतके व्यवस्थित तू सांगितलेस. पण ते मेंशन नाॅट वगैरे हातचे लावलेस बरे. ते पुराणात शक्य नाही. तुझं म्हणजे ... आपलं म्हणजे ... हे म्हणजे ... खूपच बा!
ना: अरे आपण कलियुगात, पृथ्वीवर आहोत. गोष्टींचे थोडेफार आधुनिकीकरण करायला नको का? चिऊ काऊच्या गोष्टीत सुद्धा आजकाल कावळा डोअरबेल दाबतो, टेक्स्ट करतो. कडी नाही वाजवत.
बरे असो. नंतर मी उत्तानपाद राजाच्या दरबारात गेलो. राजाला सगळं घडून गेल्यावर, आपण साधा विरोधही केला नाही याचा पश्चात्ताप होत होता. मी त्याची समजूत काढली. धृवबाळ यशस्वी होऊन, भगवंताचा आशिर्वाद घेऊन परत येईल. तेंव्हा त्याचे राज्याच्या वेशीवरच स्वागत करावे व दरबारात घेऊन यावे असे सांगितले. तुझ्यानंतर तोच राजा होईल हेही बजावले. धृवाचा निर्धार व कृपालसिंधूचे औदार्य मला सांगत होते की विष्णुदेव नक्कीच प्रकट होणार व धृवाला मनोवांछीत वर देणार.
ब्र: इतके केल्यावर, इतक्या कठोर दिव्यानंतर प्रसन्न होणाऱ्या वरद नारायणाला काय तो क्षुल्लक राज्य मागणार? त्याने तर त्यांच्या चरणकमलाशी अढळ स्थान मागावे. काय मागावे हे तू त्यास सांगितले की नाहीस? तो बालबुद्धी रे. चाॅकलेट मागेल. त्या विषयी तू त्याला काही सल्ला दिलास की नाही?
ना: ब्रह्मा, मी सगळेच कसे रे फिक्स करीन. पुढे काय होणार हे मला माहित असायला काय मी अजन्म आहे. मूळ आहे? ब्रह्मदेव आहे? मार्ग दाखवणे माझे काम. माझ्यावर विश्वासून त्या मार्गाने जाणे तपस्व्याचे काम. प्रसन्न होणे न होणे हा नारायणाचा निर्णय. नारायण नारायण!
ब्र: नारदा पुढे काय झाले?
ना: ब्रह्मा, त्या बालकाने अगदी सांगितले तसेच कठोर तप केले. शेवटी शेवटी तर तो जमीनीत पायाचा अांगठा रुतवून, श्वास रोखून, एका चरणी उभा झालेला, प्रकाशवलयाने आवृत्त मला आठवतो. तसे होताच त्रिलोकात कंपन सुरू झाले. इंद्राचेही सिंहासन हालायला लागले म्हणतात. केवळ उत्तानपादानंतर त्याचे सिंहासन त्याला नाकारले गेले, ते परत मिळावे म्हणून केलेले तप इतके प्रखर व शुद्ध की त्याची झळ राजा इंद्रापर्यंत पोहोचली. त्यांचेच राज्य जाईल की काय असे त्यांना वाटू लागले. काहीतरी उपाय करणे त्यांना आवश्यक भासले.
ब्र: काय केले इंद्राने?
ना: आधी त्याने रानातील हिंस्र श्वापदांकडून तपस्येत अडथळे आणायचा प्रयत्न केला. एकीकडे कोवळे बालक, आणि दुसरीकडे वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, साप. पण बालक अविचलित. श्वापदांनी हल्ला अधिकच तीव्र करता बाळाभोवती सात ऋषींनी संरक्षक घेरा तयार केला. त्यांच्या तपसामर्थ्याने व सुरक्षा कवचाने श्वापदे निष्प्रभ झाली.
नाईलाज म्हणून इंद्राने मग कपटनीती अवलंबिली. धृवबाळाची आई, सुनीतीचे रूप घेतले. वनात जाऊन त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. शेवटी काहीच उपाय न चालल्यामुळे सर्व देव भगवान विष्णूकडे गेले. त्रिलोककंपन सुरूच होते. धरती चळचळा कापतच होती. देवांची स्थिती पाहून नारायणाने काय तो निर्णय घेतला व निश्चिंत होण्याचा त्यांना अनुरोध केला.
ना: बापरे! एवढे सर्व एका बालकाच्या तपस्येमुळे? पण नारदा, हे त्रिलोककंपन, हे इंद्राचे सिंहासन डळमळणे हा काय रे प्रकार? असे शक्य तरी आहे का?
ना: हेही रूपकच असावे. हवा, प्राणवायू हा चराचर सर्व प्राण्यांना हवा. त्याच्यावर सर्वांचा सारखा हक्क. एकाचाही जर जीव त्याच्या अभावामुळे कोंडला तर त्याची झळ सर्वांनाच लागते. असा उदात्त अर्थ असावा. असो.
शेवटी विष्णुभगवान मी जसे वर्णनिले होते त्याच सगुण रूपात धृवासमोर प्रकटले. बाळाने डोळे उघडले तर समोर तेच दिव्य रूप जे मी त्याच्या मनात ठसविले होते व त्याच्या मनातही व्यापले होते. क्षणभर त्याला वेगळे काहीच वाटले नाही. क्षणभर वाटले हा भास असावा वा आपलेच मन आपल्या चक्षूसमोर आले असावे. पण नंतर नारायणाचे बोल कानांवर आले आणि तो थक्क झाला. त्याचे तप भगवंताने मान्य केले होते व दिव्यदर्शन दिले होते हे त्याच्या गळी उतरले व त्याने जगन्नियंत्यापुढे लोटांगण घातले. नेत्रातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
नारायण वदले, वत्सा! तू माझा सर्वात लहान योगी. बालवयातच काय, पण कधीच कोणीही आजपर्यंत न असे तप केले, न कोणी करेल. तुझी माझ्यावरची अढळ श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो आहे. माग, जे हवे ते माग.
ब्र: नारदा, माझेही डोळे पाणावले रे. धन्य ते बालक आणि धन्य तो दयाळू दाता! काय, मागितले तरी काय त्या महायोगी बालकाने?
ना: ब्रह्मा! अघटित घडले. साक्षात नारायणाने नराला इच्छावर दिला. पण त्या नराचे, त्या बालकाचे, त्या मनुवंशजाचे, त्या मानवाचे मुखातून शब्दही निघेना. त्याची वाचाच जणू त्याच्यावर रुसली. शरीरबाह्य देव प्रसन्न, पण शरीरच अप्रसन्न!
ब्र: मग पुढे?
ना: अगदी लहान मुलासारखा 'पुढे सांग ना' म्हणतो आहेस. तुझे समोरचे दोनही डोळे बघ कसे विस्फारले गेले. मला खात्री आहे, डाव्या, उजव्या, व मागच्या चेहऱ्यावरचे सहा डोळेही विस्फारले असतील. पुराणातलीच भाषा वापरायची तर तुझे आठही कमलनयन आता पूर्ण उमलले असतील. ब्रह्मा, पुराणातली भाषा किती सुंदर, सालंकृत, सुसंस्कृत, शालीन, मृदु, समृद्ध, मधाळ, वगैरे वगैरे असते. मला खूप आवडते! त्यासाठी तरी वेदपुराणांचा अभ्यास करावा. हा आस्तिक नास्तिक धुमाकूळ त्याच्या आड तरी येऊ नये असे मनोमन वाटते.
ब्र: नारदा, तू भाषेच्या बाबतीत तसा फार हळवा आहे. पट्टीचे कीर्तनकार असतातच म्हणा. ते दक्षिणामूर्ति मंदिरातले बाळशास्त्रीच घे ना, ज्यांच्याबद्दल तू मला नेहमी सांगायचास. तू बाळधृव म्हणाल्यापासून मला सारखी त्यांची आठवण येते आहे. पण तूर्तास बाळधृवाकडे वळावे मुनी!
ना: ब्रह्मा, भक्ताची ही स्थिती नारायणाला समजली. त्याच्या मनात काय हेही त्याला कळलेच होते. अरे, अंतर्बाह्य नारायणच नारायण. बाळच पूर्ण नारायणमय झालेला. त्याने खरे तर तोंड उघडून काही मागावेच असे आवश्यक नव्हते. मनातली अप्रकट, निःशब्द इच्छा पण त्या मनोवेधी देवाने पूर्ण केलीच असती. पण, काय त्याच्या मनात आले कोण जाणे. त्याने बालकाच्या गालाला पाञ्चजन्याने हलकेच स्पर्श केला. आणि मग?
ब्र: मग काय? सांग सांग. पुढे सांग. त्वरित सांग.
ना: ब्रह्माजी, आज जरा थकल्यासारखे वाटत आहे. उद्या इथूनच सुरू केले तर चालेल का?
ब्र: नारदा! छळू नको. पट्टीच्या कीर्तनकारांची ही ट्रिक वापरू नको. उत्कंठा ताणू नको.
ना: बरे बरे. शंखस्पर्श होताच बालमुखात शब्द आले. लहान मूल अचानक बोलायला लागते तसे. पण त्याने काही मागितले नाही. नारायणाचे अद्भुत रूप पाहून त्याच्या तोंडातून स्तुतिवचने निघायला लागली. ब्रह्मा, त्याने केवळ बारा श्लोकात केलेली विष्णुस्तुती 'धृवस्तुती' म्हणून प्रसिद्ध आहे.
ब्र: हे बरं कळतं रे सगळ्यांना लहान वयापासून! आधी तुझी स्तुती. आता नारायणाची. आधीच तो प्रसन्न. आता तर तो अतिप्रसन्न होईल. समजावून सांगतो का मला ती स्तुती? बाराच तर श्लोक. आधी एक एक श्लोक म्हण, मग संधीविग्रह कर, मग शब्दार्थ सांग, मग साध्या सोप्या भाषेत लौकिकार्थ, गर्भितार्थ व व्यंगार्थ सांग. ते तुझं व्यंजना वगैरे.
ना: ब्रह्मा, ते आता सोड. तुला मी श्रीमद्भागवताची लिंकच देईन. नाहीतर गूगल कर. नाहीतर शेजारच्या देवळात भागवत सप्ताह नेहमीच होतो. जाऊन बैस.
ब्रह्मा, धृवस्तुती फक्त बारा श्लोकांची आहे. तेवढ्या संक्षिप्त उत्स्फूर्त काव्यात सहा वर्षाच्या बालकाने नारायणाच्या नारायणत्वाचे गुणगान गाईले आहे. खरे तर इश्वरस्तुतीला अंत नाही.
असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धु पात्रं
सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी ।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानां ईश पारं न याति ॥
काळ्या पर्वताला समुद्रात विरघळून समुद्रालाच शाईची दौत केली व एखाद्या देववृक्षाची, उदाहरणार्थ कल्पतरूची, फांदी टाक किंवा बोरू म्हणून वापरली, आणि साक्षात सरस्वतीने नारायणाची स्तुती पृथ्वीला कागद मानून लिहिली, तरी अपुरी पडेल असा ह्या श्लोकाचा अर्थ.
धृवस्तुतीत एका श्लोकात धृव मर्त्यलोकातल्या मनुपुत्रांच्या संकुचित दृष्टीचं वर्णन करतो. तो विष्णूला म्हणतो की तुझे भक्त तुला फक्त कल्पवृक्ष समजतात. त्यांच्या तुच्छ इच्छापूर्तीसाठी ते तुला सतत काहीतरी मागत असतात. ह्या हाडाच्या सापळ्याकरिता ते जे मागतात ते तर नरकात सुद्धा प्राप्त असते. पण मागणाऱ्यांचा दृष्टिकोनच संकुचित असेल तर दाता तरी काय करेल?
आणि म्हणून हा ज्ञानी घृव भगवंताला काहीच मागत नाही. फक्त भक्त म्हणून पादारविंदाजवळ जागा द्यावी एवढेच मागणे मागतो.
ब्र: पण नारदा, यात तर सुरुचीचाच विजय आहे. उत्तमच पुढे राजा होईल. धृवाने ते तर मागितलेच नाही जे नाकारल्यामुळे त्याने आहत होऊन कठोर तपस्येचा निर्णय घेतला. काकूंच्या भाषेत, सगळं मुसळ केरात! अगदी ऐनवेळी धृवबाळाचा अवसानघात झाला.
ना: पण ब्रह्मा, धृवाचं मन नारायणमय झाल्यामुळे नारायणाला सर्वच माहीत होते. त्याने सर्व काही ऐकले, धृवाचे अभिनंदन केले व त्याला वरदान दिले. वरदानाप्रमाणे धृवाला परतून घरी जायला सांगितले. त्याचे प्रेमाने स्वागत होऊन पित्यानंतर त्याचाच राज्याभिषेक होईल व तो ३६००० वर्षे राज्य करेल असे भाकीत केले. त्यानंतर त्याने वैकुंठास नारायणाकडे यावे व नारायणाकडून अढळ स्थान प्राप्त करावे असे सांगितले.
ब्र: नारदा, हे ३६ चे कां एवढे महत्त्व रे गोष्टींमधे? धृवानी राज्य केले ३६००० वर्षे. रामानीही तेवढेच. कृष्णाचेही तसेच. एका तासात ३६०० सेकंद. एका वर्षात ३६० दिवस.
ना: ब्रह्मा तुला गणितात रस यायला लागला. नाहीतर तुझा ३६चा आकडा होता गणिताशी. ते आता असू दे. गोष्ट जाऊ दे पुढे.
तर ब्रह्मा! बाळ घरी आला. काळ पुढे गेला. विष्णुवचन सत्य झाले. आज तोच धृवबाळ रात्री उत्तरेला दिसणाऱ्या अढळ धृवताऱ्यावर विराजमान आहे. अमर आहे. मधुवनात तपस्याकालात त्याचे संरक्षण करणारे सात ऋषी, सप्तर्षी आजही आकाशात, अरण्यात बाळाभोवती जसे फेऱ्या मारून त्यास सुरक्षाकवच प्रदान करीत असत, तसे देतात. धृवताऱ्याजवळच आणखी एक तारा आहे त्यावर त्याची आई सुनीती विराजमान आहे.
ब्रह्मा, धृवतारा आजही रात्रीच्या आकाशात दिसतो. त्याभोवती फेरा मारणारे सप्तर्षी पण दिसतात. माझ्या गोष्टीच्या सत्याची ते प्रचीतीच देतात. नाही का?
ब्र: अरे मग असा हासतोस कां? दिसते तसे नसते । म्हणून जग हसते।। असे तू एकदा म्हणाला होतास. कापूसकोंड्याच्या ह्या गोष्टीतही तसेच आहे की काय? नाहीतर मला वाटले की गोष्ट खरी, म्हणून तू खरा. तू खरा, म्हणून मी खरा.
ना: मी आधीच सांगितले की कापुसकोंड्याच्या गोष्टीतले कापुस आणि कोंडा हे ऐकणाऱ्याने वेगवेगळे करायचे असतात. नीरक्षीर विवेक त्याच्या ठायी असावा लागतो.
तुला मदत म्हणून मी थोडी आणखी माहिती देऊ शकतो. ब्रह्मा, धृवतारा स्थिर दिसण्याचे व सप्तर्षी त्याच्याभोवती पिंगा घेतात ह्या सत्य निरीक्षणाचे विज्ञाननिष्ठ कारण सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी रोज स्वत:भोवती पण तिच्या उत्तर-दक्षिण धृवांना जोडणाऱ्या रेषेभोवताल एक गिरकी घेते हे आहे. पूर्ण ३६० डिग्री! अरे, पुन्हा ३६. असो. त्याच रेषेवर अवकाशातील धृवतारा असल्यामुळे तो स्थिर आहे असे पृथ्वीवरून पहाणाऱ्यांना वाटते. ब्रह्मा, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील मनुपुत्रांना तर हा तारा दिसतपण नाही. अवकाशयानातल्या यात्रींना तो अढळपदी नाही हे माहीत आहे.
आणखी सांगायचे म्हणजे, ब्रह्मा, धृव तारा हा स्वयंभू सूर्य आहे. त्यावर आपल्या सूर्यावर असते तशी आग आहे. त्याचे तापमान अंदाजे ४५०० सेंटिग्रेड आहे. १०० डिग्रीवर पाणी उकळते, १५०० वर लोह वितळते. ४५००-५००० वर फक्त उदजन वायू व हिलियमच असतात. ना आपल्या सूर्यावर, ना धृवावर इतर काही असू शकते. जीवजंतू तर सोडच.
आणखी एक गोष्ट म्हणजे धृवतारा हा पृथ्वीपासून वा कैलासापासून अंदाजे २००००००००००००००० मैल दूर आहे. दोनावर पंधरा शून्य. तुझी चार, माझे एक व रावणाची दहा तोंडे मिळून पंधरा. तिथला प्रकाश इथे यायला ४०० वर्ष लागतात ब्रह्मा. आणि प्रकाशाचा वेग सेकंदाला १८६०००, म्हणजे १ लक्ष ८६ हजार मैल आहे. गंमत नाही. तिथे कसा जाणार रे धृव सदेह?
ब्र: बापरे! सगळे अफाटच. काय ही गोष्ट. कल्पकतेची खरोखरच कमाल! कौतुक करावं वाटतं कथाकाराचं ज्यानी अवकाशात नित्य दिसणाऱ्या ग्रहताऱ्यांना घेऊन ही सुंदर गोष्ट गुंफली व गोष्टीद्वारे बोध दिला. धन्यच नाही का जो कोणी असेल तो? आणि गोष्टीच्या अचाटतेतच ही सत्यकथा मानू नये असा प्रामाणिक इशारा आहे.
ना: होय ब्रह्मा. माथा झुकवावा अशी ही गोष्ट. लहानांना जरूर सांगावी अशी ही गोष्ट. कापुसकोंड्याची गोष्ट.
ब्र: नारदा, मग सप्तर्षींची पण नावे आहेत का रे?
ना:अर्थातच! पुराणातल्या सगळ्या गोष्टी सर्वार्थाने संपूर्ण आहेत. सगळ्या गोष्टीतल्या सगळ्या पात्रांची पाळेमुळे खणून सर्व धागेदोरे व्यवस्थित जोडलेले आहेत. ब्रह्मा, हे प्राचीन कथाकार सामान्य नाहीत रे. सामान्यांनी त्यांची थट्टा करणे म्हणजे सूर्यावर पाण्याचे शिंतोडे उडविणे. 'तसा बालगंधर्व पुन्हा न होणे' मधे जो कलाकाराविषयी आदर आहे तोच त्यांच्याविषयी सुद्धा हवा.
ब्र: पण ते सप्तर्षी कोण कोण?
ना: ब्रह्मा, धृवाची गोष्ट भागवत पुराणात आहे, विष्णुपुराणात पण आहे. गोष्ट तीच आहे तरी थोडीफार वेगळी पण आहे. सप्तर्षींची नावे पण वेगवेगळी आहेत. एक दोन नावे इकडची तिकडे होतात. असे वाटते की जो कोणी कथा लिहितो तो आपल्या आवडत्या ऋषीचे नाव घुसवतो व नावडत्या ऋषीचे नाव बाहेर काढतो. एकूण आकडा सात असला म्हणजे झाले.
एका प्राचीन ग्रंथाप्रमाणे वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भारद्वाज आणि अत्रि हे ते सप्तर्षी. हेही सत्ययुगापासून आलेले दिसतात. ब्रह्मा, हे सारेही तुझेच मानसपुत्र असेही म्हणतात. सर्वांचेच वंश फोफावले. मास्तर किती अभिमानाने 'वसिष्ठगोत्रोत्पन्नोहं' म्हणायचे संध्यापूजा करतांना. असो! नंतर एका ग्रंथात भृगु ऋषींचे नावही सप्तर्षीत समाविष्ट करण्यात आले. आठ ऋषींचे सप्तर्षी.
ब्र: असे कसे होईल? आठ दिसत असतांना सात मोजणे मास्तरांना आवडले नसते बरे नारदा! केळ्याचे बरोबर ९ तुकडे ते करायचे असे तूच सांगायचा.
ना: अरे चालतं. सात दिवसांचा आठवडा चालतो तर आठ ऋषींचे सप्तर्षी का चालू नये? इतका काटेकोरपणा गोष्टीत, कवितेत नसावा. थोडासा लवचिकपणा असावा.
ब्र: तेही खरेच म्हणा. नारदा! आणखी एक गोष्ट मला राहून राहून वाटते. आजच वाचलेल्या हरिपुत्र पुराणात, म्हणजे त्या हॅरी पाॅटर मध्ये व आपल्या धृवबाळामधे काहीतरी साम्य आहे असे मला वाटते.
ना: ब्रह्माजी, असेलही. भागवताच्या ज्या खंडात ही गोष्ट आहे त्याचे शीर्षक 'नशीबवान बालकाची कथा' असे काहीसे आहे. हॅरी पाॅटरला पण 'मुलगा, जो जिवंत राहिला', 'The boy who lived' किंवा 'द लकी वन' असे म्हणतात. शत्रूनी ज्यांच्या मृत्यूची इच्छा केली पण जे स्वकर्तृत्वाने टिकले अशी ही दोन्ही नशीबवान मुले. कवी काय किंवा कथाकार काय? आधीच्या गोष्टी ऐकत ऐकतच मोठा होतो. भोवतालच्या अनुभवांनीच समृद्ध होतो. त्याचेच घुसळण त्याचे मन करते व ताजे कथालोणी जन्म घेते. म्हणून तर कापुसकोंड्याच्या गोष्टींचे महत्त्व. त्या ऐकणे, वाचणे, सांगणे, कापुस व कोंडा वेगळा करणे व तत्कालीन परिस्थितीनुरूप आपला भाषाविलास करीत नवनिर्मिती करणे हीच साहित्यसेवा. ती सर्वांनीच करावी. सर्वच जण साहित्यिक.
ब्रह्माजी, मला नेहमी असे वाटते, ही आजपर्यंतची साहित्यसंपदा, हे संचित पिढी दर पिढी वाढत वाढत पुढे जायला हवे. पौराणिक कथांमागची कल्पकता, त्यांची सुसूत्रता, त्यांची काव्यबद्धता, काव्याची वृत्तबद्धता, त्यांची लयबद्धता, वृत्तांचे सौंदर्य अनोखे आहे. त्या सत्यकथा मानणे हा त्या अलौकिक साहित्यनिर्मात्यांचा व त्यांच्या तितक्याच अलौकिक निर्मितीचा खरे तर अपमान आहे.
आयुष्य सारे अनंत कापुसकोंड्याच्या गोष्टींचे पठण, चिंतन, मनन करण्यात जावे. अशीच एखादी कापुसकोंड्याची कधी न संपणारी गोष्ट मनात घोळता घोळता .....
ब्र: घोळता घोळता काय?
ना: ब्रह्मा, आपल्याला तेही भाग्य नाही. आपण पडलो अमर.
ब्रह्माजी, जंतुकवीच्या मला आवडणाऱ्या एका कवितेने आजची कापुसकोंड्याची गोष्ट संपवू या.
कापुसकोंड्या स्वप्नात आला
गोष्ट झाली सुरू
सकाळ झाली, दुपार गेली
स्वप्न आपले सुरू
या स्वप्नाला अंतच नाही
कुठे न या एक्झिट
अनंत धाग्याचे भेंडोळे
प्रवास याचा सुरू
_____________________
No comments:
Post a Comment